skip to main | skip to sidebar

इथे काय लिहिलंय?

  • कथा (5)
  • प्रारंभ (1)
  • मुलाखत (1)
  • लेख (2)
  • लोकलकथा (2)

संग्रह

  • ► 2013 (4)
    • ► जून 2013 (2)
    • ► जुलै 2013 (1)
    • ► ऑगस्ट 2013 (1)
  • ► 2014 (1)
    • ► मे 2014 (1)
  • ► 2015 (1)
    • ► एप्रिल 2015 (1)
  • ▼ 2018 (5)
    • ▼ ऑक्टोबर 2018 (4)
      • दिगूलीला
      • प्लँचेट
      • एक्झिक्युटिव्ह मॅचमेकिंग
      • तालबद्ध वाटचाल
    • ► नोव्हेंबर 2018 (1)

सगेसोयरे

  • कथापौर्णिमा
  • नंदिनी

पाहुणे

असंच काही बाही

सुचलेलं, अनुभवलेलं...

२० ऑक्टोबर, २०१८

तालबद्ध वाटचाल

मी 'लहानपणापासून जे शिकले, ज्यात नैपुण्य मिळवलं, अनेक अजिंक्यपदे मिळवली त्याच खेळाला मोठं करण्यासाठी मी झटलं पाहिजे', या ध्यासापायी आपल्यातलीच एखादी स्त्री जेव्हा एका वेगळ्या कार्यक्षेत्रात स्वतःला प्रस्थापित करते, तेव्हा 'ध्येयवेडी' हा एकच शब्द तिच्या वर्णनार्थ लागू होतो.
एखाद्या स्त्रीने पूर्णवेळ व्यवसाय म्हणून एका परदेशी खेळाचं प्रशिक्षकपद आणि परीक्षकपद भूषवणं, ही बाब अजूनही आपल्या पचनी पडणं कठीण आहे. थोडीथोडकी नाहीत तर तब्बल चौदा वर्षं 'जेट एअरवेज'सारख्या प्रतिष्ठित कंपनीत व्यवस्थापकीय पदावर काम केल्यानंतर ती नोकरी सोडून तालबद्ध जिम्नॅस्टिक्स (Rhythmic Gymnastics) या परदेशी खेळाचं प्रशिक्षकपद आणि परीक्षकपद भूषवण्याचं मोठं आव्हान वर्षानं यशस्वीरीत्या पेललंय.
वर्षा उपाध्ये... १९८९-१९९० सालचा, 'जिम्नॅस्टिक्स' या खेळासाठीचा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारी गुणी खेळाडू, आज आपल्या यशाची धुरा पुढच्या पिढीच्या खांद्यावर देण्यासाठी जिवापाड मेहनत घेतेय. तालबद्ध जिम्नॅस्टिक्स या परदेशी खेळासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याबरोबरच याच खेळाच्या जागतिक स्पर्धांमध्ये खेळाडूंच्या सादरीकरणाचे गुणांकन करणार्‍या पंचमंडळात ती भारताचं प्रतिनिधित्व करतेय.
1_0.jpg
वर्षाची मुलाखत घेण्याच्या निमित्तानं आम्ही तिच्या घरी गेलो असता तिच्या घराच्या दर्शनी भागाची एक संपूर्ण भिंत भरून असलेली प्रशस्तीपत्रकं, सन्मानचिन्हं, तिनं मिळवलेली पदकं तिच्या कर्तृत्वाची साक्ष देत होती. राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा अगदी तोंडावर येऊन ठेपल्या होत्या. त्यासाठीच्या सराव स्पर्धा, शिबिरं आणि सततचे परदेश दौरे अशा अतिशय व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून वर्षानं तिच्या या आगळ्यावेगळ्या करिअरबद्दल आमच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. त्या दिवाळीअंकाच्या निमित्तानं मायबोलीकरांसाठी शब्दरूपात -
तालबद्ध जिम्नॅस्टिक्स या खेळाशी तुझी ओळख कधी झाली?
मी वयाच्या सातव्या वर्षापासून दादरच्या ‘श्री समर्थ व्यायाम मंदिरा’त जिम्नॅस्टिक्स शिकायला सुरूवात केली होती. साधारण तेरा-चौदा वर्षांची असताना मी ग्वाल्हेरला जिम्नॅस्टिक्सच्या शिबिरासाठी गेले होते. तिथे तालबद्ध जिम्नॅस्टिक्स शिकवण्यासाठी रशियाहून दोन प्रशिक्षक आले होते. त्यांच्याकडून सर्वप्रथम हा खेळ मी शिकले. त्यानंतरच्या वर्षी जिम्नॅस्टिक्सच्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी आम्ही गेलो असता तिथे तालबद्ध जिम्नॅस्टिक्सच्याही स्पर्धा होणार आहेत, असं आम्हाला कळलं. तेव्हा, ग्वाल्हेरच्या शिबिरात रशियाच्या प्रशिक्षकांकडून जे काही शिकलो होतो तेच त्या स्पर्धेत सादर करून दाखवलं. तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये स्पर्धात्मक पातळीवर हा माझा सगळ्यांत पहिला सहभाग होता.
तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये प्रशिक्षक आणि पंच म्हणून तुझं पदार्पण कधी झालं?
मला खेळाडू म्हणून महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला १९८९-१९९० साली. त्यानंतर नोकरी करत असतानाच मी दादरच्या शिवाजीपार्कातल्या श्री समर्थ व्यायाम मंदिरात तालबद्ध जिम्नॅस्टिक्सचं प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली होती. या खेळात पुढे जायचं असेल तर या खेळाचे नियम आणि बारकावे आपल्याला माहीत असलेच पाहिजेत या दृष्टीनं मी प्रशिक्षण आणि गुणांकनपद्धतीचा अभ्यास सुरू केला. मी महाराष्ट्राचा संघ घेऊन राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांना जायचे. पंच म्हणून काम करायचे. माझी तिथली कामगिरी पाहून आंतरराष्ट्रीय पातळीवर पंचपरीक्षा देण्यासाठी भारतीय जिम्नॅस्टिक्स संघटनेनं माझी निवड केली. २००५ साली आंतरराष्ट्रीय पंचपरीक्षा मलेशिया इथे घेतली गेली आणि त्या परीक्षेत मी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले. त्यानंतर मी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करायला सुरूवात केली.
ही कठीण परीक्षा पार करणारी तू पहिलीच भारतीय आहेस आणि त्यामुळेच पहिली भारतीय महिलासुद्धा. या दुहेरी सन्मानाबद्दल तुझं मनःपूर्वक अभिनंदन.
तालबद्ध जिम्नॅस्टिक्स या खेळाची माहिती मायबोलीकरांना करून देशील का?
तालबद्ध जिम्नॅस्टिक्स हा केवळ मुलींसाठी/महिलांसाठी असलेला एकमेव ऑलिंपिक मान्यताप्राप्त खेळ आहे. या खेळात वेगवेगळ्या प्रकारची साधनं हातात घेऊन संगीताच्या तालावर आपलं कौशल्य सादर करायचं असतं. ही साधनं पाच प्रकारची असतात - बॉल, रिबन, हूप किंवा रिंग, क्लब आणि रोप.
2_1.jpg
हा क्रीडाप्रकार 'बॅले' (ballet) या नृत्यप्रकारावर आधारित असून जिम्नॅस्टिक्स या खेळाशी समन्वय साधणारा आहे. यात तुमच्या शरीराची लवचिकता, तुमचं अंगभूत कलाकौशल्य, डोळे-हात आणि इतर अवयवांच्या हालचालींचा संगीताशी आणि साधनांशी योग्य आणि अचूक समन्वय, यांची आवश्यकता असते. हा क्रीडाप्रकार आता आपल्याकडे हळूहळू लोकप्रिय होत चालला आहे, कारण मुळातच आपल्याकडे मुलींना संगीत आणि नृत्य या दोन्हींची जन्मतःच आवड असते. हा खेळ शिकल्याने शरीराला आवश्यक असा फिटनेस तर मिळतोच शिवाय बांधा सुडौल राहतो, हालचाली लयबद्ध होतात आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे या खेळात अनेक प्रकारच्या हालचालींचा अंतर्भाव असल्यामुळे मनाची एकाग्रताही वाढते. हा क्रीडाप्रकार शिकल्यावर स्पर्धात्मक पातळीवर त्यात भाग घेतलाच पाहिजे, असं नाही. पण या फायद्यांमुळे इतर खेळ शिकलेल्या मुलींपेक्षा तालबद्ध जिम्नॅस्टिक्स शिकलेल्या मुली आपल्याला नेहमीच वेगळ्या ओळखू येतात.
3_1.jpg
वयाच्या साधारण कितव्या वर्षापासून हा खेळ शिकलेला चालतो?
कुठलाही खेळ वयाच्या तिसर्‍या वर्षापासूनसुद्धा मुलांनी शिकलेला चालतो. पण अगदी खरं सांगायचं झालं तर इतक्या लहान मुलांना खेळ शिकवण्यासाठी आवश्यक असलेलं सुरक्षित वातावरण, साधनसामुग्री, शिकवण्याच्या पद्धती/प्रकार इत्यादी आपल्याकडे अजून फारसे विकसित झालेले नाहीत. त्यामुळे क्रीडासंस्थासुद्धा अगदी लहान वयाच्या मुलांना दाखल करून घेण्यासाठी फारशा उत्सुक नसतात. आणि आपली मानसिकताच अशी झाली आहे की, मुलांनी ज्या वयात शाळेत जाण्याची तशी आवश्यकता नसते त्या वयात आपण मोठ्ठाल्या फिया भरून त्यांना नर्सरी/प्ले-ग्रूपला पाठवतो, पण खेळासाठी मात्र आवश्यक तेवढं उत्तेजन देत नाही. म्हणजे ती मुलं घरीसुद्धा मस्ती करत असतील, उड्या मारत असतील, तरी आपण त्यांना 'अरे, असं करू नकोस, तू पडशील, तुला लागेल' असं नेमकं उलटंच शिकवत असतो. हे बरोबर नाही. जितक्या लवकर मुलं खेळ शिकतील तितकी त्यांची शारीरिक वाढ चांगली होते, ती मुले सुदृढ होतात, लवचिक होतात.
शारीरिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा खेळ कसा आहे?
दुखापती हा कुठल्याही खेळाचा अविभाज्य घटक आहे. याच खेळात असं नाही, तर कुठल्याही खेळामध्ये खेळाडूंना दुखापतींना तोंड द्यावं लागतं. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे त्या त्या खेळासाठी आवश्यक असलेला वैद्यकीय दृष्टिकोन आपण बाळगत नाही. उदाहरणच घ्यायचं झालं तर, एखाद्या मुलाला पोहणं शिकायला पाठवायचं झाल्यास त्याचे हात बळकट आहेत का, सांधे सुयोग्य आहेत का, हे न बघताच त्यानं पाण्यात उडी मारून पोहायला सुरूवातच करावी, अशी अपेक्षा आपण त्याच्याकडून करतो किंवा फूटबॉल खेळायला पाठवायचं आहे तर त्याच्या पायांत किती ताकद आहे, त्याचे स्नायू पुरेसे तयार झाले आहेत की नाही, हे न तपासताच आपण त्याला खेळ शिकायला पाठवून देतो. तिथे तो मुलगा लगेचच कौशल्य (skills) शिकायला सुरूवात करतो, असं बरेचदा बघितलं जातं. साधनं आणि सुरक्षितता (equipments and safety) हा मुद्दा नंतर उपस्थित होतो. पण कुठलाही खेळ शिकण्यासाठी सर्वप्रथम आवश्यक असते ते खेळण्यायोग्य शरीर तयार करणे (Body Preparation).
आज आपण बघतो क्रिकेट शिकणारे खेळाडू सराव संपल्यावर लगेचच वडापाव खाताना दिसतात. हा अयोग्य आहार आहे. त्यामुळे खेळाडूचं वजन नक्कीच वाढणार. खेळाडूंच्या आहाराच्या बाबतीत प्रशिक्षकांनी योग्य ते मार्गदर्शन करायलाच हवं. खेळ सुरू करायच्या आधी कर्बोदकं आणि खेळाच्या सरावानंतर प्रथिनं पोटात जाणं अत्यावश्यक असतं. आहाराच्या बाबतीतले नियम पाळले गेले नाहीत तर शरीरातले स्नायू सहकार्य करू शकणार नाहीत, थकवा जाणवू लागेल आणि अपेक्षित आविष्कार खेळाडू सादर करू शकणार नाही. प्रशिक्षकांना खेळाशी निगडित या सगळ्या विषयांबद्दल सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या मते योग्य तो वैद्यकीय आधार घेऊन खेळ खेळल्यास आणि शिकवल्यास होणारे अपघात किंवा दुखापती आणि खेळाचे दुष्परिणाम नक्कीच टाळता येतात.
स्पर्धेदरम्यान सादरीकरण आणि गुणांकनाची पद्धत कशी असते?
स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला सादरीकरणासाठी दीड मिनिटांचा वेळ दिलेला असतो. संगीताच्या तालावर हातात साधन घेऊन आपलं कलाकौशल्य तिनं सादर करणं अपेक्षित असतं. प्रत्येक खेळाडूला एकूण तीसपैकी गुण दिले जातात. गुणांकनासाठी तीन पंचमंडळे नेमलेली असतात. एक मंडळ खेळाडूचं सादरीकरण (execution) तपासत असतं. तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये सादरीकरणाला खूप महत्त्व आहे. आपलं कौशल्य सादर करताना खेळाडूचे गुडघे ताठच असले पाहिजेत, पावले पेन्सिलीला टोक काढल्याप्रमाणे टोकदार असलीच पाहिजेत - या अशा छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींमुळे हा खेळ नेत्रसुखद होतो. नाहीतर तो डोंबार्‍याचा खेळ वाटेल. दुसरं मंडळ खेळाडूचं कलाकौशल्य (artistry) म्हणजे नृत्यदिग्दर्शन, संगीताची निवड, खेळाडूचा पोषाख इत्यादी गोष्टी तपासत असतं. आणि तिसरं मंडळ त्या दीड मिनिटांच्या वेळात सादर केलेल्या हालचालींची काठिण्य पातळी (degree of difficulty) आणि खेळातील नैपुण्य तपासत असतं. प्रत्येक मंडळात चार पंच असतात. अशा एकूण बारा पंचांनी दिलेल्या गुणांची सरासरी काढून खेळाडूला गुण दिले जातात. गुणांकनासाठी पंचमंडळाला तीस सेकंदांचा वेळ दिलेला असतो.
एखाद्या क्रीडाप्रकाराशी प्रत्यक्ष खेळाडू म्हणून संबंध असणं आणि एक पंच किंवा प्रशिक्षक म्हणून संबंध असणं यांत काय फरक आहे? पंच किंवा प्रशिक्षक म्हणून काम करताना मुळात एक खेळाडू असण्याचे काय फायदे/तोटे असतात?
पंच हा खेळाडू असलाच पाहिजे असं नाही. पण प्रशिक्षक हा खेळाडू असेल तर तो अधिक चांगल्याप्रकारे काम करू शकतो. आमच्यावेळची प्रशिक्षण पद्धत वेगळी होती. आम्ही खुल्या मैदानावर जिम्नॅस्टिक्स शिकलो. मैदानावर जिम्नॅस्टिक्स शिकणं ही संकल्पनाच चुकीची आहे. पण आमच्या प्रशिक्षकांनी एखादी गोष्ट सांगितली की ती करायचीच, त्यांचा शब्द अंतिम, हेच आमच्या डोक्यात भिनलं होतं. पण आजची पिढी स्वतंत्र विचारांची आहे. म्हणजे अगदी चार वर्षांची मुलगीसुद्धा तिच्या मतांशी ठाम असते. मुलींना सराव करायचा नसेल तर त्या एका जागी स्थिर उभ्या राहतील, पण सराव करणार नाहीत. एखादा नवीन व्यायामप्रकार शिकवताना त्यांना तो पटला, त्यांनी मनापासून स्वीकारला तरच त्या शिकण्याची तयारी दाखवतात. मी आधी एक खेळाडू आहे. त्यामुळे मी त्यांची मनःस्थिती समजून घेऊ शकते. मी शिकताना किंवा खेळताना आलेल्या अडचणी टाळून आज अधिक चांगल्या प्रकारे माझ्या मुलींना शिकवू शकते आहे.
पंच म्हणून काम करताना काय जबाबदार्‍या असतात? पंचगिरी करताना निर्णय घेण्यास कठीण असा प्रसंग आत्तापर्यंत कधी तुझ्यावर आला आहे का?
एक आठवण सांगते. २००६ साली मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा झाल्या. त्यावेळी मी तिथे पंच म्हणून भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. आंतराष्ट्रीय पातळीवर पंच म्हणून काम करण्याची माझी ती पहिलीच वेळ होती. त्यावेळी गुणांकन करताना एक प्रकारचं दडपण मला जाणवत होतं. स्पर्धा पाहण्यासाठी जवळजवळ पंचवीस-तीस हजार प्रेक्षक प्रेक्षागृहात उपस्थित होते. आणि हजर असलेला प्रत्येक माणूस तालबद्ध जिम्नॅस्टिक्समधला जाणकार होता. प्रत्येक खेळाडूचं सादरीकरण झाल्यावर त्याला मिळणार्‍या प्रतिसादावरून, उत्तेजनावरून ते स्पष्ट होत होतं. पंचांबरोबरच प्रेक्षकही मनातल्या मनात खेळाडूला गुण देत होते. त्यामुळे आपण कुठे कमी पडायला नको, ही भावना सतत मनात होती. भारतात असं होत नाही. अजूनही आपल्याकडे स्पर्धा पाहायला आलेले प्रेक्षक मनोरंजनाच्या दृष्टीनेच या खेळाकडे बघतात. पण परदेशात मात्र हा खेळ खूप लोकप्रिय आहे. त्यांना या खेळाचे बारकावे माहीत असतात. त्यामुळे परदेशात जाऊन या खेळाचं परीक्षकपद निभावणं, हे एक मोठं आव्हान असतं.
यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघाची प्रशिक्षक म्हणून तुझी निवड झाली आहे, त्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन. त्या स्पर्धेची तयारी कशी चालू आहे?
एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी एकाच संघातल्या, एकाच प्रशिक्षकाच्या तीन खेळाडूंची निवड भारतीय संघात होणं आणि तोच प्रशिक्षक भारतीय संघाचाही प्रशिक्षक म्हणून निवडला जाणं हा आत्तापर्यंतचा एक विक्रमच आहे.
4_1.jpg
माझ्या तिन्ही प्रशिक्षणार्थी मुलींना राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने खूप मोठा अनुभव मिळाला. राष्ट्रकुल स्पर्धेच्या शिबिराच्या निमित्ताने त्यांना रशियाला जाऊन एक महिना प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. स्पर्धेच्या तयारीचा भाग म्हणून त्यांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेता आला. परदेशी प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळालं. आज एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी भारताला मिळाली आहे, ही भारतीय खेळाडूंच्या दृष्टीने खूपच मोठी घटना आहे. या स्पर्धेमुळे खूप सकारात्मक घडामोडी क्रीडाजगतात झाल्या आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने जागतिक दर्जाची उपकरणं आणि क्रीडासाधनं आज भारतात आली आहेत. स्पर्धेसाठी म्हणून ज्या काही सोयीसुविधा केल्या गेल्या आहेत, त्याचा फायदा भविष्यात भारतीय खेळाडूंनाच होणार आहे. ही एवढी मोठी स्पर्धा भारतात झाली नसती तर यातलं काहीच घडलं नसतं. स्पर्धेच्या आयोजनात त्रुटी आहेत, पण खरं सांगायचं तर त्या सगळीकडेच असतात. फक्त त्या सर्वांसमोर येत नाहीत एवढंच. या सगळ्यांतून आपण काहीतरी शिकलोय हे महत्त्वाचं. एक प्रशिक्षक म्हणून या स्पर्धेकडे मी खूपच सकारात्मक दृष्टीनं बघतेय.
या स्पर्धेची ही दुसरी चांगली बाजू आज आम्हाला कळतेय. यावरून आठवलं, पुण्याच्या बालेवाडी क्रीडासंकुलाबद्दल तिथल्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये नेहमीच टीका होत असते की, ही अनावश्यक गुंतवणूक आहे. एवढे पैसे खर्च करून संकुल बांधलं, अद्ययावत क्रीडासाधनं मागवली पण आता स्पर्धा होऊन गेल्यावर त्याचा काही उपयोग नाही. याबद्दल तुझं काय मत आहे?
बालेवाडीचं क्रीडासंकुल १९९४ साली राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने बांधलं होतं. १९९४च्या स्पर्धांनंतर तिथे कुठला मोठा क्रीडाप्रकल्प झालाच नाही. बरं, त्यावेळी बालेवाडी हा भागही पुणे शहरापासून तसा लांबच होता. म्हणजे पुण्यातल्या खेळाडूंनासुद्धा तिथे सरावासाठी जाणं तितकं सोपं नव्हतं. आता पुणे शहर विकसित झालंय. त्यामुळे बालेवाडीला जाणं आवाक्यात आल्यासारखं वाटतं.
२००८ साली बालेवाडीला राष्ट्रकुल युवा स्पर्धा घेतल्या गेल्या. तेव्हा त्या संकुलाचं, सोयीसुविधांचं नूतनीकरण आणि डागडुजी केली गेली. आणि आता ते जे नूतनीकरण केलंय, जी उपकरणे आणली गेली आहेत, ती अतिशय उच्च दर्जाची आणि अद्ययावत आहेत. उदाहरणार्थ, तिथल्या वैद्यकीय केंद्रात खेळाडूंच्या स्नायूंमधली नैसर्गिक ताकदसुद्धा तपासता येऊ शकते. अशा प्रकारच्या सोयी तिथे केल्याचा फायदा असा झाला की, आत्ताच्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांची सगळ्या खेळांची सरावशिबिरं बालेवाडीतच घेतली गेली, आणि त्याचा सगळा खर्च केंद्रसरकारनंच केला. म्हणजे महाराष्ट्र शासनाचा एकही पैसा खर्च न होता केंद्रसरकारच्या योजनेअंतर्गत संपूर्ण बालेवाडी संकुलाचा, तिथल्या उपकरणांचा, क्रीडासाधनांचा योग्यरीत्या वापर झाला आणि देखभाल केली गेली.
आज माझ्यासारख्या खाजगी प्रशिक्षकानं अशा अद्ययावत संकुलात जाऊन खेळाडूंना प्रशिक्षण द्यायचं ठरवलं किंवा सराव घ्यायचा ठरवला तर ते मला आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखं नाहीये. आणि माझ्यासारखे असे अनेक प्रशिक्षक इतरही खेळांत आहेत. मग क्रीडाप्रशासनानंच त्यादृष्टीनं काही सवलतीच्या योजना राबवल्या तर त्याचा फायदा प्रशासन आणि खेळाडू दोघांनाही होईल. ती क्रीडासाधनं, उपकरणं वापरात राहिल्यामुळे त्यांच्या देखभालीवर प्रशासनाला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत आणि अशा अद्ययावत ठिकाणी सराव केल्यामुळे खेळाडूंची कामगिरी उंचावेल.
क्रीडास्पर्धांचं आयोजन नेमकं होण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत?
क्रीडास्पर्धांच्या आयोजनसमितीवर अशी अनुभवी माणसं हवीत, ज्यांना खरोखरच खेळाबद्दल आस्था आहे, तळमळ आहे. मग तो माणूस खेळाडू असू दे नाहीतर राजकारणी... एखादा माणूस कधीतरी एकदा जागतिक स्पर्धा खेळलाय म्हणून त्याला समितीवर बसवलं, याला अर्थ नाही. आज तो खेळासाठी काय करतोय हे विचारात घ्यायला हवं. आपल्याकडे विविध क्रीडास्पर्धांच्या व्यवस्थापन समितींत कितीतरी प्रशासकीय अधिकारी असतात. प्रशासकीय कामांचा त्यांना अनुभव असेल पण क्रीडास्पर्धांच्या आयोजनाचं काय? ते काम त्यांना उत्तमरीत्या जमेलच असं नाही.
स्पर्धेदरम्यान खेळाडूंची/पंचांची ठेवली जाणारी व्यवस्था, पुरवण्यात येणार्‍या सो‌यीसुविधा कश्या असतात? म्हणजे क्रिकेट किंवा टेनिस खेळाडूंची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलांमध्ये केली जाते पण इतर खेळांसाठी मात्र तसं नसतं असं आढळून येतं. तर ही तफावत का?
आज क्रिकेट किंवा टेनिस या खेळांमध्ये जो व्यावसायिक दृष्टिकोन ठेवलाय ना, तो प्रत्येक खेळासाठी असायला हवा, असं माझं मत आहे. हा दृष्टिकोन त्या संघटनांनी जाणीवपूर्वक रुजवला आहे, आणि म्हणूनच केवळ ते त्यांचा असा दर्जा असा सांभाळू शकतात. अशा प्रकारचे प्रयत्न प्रत्येक खेळाच्या संघटनेने केलेच पाहिजेत.
स्पर्धेदरम्यानची व्यवस्था चांगली असते. त्याबद्दल काही तक्रार नाही. पण एक मात्र आहे की, आम्हांला खेळाडूंना स्पर्धेला घेऊन जायचं असेल तर ट्रेननं न्यावं लागतं. पंधरा-वीस खेळाडूंचा संघ स्पर्धेला विमानाने घेऊन जाणं संघटनेला परवडणारं नाही. ट्रेनचं आरक्षण नव्वद दिवस आधी सुरू होतं. स्पर्धेविषयी घोषणा होते ती पंधरा दिवस आधी. इतक्या कमी कालावधीमध्ये मला पूर्ण संघासाठी कुठल्याही ट्रेनमध्ये आरक्षण मिळणं शक्यच नाही. तात्काळमध्ये आरक्षण मिळणंही सहजसोपं नाही. आणि दहा वर्षांखालील, आठ वर्षांखालील अशा वयाच्या मुलींचे संघ अनारक्षित डब्यातून घेऊन जाणं सुरक्षित वाटत नाही. आमच्याच खेळात असं नाही तर अश्या प्रकारच्या अडचणी सगळ्यांच खेळांच्या बाबतीत येतात. म्हणजे काही वेळेला आम्हांला खेळ शिकवणं खूप सोपं वाटतं, पण या अडचणींना तोंड द्यायला आम्ही अपुरे पडतो. हे सगळं समजून घेऊन शासनाने खेळाडूंना अनुकूल अशा योजना आखाव्यात, अशी आमची अपेक्षा आहे.
खेळाविषयीची भारतीयांची मानसिकता आणि प्रगत राष्ट्रांतील लोकांचा दृष्टिकोन यांत बरीच तफावत आढळते. भारतात क्रीडाक्षेत्रात चरितार्थाच्या संधी फारच कमी आहेत, हे त्यामागचं कारण असू शकेल का?
परदेशात क्रीडाक्षेत्रात नोकरीच्या किंवा चरितार्थाच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. म्हणजे आज एखाद्या क्रीडासंस्थेत तालबद्ध जिम्नॅस्टिक्स शिकणारी मुलगी पुढे जाऊन त्याच संस्थेत खाजगी प्रशिक्षकाचं काम करू शकते किंवा स्वतःची प्रशिक्षण संस्था सुरू करू शकते. त्याकरता आवश्यक असणारे स्रोत परदेशात सहज उपलब्ध आहेत. पण भारतात अशा संधी काही ठरावीक खेळांमध्येच उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, क्रिकेट. मी मघाशी व्यावसायिक दृष्टिकोन बाळगण्याबद्दल म्हटलं ते हेच... क्रिकेट संघटनांनी ही पावलं अतिशय विचारपूर्वक उचलली आहेत. आपल्या खेळाडूला त्याच खेळात करिअर करता यावं, यासाठी त्या संघटनांनी जे काम केलंय, त्याचा कित्ता इतर खेळांच्या संघटनांनीही गिरवायला हवा. आज मी माझ्या मुलींना सांगतेय की, राष्ट्रकुल स्पर्धांवर लक्ष एकाग्र करण्यासाठी तुमचा अभ्यास थोडा बाजूला ठेवा. त्यामुळेच पुढे जाऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या कोणावर अवलंबून न ठेवणं, त्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देणं हीसुद्धा माझीच जबाबदारी असते. आपल्या खेळाडूंना इतर संस्थांमध्ये शिकवायला पाठवणं किंवा आपल्याच संस्थेच्या शाखा इतर ठिकाणी सुरू करणं अश्याप्रकारच्या संधी त्या त्या खेळाचा प्रसार आणि प्रचार करणार्‍या लोकांनीच शोधून काढल्या तरच त्या खेळाला चांगले दिवस येतील, असं मला वाटतं. आणि माझ्या मते तुम्ही उत्तम रिझल्टस् दिलेत की, लोकांचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन लगेच बदलतो.
तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत नेमका कुठे आहे? भारतात हा खेळ अधिक लोकप्रिय करण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत?
तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत आता आता दिसू लागलाय. मी २००६मध्ये मेलबर्नला राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांसाठी गेले होते, तेव्हा तिथल्या लोकांना खूप आश्चर्य वाटलं होतं. भारतातून कसा काय पंच आला? हा खेळ तिथेही आहे? हे असे प्रश्न त्यांना पडले होते. तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये भारताचं भविष्य खूप उज्ज्वल आहे, असं माझं मत आहे. मुळात भारतीय स्त्रिया या खूप लवचिक असतात. शरीरानं आणि स्वभावानंसुद्धा! आपल्याकडे असलेली संगीत आणि शास्त्रीय नृत्याची समृद्ध परंपरा, त्यातील वैविध्य यांचं परदेशीयांना अतिशय कुतूहल आहे. बॉलिवूडचं त्यांना जबरदस्त आकर्षण आहे. एक गंमत सांगते, तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये जागतिक अजिंक्यपद पटकावणारी खेळाडू, तिचं नाव कबायवा, तिनं 'मेरा जूता है जापानी'च्या संगीतावर आपलं सादरीकरण केलं होतं आणि त्या सादरीकरणासाठी तिला सुवर्णपदक मिळालं होतं. आपण भारतीय खूप कष्टाळूपण आहोत. आपला रोजचा आहार चौरस आणि पूरक आहे. भाजी, पोळी, कोशिंबीर, आमटी, भात, दही, ताक यांशिवाय खेळासाठी मुद्दाम वेगळ्या कुठल्याही आहाराची आवश्यकता नाही. म्हणजे या खेळासाठी आवश्यक असलेल्या पन्नास टक्के गोष्टी आपल्याकडे निसर्गतःच उपलब्ध आहेत. त्यामुळे या खेळाचं योग्य आणि अचूक तांत्रिक शिक्षण मिळाल्यास भारतीय मुली या खेळात जागतिक पातळीवर अतिशय उत्तम कामगिरी करून दाखवू शकतील. त्यासाठी लहान मुलींवर आत्तापासूनच योग्य ते संस्कार करायला हवेत. अचूक प्रशिक्षण देऊन त्यांना अधिकाधिक स्पर्धांचा अनुभव द्यायला हवा. खेळासाठी पोषक आणि पूरक वातावरण आपणच तयार करायला हवं. आज जर आपण या खेळासाठी आवश्यक असणारे स्रोत मर्यादित असूनही भारताला संपूर्ण संघ देऊ शकतोय तर मग 'सर्वोत्तम' स्रोतांचा वापर करून पदक का नाही मिळवून देऊ शकणार? क्रीडाप्रशासनाकडून आम्हांला मदत मिळाली तर आम्ही एक परदेशी प्रशिक्षक इथे बोलावू शकू. मदत म्हणजे आम्ही अपेक्षा करतोय की, त्यांनी निदान सरावासाठी एक कायमस्वरुपी जागा आम्हांला उपलब्ध करून द्यावी. एक किंवा दोन मुली परदेशात जाऊन प्रशिक्षण घेणार, तेवढ्याच खर्चात परदेशी प्रशिक्षक इथे येऊन वीस मुलींना शिकवू शकतो. २०१८ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून चार-पाच वर्षांच्या मुलींवर आत्तापासून अशाप्रकारे आपण मेहनत घेतली तर तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये भारताला पदक मिळवणं अतिशय सोपं होईल.
5_1.jpg
एक मूलभूत पण महत्त्वाचा प्रश्न: जेट एअरवेजसारखी नोकरी सोडून प्रशिक्षण क्षेत्रात शिरणं नक्कीच सोपं गेलं नसेल... तू तुझं करिअर आणि प्रापंचिक जबाबदार्‍या यांचा समन्वय कसा साधतेस?
खरं सांगायचं तर माझ्या आवडीचं काम मला करता यावं आणि त्याचबरोबर माझ्या मुलाला जास्तीत जास्त वेळ देता यावा म्हणून मी जेट एअरवेजमधली नोकरी सोडून प्रशिक्षणक्षेत्रात शिरले होते. माझी स्वतःची प्रशिक्षणसंस्था चालू केली. पण गेली तीन वर्ष या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीची शिबिरं, निवडचाचण्या, स्पर्धा यांमध्येच इतकी गुंतून गेलेय की, मुलाकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाहीये. खरंच सांगतेय, त्याचे आजीआजोबाच सध्या त्याच्याकडे बघत आहेत. जेट एअरवेजमध्ये असताना मला एकसारखं वाटत असायचं की, मी आज एवढी मेहनत करतेय त्याचा फायदा कंपनीलाच होणार आहे. म्हणजे लहानपणापासून मी जे काही शिकले, ते सोडून मी आज हे काय करतेय? आणि तुलाही अनुभव असेलच, आजकाल या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये ताणतणाव प्रचंड वाढलेत. मला आज मुलींना शिकवताना जे मानसिक समाधान मिळतंय ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी सुरू केलेल्या तालबद्ध जिम्नॅस्टिक्सच्या प्रशिक्षणसंस्थेला इतका चांगला प्रतिसाद मिळेल, असं मला वाटलंच नव्हतं. आज शंभरापेक्षाही जास्त मुली माझ्या प्रशिक्षणसंस्थेत आहेत. पण शिकवण्यासाठी मला अनुभवी माणसं कमी पडत आहेत, आणि त्यामुळे मला प्रवेश देता येत नाहीये. जिम्नॅस्टिक्स हा असा खेळ आहे की, तो तुमच्यासाठी रोज नवनवीन आव्हाने घेऊन येतो. ती आव्हाने मला स्वस्थ बसू देत नाहीत. त्यांच्यावर काम करताना मला जी मजा येते त्याच्यापुढे मला नोकरीत मिळणारा पगार, त्या फ्री ट्रिप्स महत्त्वाच्या वाटत नाहीत. अर्थात, नोकरी सोडल्यावर सुरुवातीला जम बसवणं तसं कठीण गेलंच. दर महिन्याच्या महिन्याला आपल्याला पगार मिळणार नाहीये, यासाठी मनाची जबरदस्त तयारी करावी लागली. पण माझ्या आवडीचं काम मी पूर्णपणे स्वतंत्र राहून माझ्या मनाप्रमाणे आणि त्यामुळेच जास्त चांगल्या तर्‍हेनं करू शकतेय, ही भावना वरचढ ठरली.
----------
निवडलेल्या क्षेत्रातील मार्गक्रमणा यशस्वीपणे होत असतानाही स्वप्नात खुणावणारी, फारशी न मळलेली नवी वाट पकडण्याचं धाडस आज कितीजण दाखवतात? संसारात रमलेल्या, एका मुलाची आई असलेल्या वर्षानं नव्या वाटेवरची अवघड वळणंही यशस्वीरीत्या पार करून दाखवली आहेत. वर्षाच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये तालबध्द जिम्नॅस्टिक्सच्या सांघिक स्पर्धेत भारतानं पाचवं स्थान प्राप्त केलं. तिच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या मुंबईच्या पूजा सुर्वे या खेळाडूनं वैयक्तिक सादरीकरणात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तर मुंबईच्याच अक्षता शेट्ये या खेळाडूनं वैयक्तिक अठरा गुणांचा अडथळा पार केला. हे करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.
वर्षाशी बोलत असताना तिच्यात असलेला जबरदस्त आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा आपल्यावरही जादू करतात आणि आपल्याला स्वप्न बघायला लावतात ते ऑलिंपिकचं...! होय, तालबद्ध जिम्नॅस्टिक्सच्या ऑलिंपिक स्पर्धांसाठी पात्रता फेर्‍या सुरू आहेत. आशियाई क्रीडास्पर्धेसाठी सराव करत असतानाच या ऑलिंपिक पात्रतेच्या पहिल्या फेरीचा अडथळाही भारतीय संघानं पार केला आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती दुसर्‍या फेरीच्या निकालाची.
राष्ट्रकुल स्पर्धेप्रमाणेच भारतीय संघ वर्षाच्या मार्गदर्शनाखाली तालबद्ध जिम्नॅस्टिक्सच्या पुढील सर्व स्पर्धांमध्येही नेत्रदीपक कामगिरी करेल, यात शंकाच नाही. त्यासाठी वर्षाला आणि तिच्या संघाला अनेक शुभेच्छा!
----------
मुलाखत मार्गदर्शन : चिन्मय दामले
मुलाखत साहाय्य : ललिता_प्रीति, रैना
प्रकाशचित्रांचे सर्व हक्क वर्षा उपाध्ये यांच्याकडे राखीव.
Posted by Unknown at २:३९ PM 0 comments
Labels: मुलाखत

एक्झिक्युटिव्ह मॅचमेकिंग



मितुल शाह चिडला होता, रागावला होता, संतापला होता, कोपला होता.


मी त्याच्याकडे पोचवलेल्या त्या दुष्ट बातमीचे परिणाम एवढे भयानक होतील ह्याची मला अजिबात कल्पना नव्हती. मी केबीनमध्ये असतानाच त्याची रागारागाने असंबद्ध बडबड चालू झाली होती. रागाचा रोख माझ्यावर नाहीये हे कळल्यावर माझ्या जरा जीवात जीव आला. पण ती बडबड हिंस्त्र झाल्यावर मात्र माझ्या बालमनावर विपरीत परीणाम होऊ नयेत म्हणून मी हळूच केबीनबाहेर सटकले आणि आता जागेवर बसून केबिनमधली सर्कस पाहत होते.


असले भन्नाट घोळ झाले होते ना... स्टॅम्प ड्युटीचं पेमेन्ट अर्जन्ट आहे, दोन दिवसात झालंच पाहिजे नाहीतर पेनल्टी बसेल अशी आज्ञा वरून येऊन एक आठवडा झाला होता. पेमेन्ट अर्जन्ट असण्याची कारणं शोधण्यात द ग्रेट मितुल शाहने दोन दिवस घालवले. तोपर्यंत आम्ही अगदी शहाण्या मुलासारखं काम करून पेमेन्ट स्लॅब्स कोणी सांगायच्या आधीच तयार ठेवल्या तर वर्किंग राँग आहे, स्लॅब्स बदलल्यात, री-वर्किंग करा अशी आज्ञा लायजनिंग डिपार्टमेन्टकडून झाली. त्यात आणखी दोन दिवस गेले. खरं म्हणजे स्लॅब्स लायजनिंग डिपार्टमेन्टनेच द्यायच्या आणि आम्ही फक्त पेमेन्ट प्रोसेस करायचं असा शिरस्ता... पण 'माकड म्हणे......' ह्या स्वभावापायी ते काम आमच्या साहेबावर आणि पर्यायाने आमच्यावर येऊन आदळलेलं....


नव्या नियमाप्रमाणे स्लॅब्स करून पेमेन्ट प्रोसेस करून ते अप्रूव्ह होऊन चेक तयार करून झाला, त्यावर पहिली सही झाली आणि एक दुष्ट बातमी आम्हाला मिळाली की दुसरी सही करणारा केतन पारेख पंधरा दिवस सुट्टीवर आहे... बोंबला!!


पेनल्टी काही साधीसुधी नव्हती... रुपये १,६८,५४०/- निव्वळ पेनल्टीपोटी भरायचे, थोडक्यात, फुकट घालवायचे हे मितुल शाहच्या चांगलंच अंगाशी येणार होतं.


सिग्नेटरीजनी आमच्या परवानगीने सुट्टीवर जावं असं मितुल शाहचं म्हणणं.. आणि प्रत्येक सिग्नेटरीच्या अ‍ॅव्हेलेबिलिटीची खबर ठेवणं ही मितुल शाहची जबाबदारी आहे असं मॅनेजमेन्टचं म्हणणं... खुदा बचाये मितुल शाहको!


मितुल शाह भन्नाट हातवारे करत केबिनमध्ये फेर्‍या मारत होता. फोनचा रिसीव्हर उगाचच उचलून आपटत होता. एकदा तर की-बोर्ड पण धरून आपटला. त्याच्या एकूण हालचालीकडे पाहता हा आता थोड्याच वेळात अंगात आल्यावर घुमतात तसा घुमायला लागेल अशी भिती मला वाटू लागली असतानाच माझ्या डेस्कवरचा फोन वाजला. कॉलर आयडीवर रितूचा नंबर... तिलाही ही सगळी सर्कस दिसतच असणार....


"जल्दी से जल्दी कॅन्टीन में चली आ.."


आँ!! सुकूर??


मी उभं राहून रितूच्या क्युबिकलकडे पाहिलं तर सुकूर, अ‍ॅन्डी, दिव्या, योगेश ही सगळी माकडं रितूच्या टेबलवर बसलेली होती.


"अरे घोड्यांनो, तुम्हाला टेबलवर बसलेलं मितुलने पाहिलं तर हाकलून लावेल तुम्हाला.."


ही सगळी मुलं ट्रेनी म्हणून जॉईन झालेली... कसलंच गांभीर्य म्हणून नाही.


"छोड यार, उसको अभी केतन के सिवा कोई नही दिख रहा है, तू अभी नीचे चल, एक बात करनी है"


"सुकूर..."


"अरे सेकंड सिग्नेटरी छुट्टी पे है तो तू उसको आसमाँन से पैदा करेगी क्या? चल नीचे.."


मी आपली मितुल शाहची लॉयल असिस्टन्ट असल्याच्या थाटात, 'सर, मैं जरा नीचे जाके आती हूं" असं सांगून निघाले.


हो, आपण पापभिरू माणसं... फट् म्हणता ब्रम्हहत्या नको.


"ये योगेश को एक लडकी अच्छी लगती है, उसकी इन्फो निकालनी है..."


पुढ्यातली मॅगी जमेल तशी काट्याने आणि उरलेली हाताने तोंडात सारत अ‍ॅन्डी बोलला.


"वो 'C' ब्लॉक के कॅन्टीनमें दिखती है हमेशा.."


"ये सुकूर हर कॅन्टीनमें आनेवाली हर लडकी की खबर रखता है.."


"चूप बैठ दिव्या... ऐसा कुछ नही. एक दिन योगेशनेही मुझे दिखाया था.."


"और तुम दोनों हमें टांग देके उधर कभी गये थे?"


"वो......वो पराठा खाना था हमें, जो तुम्हें अच्छा नही लगता"


सुकूर आणि दिव्याची जुंपली होती. मी आणि रितू इमानेइतबारे श्रोत्याची भूमिका बजावत होतो.


आणि हे सगळं बोलणं ज्यांच्यासाठी चालू होतं ते योगेशमहाराज आपलं सँडविच संपवून बोलते झाले,


"फोटो है उसका मेरे पास.... मोबाईल से लिया है मैने"


आँ????????


"चार दिन पहले उसको फॉलो भी किया था| वह 'C' ब्लॉकमें सेक्रेटरियल डिपार्टमेंट में घुस गयी.. मै वह मेहतासर की डिपार्टमेंटमें एक लडकेकी पहचान निकालकर दो बार घूम आया लेकिन उस दिन के बाद वह मुझे दिखी ही नही|"


अरे बापरे!! हे म्हणजे फारच रुतलेलं प्रकरण दिसत होतं... पण एकतर्फीच!!


"फोटो दिखा बे... "


"हां, ये देखो... "


सगळे अक्षरशः त्या मोबाईलवर तुटून पडले.


सगळ्यांच्या हातातून फिरत फिरत मोबाईल माझ्याकडे आला तेव्हा स्क्रिनवरचा फोटो पाहून मी भडकलेच...


"कोई दुसरा मिला नही क्या सुबहसे? एक तो मेरे बॉस पे इतनी बडी नौबत आयी है और तुम लोगोंको भी आजही ये मजाक सूझ रहा है..."


"क्या हुवा? क्यूं इतना घुस्सा होती हो?"


"घुस्सा होती हो मतलब... यह बिल्ली का फोटो दिखाने के लिये कॅन्टीनमें लेके आये क्या मुझे?"


"बिल्ली? कौनसी बिल्ली?"


"ये बिल्लीकी इन्फो निकालनी है क्या? ऐसी कोई बिल्ली नही है अपने ऑफिसमें... " हातातला मोबाईल अ‍ॅंडीच्या नाकावर धरत मी किंचाळले.


"बिल्ली?"


"कौनसी बिल्ली?"


"योगेश, उसकी कॅटआईज है क्या?"


"अरे बाबा, वह फोटो स्क्रोल हो गया रहेगा.. मोबाईलमें मेरे घर के भी फोटोग्राफ्स है.. स्क्रोल करके देख तो सही..."


त्या टचस्क्रिन मोबाईलवर मी बोटं फिरवली... चार-पाच फोटो लागोपाठ हलले आणि काहीतरी झालं... मी कुठल्या प्रश्नावर 'येस' दाबलं मला कळलंच नाही..


"कुछ तो हुआ, कोई देखो तो.."


सुकूरने मोबाईल हातात घेतला आणि माझ्यावर दयार्द्र नजर टाकून म्हणाला, "लगता है फोटो डिलीट हो गये|"


हाय रे दैवा!!


माझ्या तोंडावर अपराधी भाव, शंभर सशांची व्याकुळता वगैरे... बाकी सगळे स्टॅच्यू पोझमध्ये आणि योगेशचा राजेश खन्ना झालेला...


NOKIA शिवाय दुसरी कुठली कंपनी मला झेपत नाही हेच खरं..


"अरे यार, कल तेरे हॅंडसेट का बॅक-अप हमने लिया था वह नया सॉफ्टवेअर यूज करके... तेरे कॉम्प पे रहेंगे सारे फोटो.. मेल में अ‍ॅटॅच करके फॉरवर्ड कर सबको"


माझी सख्खी मैत्रिण रितू माझ्या मदतीला धावून आली.


माझ्या तोंडावर कृतज्ञता ओतप्रोत भरलेली... बाकी सगळे सैलावलेले आणि योगेशचा पुन्हा जुगल हन्सराज झालेला..


क्युबिकलमध्ये पाऊल टाकतेय तोच बॉसचा मेसेज कॉम्पवर... socho, kuchh to socho


आता काय डोंबल सोचायचं... कधीचे सांगतोय आम्ही दोनच नकोत, चार तरी सिग्नेटरीज् हवेत... पण ज्युनिअर्सची सजेशन्स सरळ सरळ शिफ्ट+डिलीटच करायची असतात.. मी आपला ok sir चा रीप्लाय देऊन टाकला.


तेवढ्यात एक नविन इ-मेलचं नोटिफिकेशन आलं.


मेलबॉक्सवर क्लिक करेपर्यंत स्क्रिनवर बॉसचा अजून एक मेसेज... we'd aviod penalty...


अर्रे!! माझी सही चालेल का चेकवर? तर करते बापडी..


we can't make pmt from any other a/c असा रीप्लाय दिला... वैतागेल आता.. पण मी तरी काय करू?


तोपर्यंत दुसरा मेसेज बॉक्स ब्लिंक व्हायला लागला : photo dekha kya?


लागोपाठ पहिला मेसेज बॉक्स स्क्रिनवर : good idea!! try to convience SKP for inter company transfer


दुसरा मेसेज बॉक्स : are dekh to sahee


मी : How can I?


कुठलातरी मेसेज बॉक्स : pls reply


कुठलातरी मेसेज बॉक्स : don't u have eyes?


कुठलातरी मेसेज बॉक्स : no reply from u


अरे ह्हो!! श्वास घ्यायला तरी वेळ द्या.. टाईप करण्यासाठी केवळ 'हात' या अवयवाचाच उपयोग होऊ शकतो....


जरा दोन घोट पाणी पिऊन शांतपणे सगळे मेसेज बॉक्स पाहिले.. नेहमीप्रमाणेच गोंधळ झालेला.. बॉसच्या मेसेजचा रीप्लाय सुकूरला दिला गेलेला आणि बॉस बोंबलतोय रीप्लाय दे, रीप्लाय दे...


I can speak to SKP's secy..not SKP directly


असा मेसेज पाठवून दिला जेणेकरून बॉसचा आत्मा शांत व्हावा...


मेलबॉक्स उघडला.. बॉसने मला cc करून SKP च्या Secy ला मेल पाठवून ठेवलेला. नशीब!!


तिला फोन केला तर तिचा फोन बिझी आणि नंतर व्हॉईसमेलवर रीप्लाय 'SKP is not in town my dear'...


छान!सुंदर!!अत्युत्तम!!!


आज एकेक दुष्ट बातम्या पोचवायचं काम माझ्या राशीत लिहिलं होतं बहुतेक....


I m busy ..will c photo later असा मेसेज सुकूरला पाठवून दिला.


बॉसच्या केबिनमध्ये जाऊन पुन्हा एकदा दुष्ट बातमी देण्याचं कार्य पार पाडलं.


तो एकदम ब्लँक होऊन बघत राहिला माझ्याकडे.. सुन्न!!


"एक काम करते है, सेक्रेटरीयल में बोलके सिग्नेटरीज् ही चेंज कर डालते है| एक साईन आप करो और एक साईन मैं करूंगा|"


"सर???"


पेनल्टी भरण्याच्या दडपणापायी बॉसच्या लहान मेंदूवर अतिशय भार आलेला दिसत होता.


"अरे आपके उपर कोई जिम्मेदारी नही रहेगी| आप सिर्फ साईन करो... बाकी सब झेलने के लिये मै तैय्यार हूं| चाहो तो लिख के देता हूं|"


"लेकिन सर, ये कैसे.."


"कोई टेन्शन मत लो| ये सिग्नेटरीज साईन करते है तो उनको क्या मालूम रहता कौनसा पेमेंट है..... हम दोनों साईन करेंगे तो अ‍ॅट लिस्ट ब्लाईंड सिग्नेचर तो नही होगा ना...|"


"सर, वह सब ठीक है| लेकिन यह चेक पर तो केतन सर का सिग्नेचरही लेना पडेगा|"


"वही तो मैं बोल रहा हूं आपको की सिग्नेटरीज बदल डालते है, काम हो जायेगा अपना|"


"सर, वह सिग्नेटरीज बदलने की प्रोसेस एक घंटे में तो पूरी नही होगी... कमसे कम सात दिन लगेंगे उसके लिये| तब तक तो स्टँप ड्युटी भरने की तारीख निकल जायेगी..."


अरे ह्याला कोणी बसवलं रे ह्या व्हाईस प्रेसिडेंटच्या जागेवर??


"हम्म्... कभी कभी आप मतलब की बात करती हो|"


घ्या!!! आता यावर काय बोलणार कप्पाळ?


"वो इंटर कंपनी ट्रान्स्फर के लिये क्या प्रॉब्लेम है?"


"सर, SKP is not in town ये लविनाका मेसेज मैंने अभी दो मिनीट पहले आपको दिया|"


मी मनातल्या मनात आकडे मोजणी सुरू केली. नाहीतर मलाच आकडी यायची पाळी आली असती.


"साले सब डायरेक्टर साथ में व्हेकेशन पे जाते है क्या?"


"........"


"?????"


"सर, केतन पारेख भी out of town है क्या? छुट्टी पें होके भी अगर इधरही रहेंगे तो किसी को भेजके उनका साईन ले सकते है क्या?"


"अरे येस्...ये बात अ‍ॅक्च्युअली मेरे दिमाग में आई थी लेकिन आपके वो इंटर कंपनी ट्रान्स्फर के झमेले में मै भूल गया|"


येssक देऊ का लगावून??....... श्या!! मराठीत आकडे मोजून झाले... इंग्लिशमध्ये, हिंदीमध्येही मोजून झाले.... माचूपिचूंची भाषा यायला हवी होती, चांगलं तोंडसुख घेता आलं असतं.


"I will speak to Ketan Parekh's secretary, meantime you try to use your resources"


बॉस इंग्रजीत बोलतो तेव्हा सिरीयसली कामाला लागतो.


"My resources means?"


"अरे आपका नेटवर्क बहुत स्ट्राँग है ना...जरा पता करनेकी कोशिश करो| अ‍ॅटलिस्ट इतना तो करो..."


संताप, अवहेलना आणि चरफडाट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने मी बाहेर येऊन रागारागाने क्यूबमधली सगळी बटणं बंद करून टाकली. माझ्या डोक्यावरचे दिवे, कॉम्प्युटर, सीपीयू, फॅक्स मशीन सगळंच बंद झालं. मी असंच करते बर्‍याचदा राग आला की... असतील नसतील ती सगळी बटणं बंद करून टाकायची. सारं कसं शांत शांत!!


"प्रिंटर बंद किया क्या... मेरा अ‍ॅग्रिमेंट प्रिंट हो रहा था एटी पेजेस का..." माझ्या शेजारचं क्यूब जोरात किंचाळलं.


"चालू किया है अब...वापस देना प्रिंट" माझा थंड आवाज ऐकून निमूटपणे परत कामाला लागलं.


दहा मिनीटांनी कॉम्प परत चालू करून मेल-बॉक्स उघडला. सुकूरची मेल ओपन करून अ‍ॅटॅचमेंट उघडली आणि स्क्रिन भरून एका सुंदर मुलीचा ब्लर झालेला फोटो!! फोटो क्लिअर नव्हता पण तिचे शार्प फिचर्स नजरेत भरत होते.


"अरे ये तो रुची है!!"


मी दचकून मागे वळून पाहिलं तर बॉस!! क्यूबमधला काळोख पाहून मला केबिनमध्ये बोलवायचं धारिष्ट्य झालं नव्हतं बहुतेक त्याचं..


"ये है मिस रुची केतन पारेख... मैने आपको केतन पारेख की अ‍ॅव्हेलेबिलिटी देखने के लिये कहा, तो आपने उनकी फॅमिली डिटेल्सही निकाली क्या?"


संताप आणि अवहेलनेची जागा आता आश्चर्य, अनपेक्षित जिव्हाळा, कौतुक, उत्सुकता ह्यांनी घेतली. पण जोडीला चरफडाटही दुर्दैवाने होताच..


"सर, ये केतन पारेख की लडकी है? ये तो अपने ऑफिसमें है.."


"हां हां.. अपनेही ऑफिसमें है मेहता के डिपार्टमेंटमें ट्रेनी करके..."


'C' ब्लॉक, सेक्रेटरीयल डिपार्टमेंट, मेहतांचं डिपार्टमेंट.... तुकडे जुळले की जिगसॉ पझलचे!!


"अच्छा, देखो मैने पता करवाया है....केतन पारेख घर पर ही है| उनकी सिग्नेचर हो सकती है..उनकी सेक्रेटरी उनसे बात करनेवाली है, आप उनसे अ‍ॅड्रेस लेके सिग्नेचर लेके आना..."


"सर, मैं? मै सिग्नेचर लेने के लिये जाऊं??" शेजारणीसारखं मला किंचाळायला का येत नाही??????


"अपना काम है भई... अपनेकोही करना पडेगा"


पुढच्या पंधराच मिनीटात माझी वरात निघाली सही घेण्यासाठी.. बॉसने त्याचा रथ आणि चक्रधर उदार मनाने देऊ केले त्यामुळे मित्रपक्षास वर्दी न देताच आम्हांस प्रस्थान ठेवावे लागले.


गाडीतच वेणीफणी उरकून घेतली. डायरेक्टरच्या घरी जायचं होतं... कॉर्पोरेट लूक दिसायला हवा आपला!!


चक्रधराला असल्या चक्रमपणाची सवय असणारंच..


डायरेक्टर साहेबांचं घर देखणंच.. पाय रुतणारी कार्पेटं, दिवसाही लावलेले पिवळे मंद दिवे, डौलदार पडदे, भिंतींवर अगम्य चित्रं, ह्या भिंतीवरच्या चित्रावर त्या भिंतीवरून आणि त्या भिंतीवरच्या चित्रावर पाचव्याच भिंतीवरून प्रकाश सोडणारे दिवे, न दिसणार्‍या एसीची थंडगार हवा, आमच्या घराच्या किंमतींएवढी किंमत असणारे सोफे, बैठका, सेंटर टेबल, कॉर्नर टेबल इत्यादी इत्यादी...


मला सोफ्यावर बसायला सांगून नोकर कुठेतरी आत गुल झाला.


"हाय!! आप योगेश मेहता की डिपार्टमेंटमें हो ना?"


देहापेक्षाही वरताण नाजूक आवाजात माझ्यामागून कोणीतरी किणकिणलं.


मी मागे वळून पाहिलं तर रुची!! थोडीफार कल्पना नशीबाने आधीच मिळाली होती त्यामुळे मला अगदी नाजूकसाच धक्का बसला.


"हॅलो!!" मी गोड हसून अदबीने परतफेड केली. डायरेक्टरची मुलगी... वयाने लहान असली तरी मैत्रीखात्यातलं 'हाय!' तिला कसं म्हणणार?


"आप... आप योगेश की डिपार्टमेंटमें हो ना?"


तिने टाकलेल्या 'दूसरा'ने मी पाsssर गांगरून गेले. तिच्या नाजूक आवाजात आणि दिसण्यात विरघळून गेल्याने माझ्या मेंदूने तिच्या पहिल्या प्रश्नाचा चक्क अनुल्लेख केला होता.


"आप... जानती हो उसको?"


"जानती तो नही.. मालूम है| वह CS रँकर है ना? मुझे दो साल सिनियर है|"


अरे देवा!! योगेश हिची इन्फो काढतोय, ही बया त्याची कुंडली काढून मोकळी...


तेवढ्यात त्यांचा नोकर पाणी घेऊन आला.... आलेल्याला पंधरा मिनीटं बसवून ठेवल्यावर मग पाणी का आणतात बड्या लोकांकडे कोण जाणे.. मी उगीचच पाहिलं, ट्रे, ग्लास काही उंची वगैरे नव्हता. उंची ग्लासातून वेगळंच द्रव्य भरतात ते सोडा, म्हणजे राहू द्या, सोडा असतोच त्यात... पण मी साधी एक्झिक्युटिव्ह.. माझ्यासाठी उंची ट्रेमधून पाण्याचा ग्लास आणायला मी कोण लागून गेले होते?


"मैं अ‍ॅक्च्युअली चेक पर सिग्नेचर लेने के लिए आई थी|"


तिने हिंदीतून सुरूवात केली होती बोलायला, म्हणून आपली मी पण..


"हां, मालूम है... हर्षा मॅडम का फोन आया था| योगेश अभी MBA कर रहा है ना?"


अरे वा!! वडिलांच्या सेक्रेटरीला मॅडम म्हणतेय.. वळण चांगलं दिसतंय.


"योगेश MBA करनेवाला था.. लेकिन अभी LLM करने की सोच रहा है|"


"ओह गॉड!! फायनान्स फिल्ड छोडेगा क्या? वह इधर अकेलाही रहता है क्या?"


चांगल्या वळणावर डेड एन्ड!!!


"हां.. यहां पर अकेलाही रहता है.. उसके मम्मी-डॅडी तो अहमदाबाद में है, उनका वहाँ पर मशीनोंका बडा कारोबार है|"


"मालूम है, योगेश यहाँ पर सिर्फ एक्सपिरिअन्स के लिए आया है| दो-चार साल बाद अहमदाबादमें ही वापस जायेगा| मेरी बडी सिस्टर अभी वही पे तो है|"


योगेश नक्की कोणाच्या ओळखीचा? पहिल्या दोन वाक्यांचा तिसर्‍या वाक्याशी संबंध काय? हे मला कसले सिग्नल्स मिळताहेत?


तेवढ्यात अगदी घरगुती वेषात डायरेक्टरसाहेब अवतीर्ण झाले म्हणून मला माझं रडार बंद करावं लागलं.


"गूड आफ्टरनून सर!!"


"गूड आफ्टरनून बेटी| माफ करना, मेरी छुट्टीके कारण आपको तकलीफ उठानी पडी|"


अरे काय!! मला अगदी गहीवरूनच आलं.. एक डायरेक्टर एका एक्झिक्युटिव्हला 'माफ करना' म्हणतो म्हणजे काय?


"सर, कोई तकलीफ नहीं| आखिर पेमेंट टाईम पे होना जरूरी है, विदाऊट एनी पेनल्टी|"


"सही बात है बेटी| आप जैसे नेक लोग हमारे साथ है इस लिए कंपनी दौड रही है|"


आता गहीवरण्याचा कडेलोट होऊन मी त्यांच्या कुशीत वगैरे शिरेन ह्या भीतीने मी बसल्या जागेवरूनच चेकचं एन्व्हलप काढून त्यांच्या हातात दिलं.


"बडी बेटी की शादी थी इस लिए मैं छुट्टी पे था|" नोकराने ट्रे भरून आणलेल्या मिठाईकडे हात दर्शवत डायरेक्टर साहेब म्हणाले. यावेळी ट्रे उंची होता आणि मोठ्ठाही होता, मिठाई पण उंची होती, पण ती ट्रेभर गोssड मिठाई पाहूनच मला अजिर्ण झालं. गाढवाला गूळाची चव काय?


"शादी इधर थी या..."


"अहमदाबादमें बेटी, अहमदबादमें...आप मूँह तो मिठा करो|"


आता मूँह मिठा करायचं म्हणजे एवढ्या भरलेल्या ट्रेमधून मिठाईचा एक तुकडा उचलायचा की एक कण उचलायचा, एकट्यानेच खायचा की त्या दोघांनाही 'आप ले लो' म्हणायचं किंवा कसं काय ते न सुचून मी शांतच राहिले. तेवढ्यात रुचीही उठून आत निघून गेली.


"घर एकदम खाली हो गया| बेटी की बिदाई बडी तकलीफ देनेवाली बात है|"


"सही है...."


"आप अपने पिताजी दर्द समझती हो बेटी| मुझे तो ये दो ही बिटीया... एक की शादी कर दी अभी ये छोटीवाली के लिए कोई अच्छा सा लडका देखना है|"


"सर!! अपने ऑफिसमेंही एक अच्छा लडका है रुची के लिए| योगेश मेहता नाम है उसका... CS रँकर है, अभी LLM कर रहा है| अपने सेक्रेटरियल डिपार्टमेंटमें मॅनेजर रँक फाईव्ह पे काम कर रहा है| रुची से दो साल बडा है| रुची भी CS है, दोनोंका फिल्ड सेम ही है| उसके घर का भी बहुत बडा ..." मिठाई खाता जीभ चावली गेली म्हणून थांबले ती थांबलेच...


न कळे काय घडला प्रमाद हा? काय म्हणून मी हे बोलून गेले सगळं? त्यांनी 'बेटी, बेटी' म्हणून आपल्याला आदर दिला त्याचा गैरफायदा घेतला का आपण? की रुचीचे पॉझिटीव्ह सिग्नल्स आपण ओळखले म्हणून बोलायचं धाडस केलं? की योगेशच्या मोबाईलमधला फोटो डिलीट झाल्याचा अपराधी भाव कुठेतरी मनात होता, त्याची ही भरपाई होती? काहीही कारण असूदे, मी भयंकर आगाऊपणा केला होता. आता काय म्हणेल एवढा मोठा माणूस? जाऊ दे!! आपली कीव करेल फारतर.. नाहीतरी साधे एक्झिक्युटिव्ह आपण.. पुढे कधी काय संबंध येणार आहे ह्यांच्याशी....


"सॉरी सर!!"


"अरे सॉरी नही बेटी.. अच्छी बात कही है आपने| आज का दिन ही अच्छा है| आज सब नेक काम हो रहे है| हम HR से वह लडकेकी सब इन्फॉर्मेशन निकालेंगे बेटी|"


"ठीक है सर.. मैं निकलू?? रुची??"


"आ रही है.. एक मिनीट|"


रुची हातात एक कसलातरी बॉक्स घेऊन बाहेर आली.


"यह शादी की मिठाई ले जाना बेटी|"


"बाय..."


रुचीचा गोड आवाज कानात साठवत, भयंकर अपराधीपणाचे भाव मनात घेऊन मी निघाले. त्यातल्या त्यात एक ठीक होतं की चेकवर सही झाली होती.


ऑफिसला परतले तेव्हा पुढचा दोन दिवसांचा विकएन्ड साजरा करण्यासाठी सगळे वेळेत पळाले होते. मितुल शाहला चेकवर सही झाल्याचा SMS पाठवला. त्यावर त्याचा रीप्लायः "Ok, arrange for pmt on Monday"


well done नाही, Good नाही, thanks नाही...काहीही नाही.


रितू एकटीच काहीतरी आवराआवर करत बसली होती. विषण्ण मनाने तिच्याकडे जाऊन सगळा वृत्तांत तिला दिला.


आधीच मोठे असलेले डोळे अजून वटारत ओरडलीच ती, "अरे यार, यह क्या कर दिया तुमने? योगेश सिर्फ 'अच्छी लगती है' इतनाही बोला था.. तुमने तो उसको 'मिस्टर ग्रूम' ही बना डाला..."


"अरे वो बोला तो था इन्फर्मेशन निकालनी है.. "


"हां लेकिन इसका मतलब ये तो नही होता की उसको उसके साथ शादी करनी है| ये आजकल के लडकोंका ऐसा नही होता माय डियर| उनको कोई कमिटमेंट नही चाहिये|"


"ओह गॉड रितू.. अभी क्या होगा? मैं क्या करू? योगेशको फोन करके सब बोलू क्या?"


"तू अभी कुछ मत कर... योगेशको मै बोलती हूँ| और ग्रूपमेंभी कुछ बोलने की जरूरत नही है, समझी? अभी आरामसे घर पर जा|"


मी वेडपटासारखी मान डोलावत तिथून निघाले.


रविवारी सकाळी योगेशचा SMS : m going to ABD. talk to u later


हरे राम!! रागावला वाटतं माझ्यावर..


सोमवार, मंगळवार फारसं काही घडलं नाही ऑफिसात... नेहमीची कामं शांतपणे सुरू होती. रितूचं बाळ अचानक आजारी पडलं म्हणून ती सुट्टीवर होती. योगेश नव्हता त्यामुळे दिव्या, अ‍ॅन्डी, सुकूर इत्यादी मंडळीही तशी शांत होती.


बुधवारी सकाळी मी ऑफिसला आले तर माझ्या टेबलवर चॉकलेट्सचा मोठ्ठा बॉक्स आणि त्यावर लेबल, Thanks a lot!! no more words to express, YR


मी बॉक्स उलट सुलट करून पाहिला, पाठवणार्‍याचं नाव कुठेच नाही. चुकून माझ्या टेबलवर ठेवला गेला असेल असं समजून अ‍ॅडमिनला फोन केला तर मॅनेजर म्हणे तुमच्याचसाठी आहे. मी अवाक्!!


कॉम्प चालू केल्या केल्या धडाधड चार पाच मेसेज बॉक्सेस, Hurray!!, u r gr8, thx a lot, wonderful!!


मला कळेचना की काय चालू आहे ते.. मेसेजेस सगळे ग्रूपमेंबर्सकडून आले होते. कशाबद्दल सगळे एवढे माझ्यावर खूष झालेत??


धावतच रितूकडे गेले, पण मॅडम आजही आल्या नव्हत्या. मग सुकूरचं टेबल गाठलं. मला पाहून तो इतका एक्साईट झाला की ऑफिसात त्याने नाचणं बाकी ठेवलं होतं.


त्याच्याकडून कळलेली हकीकत अशी की मी केतन पारेखच्या घरून बाहेर पडल्यावर माझी सगळी बडबड त्यांनी रुचीला ऐकवली. त्या सग़ळ्याबद्दल रुचीची काही हरकत नाहीये, उलट तिलाच त्याच्यात विशेष रस आहे हे ऐकून त्यांनी ताबडतोब पावलं उचलली होती. HR President कडून योगेशशी संबंधित संपूर्ण माहिती मागवून शनिवारीच त्याच्या आई-वडिलांशी संपर्क साधला होता. योगेशचे आई-बाबा थोडीच एवढं चांगलं 'स्थळ' हातचं जाऊ देणार होते? त्यांनी ताबडतोब योगेशला बोलावून घेतलं, त्याच्यासमोर थेट लग्नाचाच प्रस्ताव मांडून त्याचा होकार वदवून घेऊन सोमवारी इकडची मंडळी अहमदाबादला जाऊन साखरपुड्याची, लग्नाची बोलणी करून मंगळवारी परत आली होती. लगेचच्या रविवारी साखरपुडा इकडे.. आणि तीन महिन्यांनी लग्न!! झट मंगनी पट ब्याह!!


मला चक्करच यायची बाकी होती. टेबलवर ठेवलेल्या चॉकलेटच्या बॉक्सचा उलगडा झाला आणि त्या मेसेजमधल्या YR चाही..


तेवढ्यात बॉसचा मला फोन आला, "क्या किया आपने? KP से नोट आई है, जिसमें लिखा है Pls. send your assistant, Ms. Executive Matchmaking.. क्या है ये? what is this?"


"सर, मैं उनसे मिलके आती हूँ और बताती हूँ आपको|" मी हसत हसतच त्याला बोलले.


Executive Matchmaking...


माणूस करायला जातो एक.. आणि घडतं भलतंच! नकळत कधीतरी आपल्याकडून भलतीच अतर्क्य कृती घडून जाते आणि मग खात राहतं आपलं मन... पण त्याचा परिणाम असा चांगला झाला, मंगल झाला तर काय बहार येते.


आगाऊपणा कधी कधी कल्याणप्रद ठरतो तो असा.


त्यामुळे वाचकहो, माझा एक फुकट सल्ला तुम्हाला... स्वभावात नसला तरी आवश्यक तिथे आवश्यक तेवढा आगाऊपणा नक्की करा....भीडभाड, संकोच, मर्यादा न बाळगता.. कोण जाणे कदाचित कोणाचंतरी आयुष्यही घडवून जाईल.
Posted by Unknown at २:१७ PM 0 comments
Labels: कथा

प्लँचेट

दुपारी जेवायच्या पानावर बसल्यापासून मी बघत होते सगळ्यांना.... काहीतरी गुफ्तगू चालू होतं त्यांचं आपापसात. रश्मीताई, वंदू एकमेकींच्या कानात काहीतरी सांगत होत्या आणि सुनीलदादा, अभि, ऋषीदा वगैरे मंडळी मुक्यांनेच खाणाखुणा करून 'वर, वर' असं काहीतरी बोलत होते. आप्पा जेवायला आले तशी सर्वांची बोलती बंद झाली आणि मुकाटपणे सगळे जेवू लागले. हात धुवायच्या वेळी मी ऋषीदाला गाठलंच...
"काय ठरवताय तुम्ही? मी पण येणार..."
"अनु, तू नको येऊस... आमची मोठ्या लोकांची मीटिंग आहे, तुझं काय काम तिथे?"
"नाही, तुम्ही लोक 'वर, वर' असं काहीतरी बोलत होतात, मी येणार म्हणजे येणार.."
"अनु, नको गं प्लीज, तू घाबरशील तिकडे, तू झोप ना आजीजवळ.. प्लीऽऽज" ऋषिदा अजिजीने म्हणाला.
"म्हणजे तुम्ही खरंच माडीवर जायचं ठरवताय.. मी येणारच" मी अगदी हटून बसले होते.
"बघ तू माझं ऐकलंस तर मी माझ्या वाटणीतले दोन आंबे तुला देईन..."
"तुम्ही कॅनेस्ट्रा खेळलात तरी मी त्रास नाही देणार, बाजूला बसून बघेन, हवं तर मार्क पण लिहून देईन, पण मी पण येणार माडीवर..." मी जरा मस्काबाजी करायचा प्रयत्न केला.
"कॅनेस्ट्रा नाही गं...तुला सांगितलं ना महत्त्वाचं काम आहे म्हणून... हवं तर आमचं काम झाल्यावर तुला मी बोलावीन, पण तू सुरुवातीपासून येऊ नकोस." जरा आवाज चढवतच ऋषिदा म्हणाला.
"मी आप्पांना सांगेन.... " मी शेवटी ब्रम्हास्त्र काढलं.
कोकणातल्या आजोळच्या घरावरची माडी हे आम्हां सगळ्याच भावंडांसाठी एक मोठं आकर्षण होतं. संपूर्ण घरात आता शहरी सोयी करून घेतल्या होत्या आप्पांनी.. पण डाव्या बाजूकडला वरचा भाग... ज्याला 'माडी' म्हणत असत.. तो मात्र तसाच ठेवला होता. तिथल्या लाकडी फळ्या टाकून तयार केलेल्या जमिनीवरून चालताना मस्तपैकी धाऽऽड धाऽऽड असा आवाज येत असे. माडीला असलेल्या गॅलरीतून घराच्या कौलांवर उड्या टाकता यायच्या. कौलांवर उतरलं की थोडं उतरून मागच्या अंगणातल्या आंब्याच्या झाडाची फांदी पकडून सहज झाडावर चढता येत असे. माडीच्या भिंतींना दिलेला गडद निळा आणि पोपटी रंग, कोनाडे आणि छताच्या उंचीवर असणारे झरोके यामुळे तिथलं वातावरण अगदी गूढ बनलेलं होतं. जुने पण महत्वाचे कागदपत्र माडीवर ट्रंकांमधून भरून ठेवले होते. तिथे फारसा कोणाचा वावर नसे त्यामुळे साफसफाईही जेमतेमच असायची आणि त्यात अडगळीचंच सामान असल्याने उंदारांचा वावरही जोमाने होता. त्यामुळे आजी किंवा आप्पा आम्हां मुलांना तिथे जायला देत नसत.
पण आज सुनीलदादा आला होता. तो असल्यावर सगळीच मुलं अगदी बिनधास्त असत. तो काय काय युक्त्या करून आप्पांना पटवत असे. आप्पांचा भारी विश्वास होता त्याच्यावर.... पोलिस इन्स्पेक्टर होता ना तो. त्याच्या जबाबदारीवर ही सगळी भुतावळ माडीवर जमणार होती. मी जरी सगळ्यांच्यात लहान असले तरी ही मुलं माझ्यावर दादागरी कधीच करीत नसत. अप्पांच्या धाकाने की काय माहित नाही, पण सगळेच जण मला सांभाळून घेत असत.
आमची टोलेबाजी चालू होती तिथे रश्मीताई आली आणि एकूणच माझा तक्रारीचा सूर पाहून ऋषीदाला म्हणाली,"येऊ दे रे अनुला पण, शेवटी तिच्यामुळेच तर आपल्याला ते प्रकरण कळलं. आणि अनु, एक लक्षात ठेव, आम्ही मोठे माडीवर जे काही बोलू त्यातलं एक अक्षरही आजी किंवा आप्पांना कळता कामा नये, कळलं?"
मी आज्ञाधारकपणे मान हलवली. ती काय 'प्रकरण' वगैरे म्हणाली त्याचा संदर्भ मला फारसा कळला नाही पण मीही फारशी खोलात शिरले नाही. नाहीतर मग मला माडीवर जायला मिळालं नसतं.
मी रश्मीताईबरोबर माडीवर पोचले तर तिथे बरीच मंडळी आलेली दिसली. ऋषीदा, सुनीलदादा, अभि, वंदू वगैरे होतेच आणि संध्याताई बरोबर नयना पण आलेली होती. मला तिथे पाहून नयनाने लगेच तोंड वाकडं केलं. मी काही लक्ष दिलं नाही तिच्याकडे. सुर्‍या आणि विशू पण दिसले. मोठाच प्रोग्रॅम ठरवलेला होता. खाली आजी, आप्पांना ह्याचा काहीच सुगावा लागलेला दिसत नव्हता. सुनीलदादाने काहीतरी जोरदार थाप मारून माडीची किल्ली मिळवलेली होती.
ह्या लोकांचा खेळ चालू झाल्यावर माझा गॅलरीतून कौलांवर जायचा प्लॅन होता. एक टपोरलेला शेंदरी आंबा मी सकाळीच हेरून ठेवला होता. पण सुनीलदादाने माडीवर ठेवलेल्या ट्रंकेच्या मागून एक बोर्ड काढला आणि सगळ्यांचेच डोळे विस्फारले. एका फडक्याने तो बोर्ड स्वच्छ पुसून त्याने खोलीच्या मधोमध ठेवला आणि त्याच्या भोवती पाणी शिंपडले. त्या बोर्डच्या चारही बाजूंनी A ते Z पर्यंत अक्षरं काढलेली होती. आणि 1 ते 9 आकडे पण होते. बरोब्बर मध्यभागी तीन गोल काढले होते, त्यात डाव्या बाजूच्या गोलात 'yes'' आणि उजव्या बाजूच्या गोलात 'no' असं लिहिलं होतं. मधला गोल रिकामाच होता.
"हे काय आहे?" मी रश्मीताईला ढोसलं.
तेव्हा 'श्श्ऽऽऽ' असं करून ती हलक्या आवाजात पुटपुटली, "ह्याला प्लँचेट म्हणतात, बोलायचं नाही हां अजिबात हे चालू झाल्यावर...कळलं ना?"
मी जोरात मान हलवली.
सुनीलदादाने वंदू आणि ऋषीदाला खुण केली तशी ती दोघं त्याच्याबरोबर त्या बोर्डच्या बाजूला बसले. सुनीलदादाने एक पितळेची पंचपात्री त्या मधल्या गोलात ठेवली आणि हात जोडून डोळे मिटले. वंदू आणि ऋषीदाने पण डोळे मिटले सुनीलदादाने मोठ्याने 'हूँऽऽऽ' असा आवाज काढला. केवढ्याने घुमला तो आवाज माडीवर.... नयनाने तर संध्याताईला घट्ट धरून ठेवलं. मला हसूच आलं तिचं.. भित्री भागूबाई कुठली!!
आता सुनीलदादा चक्क घुमायला लागला होता... नवरात्रातल्या अष्टमीच्या दिवशी त्या कुंकवाने माखलेल्या बायका घागर घेऊन हुंकार काढत घुमतात ना अगदी तस्साच घुमत होता तो.... मला कंटाळा यायला लागला म्हणून मी उठून जायला लागले तर रश्मीताईने माझा हात धरून बळेच खाली बसवलं मला.. तिथे बसलेल्या सर्वांचेच डोळे अक्षरशः बटाट्यासारखे झाले होते. थोडा वेळ घुमल्यावर सुनीलदादा शांत झाला... त्या तिघांनीही त्या पंचपात्रीवर आपल्या उजव्या हाताची अनामिका ठेवली.
वंदू मग सर्वांना म्हणाली, " ती आलीये.. आता कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारा... पण एकामागून एक विचारायचे, कोणीही दंगा करायचा नाही.."
"ती म्हणजे कोण गं?" मी हळूच रश्मीताईला विचारलं.
"पणजी आजीचं भूत... ती आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार.. तू विचारलास तरी चालेल प्रश्न.." रश्मीताईने कुजबुजत उत्तर दिलं.
आयला! सहीच!! पणजी आजी आली होती आणि ती प्रश्नांची उत्तरं देणार होती. सुनीलदादाला काय काय किती किती येतं... भन्नाटच आहे तो... मला एकदम अभिमानच वाटला त्याचा.
सुरुवातीला कोणी काहीच बोललं नाही. नयना तर नुसती थरथर कापत होती. सुर्‍याचा एकदम ठोकळा झाला होता.
शेवटी मग रश्मीताईने विचारलं, "मला मेडिकलला ऍडमिशन मिळेल का?" तिची आत्ताच बारावीची परीक्षा झाली होती.
काहीच झालं नाही. मग ऋषीदाने परत तोच प्रश्न विचारला, तेव्हा ती पंचपात्री जागच्या जागी थोडी फिरली मग अगदी हळूहळू सरकत 'yes' वर जाऊन परत मधल्या गोलात आली.
मी तोच विचार करत होते की पणजी आजी कशी देणार उत्तरं... समजा ती बोलली तर सर्वांना ऐकू येईल का? कारण ती गेली त्याआधी बरेच दिवस तिच्या तोंडातून आवाजच येईनासा झाला होता. पण हा प्रकार सहीच होता. रश्मीताई एकदम खुश झाल्यासारखी दिसत होती.
मग सुर्‍याने पण विचारलं त्याच्या दहावीच्या मार्कांबद्दल.... तर त्या पंचपात्रीने सरकत जाऊन ६ आणि ९ असे आकडे दाखवले. म्हणजे त्याला ६९% मिळणार होते. विशूने त्याची हरवलेली मांजर मिळेल का असं विचारलं तर 'yes' असं उत्तर आलं. पण 'कुठे मिळेल?' ह्या प्रश्नावर मात्र ती पंचपात्री काहीच बोलली नाही.... म्हणजे कुठेच फिरली नाही.
"पणजी आजीला इंग्लिश कुठे येत होतं?" मी हळूच अभिला विचारलं. हसायलाच लागला तो मोठ्याने... सुनीलदादाने रागाने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा गप्प झाला.
"अगं पणजी आजी आता स्वर्गात गेली ना, म्हणजे आता तिला सगळ्याच भाषा येतात.." रश्मीताईने मला समजावलं.
मला मज्जाच वाटली खूप... मीही मग माझ्या स्कॉलरशिपबद्दल विचारलं तर आधी काहीच उत्तर आलं नाही, मग वंदूने परत तोच प्रश्न विचारल्यावर पंचपात्री झपकन 'yes' वर गेली.
यूssहू ssss म्हणजे मला स्कॉलरशिप मिळणार होती तर....
मग अभिने संध्याताईच्या लग्नाबद्दल विचारलं तेव्हासुद्धा ती पंचपात्री 'yes' वर गेली. संध्याताईने एक धपकाच घातला त्याच्या पाठीत... पण हळूहळू आता सगळ्यांनाच त्या खेळात गंमत वाटू लागली होती. रश्मीताईने विचारलं की संध्याताईला कुठलं सासर मिळेल? तेव्हा पंचपात्रीने U, S, A अशी अक्षरं दाखवली.
हूssss अम्मेरिका...... सगळेच एकदम हुरळून गेले. संध्याताईचे गाल एकदम लाल लाल दिसायला लागले.
मग विशूने नयनाला प्रश्न विचारायचा आग्रह केला. ती काहीच बोलायला तयार होईना. विशू म्हणाला की मीच तिच्या वाटचा प्रश्न विचारतो... तर सगळेजण त्यालाच 'विचार, विचार' असं म्हणायला लागले. मग त्याने तोच संध्याताईचाच प्रश्न विचारला... म्हणजे लग्नाचा... नयना तर रागाने उठून जायला लागली पण संध्याताईने तिला अडवलं. सुनीलदादा आणि वंदूने एकमेकांना डोळ्यांनी काहीतरी खुणावलं... आणि रश्मीताईकडे पाहिलं तर तिनेही 'हो' म्हटल्यासारखी मान हलवली.
अभिने परत प्रश्न विचारला की नयनाचं लग्न होईल का? आणि झालं तर कोणाशी होईल... ती पंचपात्री आधी 'no' च्या दिशेने सरकत होती पण मध्येच थांबली आणि 'yes' वर जाऊन परत मधल्या गोलात आली. नयनाचा चेहरा जाम घाबरलेला दिसत होता... शी!! घाबरायचं काय त्यात... लग्न तर होणारच ना... संध्याताई घाबरली का? आता ती पंचपात्री इंग्लिश अक्षरांच्या दिशेने जायला लागली होती. R, O, S, H ही अक्षरं दाखवातच मी जोरात ओरडले, "रोशन!! रश्मीताई रोशनच.... मी तुला म्हटलं ना त्या दिवशी..."
नयना ताडकन् उठून उभीच राहिली. माझ्याकडे पाहून रागारागाने ओरडायला लागली,"हिच्यामुळे वाट लागली माझी... चुगलखोर कुठली.. उगाच घेऊन गेले तुला बाजारात त्या दिवशी.... लगेच घरी येऊन सांगायची काही गरज होती का?"
खरी होती तिची गोष्ट..... आजीने सांगितलं म्हणून मी गेले होते तिच्याबरोबर बाजारात त्या दिवशी.. तेव्हा तिला तो भेटला होता... शी!! कसातरीच होता तो एकदम... कानात काहीतरी रिंगसारखं घातलं होतं.. शर्ट असाच पँटच्या बाहेर आला होता... त्याच्या हातात सिगरेट होती आणि ओठ पण एकदम पान खाल्ल्यासारखे लाल लाल झाले होते. त्याच्या कपाळावर शिवण मारल्यासारखी एक मोठ्ठी खूण होती. खूपच रागीट दिसत होता तो त्यामुळे....तो कपाळावरचे केस मागे सारत होता तेव्हा ती खूण अगदी स्पष्टपणे दिसली मला..... नयनाला पाहून त्याने चक्क शिट्टी मारली... नयना पण गेली त्याच्याकडे धावत... एकदम माझा हात सोडून... किती वेळ मी एकटीच उभी होते तिथे.... ते दोघे दुकानाच्या आत जाऊन पडदा लावून बोलत होते किती तरी वेळ.... उभं राहून राहून माझे पाय दुखायला लागले... खुप वेळाने नयना बाहेर आली आणि मग मागे पाहून तो दिसेनासा होईपर्यंत त्याला टाssटा करत होती. तिला टाटा करताना पचकन् थुंकला तो.... शी!! घाणेरडा कुठला... मला एकदम घाणच वाटली त्याची... मी घरी येऊन रश्मीताईला सगळं सांगितलं... तेव्हा ती मोठे मोठे डोळे करून परत परत मला त्या मुलाबद्दल ती खोदून खोदून विचारत होती. मला तो मुलगा आवडला नव्हता एवढंच मी रश्मीताईला सांगितलं होतं.. ह्यात नयनाची कुठे मी चुगली केली होती? काही पण बोलते... बावळट कुठली!!
बराच वेळ नयना मोठ्या मोठ्याने ओरडत होती. माझ्याकडे रागारागाने बघत होती. मी रश्मीताईचा हात घट्ट पकडून ठेवला होता. काय माहीत.... मला मारायला वगैरे आली तर काय करायचं? पण तसं काही झालं नाही. बराच वेळ ओरडून बोलल्यावर ती एकदम खालीच बसली... आणि रडायला लागली.
वंदूने एव्हाना प्लँचेटचं सगळं सामान आवरून ठेवलं होतं. पणजी आजी कुठे गेली कोणास ठाऊक...
नयना जरा शांत झाल्यावर सुनीलदादाने तिच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केली. ती रोशनला कशी ओळखते? कधीपासून ओळखते? तुम्ही दोघे कुठे भेटता? भेटता तेव्हा अजून कोणी बरोबर असतं का? त्याचं घर कुठेय माहित्ये का वगैरे वगैरे.... नयना जमेल तशी तुटक तुटक उत्तरं देत होती. सुनीलदादा सकाळी आला तेव्हा त्याने मलाही त्या रोशनबद्दल काय काय विचारलं होतं. तो कसा दिसतो? साधारण किती उंच आहे? त्याच्या कपाळावरच्या खुणेबद्दलही त्याने परत परत मला विचारलं. शेवटी मी त्याला एक काटकी घेऊन मातीत ती खूण काढून दाखवली. मला फक्त तो 'शाब्बास' एवढंच म्हणाला. पण सुनीलदादाचा मला रागच आला. सकाळी मी त्याला म्हटलं की तुझ्या लाल दिव्याच्या गाडीतून मला एक चक्कर मार गावात तेव्हा मारे म्हणाला की 'मी एका ऑपरेशनवर आलोय, मला वेळ नाहीये तुझे लाड करायला'... मला फिरवायला वेळ नव्हता ह्याला मग आप्पा-आजीच्या नकळत हे प्लँचेट वगैरेचे धंदे करायला बरा वेळ आहे... आणि पोलिस काय करतात ऑपरेशन?
रोशन चांगला मुलगा नाहीये, त्याचे काय धंदे चालतात ते तुला माहीत नाही वगैरे काय काय सांगून सुनीलदादा आणि अभि नयनाला समजावत होते. पण ती हट्टीपणाने एकच एक म्हणत होती की आम्ही दोघे लग्न करणार आहोत.... शी!! रोशनशी लग्न? इतक्या घाणेरड्या मुलाशी? नयनाने रोशनशी लग्न केलं तर आप्पा तिला ठेवतील का कामावर?
त्यांचं बराच वेळ बोलणं चालू होतं. खालच्या चटईवर मी कधी झोपले तेच मला कळलं नाही. जाग आली तेव्हा माडीवर फक्त रश्मीताई, वंदू, सुर्‍या, अभि, संध्याताई आणि सुनीलदादा होते. विशु नयनाला घेऊन घरी गेला होता. सुनीलदादाने मला जवळ घेतलं आणि पुढच्या वेळी गाडीतून फिरवायचं प्रॉमिस केलं.
संध्याताई रात्रीच्या गाडीने मुंबईला जायची होती. आप्पांना सांगून नयनाला मी माझ्याबरोबर घेऊन जाते असं ती म्हणत होती. सुर्‍यानेच म्हणे तसं तिला सुचवलं होतं. इथलं वातावरण निवळलं की तो नयनाला आणायला संध्याताईकडे जाणार होता. कसलं वातावरण कोणास ठाऊक... सगळ्यांच्याच चेहर्‍यावर टेन्शन दिसत होतं.
सुनीलदादा जसा अचानक आला तसाच अचानक गेलासुद्धा...... तो खरं म्हणजे रात्री परत जाणार होता. बरीच तयारी करायला हवीये वगैरे काहीतरी म्हणत होता. नयनाने संध्याताईबरोबर जायला खूपच कटकट केली. पण सुर्‍याने तिचं सामान आधीच गाडीत ठेवलं होतं आणि अभिने बळजबरीनेच तिला गाडीत बसवलं. ती खूप रडत होती, 'एकदाच मला त्याला भेटू दे' असं म्हणत होती. पण अभिने तिचं अजिबात काही चालू दिलं नाही.
नंतरचे चार-पाच दिवस अगदीच कंटाळवाणे गेले. रश्मीताई, वंदू, ऋषीदा वगैरे सगळेच खूपच टेन्शनमध्ये वाटत होते. डोंगरावर करवंदांच्या जाळीतसुद्धा यायला कोणी तयार नव्हतं. मी मध्येच एकदा वंदूला म्हटलं पण की आपण पणजी आजीला परत बोलावू या का? तर त्यावर ती म्हणाली की हे प्लँचेट वगैरे काही खरं नसतं! खरं नसतं तर मग केलंच का त्या दिवशी माडीवर? उगाच नाटक करायला का? सतत चार वर्ष दहावीला बसतोय सुर्‍या...... त्याला दहावीला ६९% मिळणार म्हणजे मग झालंच त्याचं कल्याण.. ह्याचा अर्थ माझं स्कॉलरशिपचं पण खोटंच होतं. आणि संध्याताईची अमेरिका पण खोटीच होती.
रश्मीताई सतत माझ्या मागे मागे असायची... पण न बोलता. बाजारात जाऊन फिरून येऊया का म्हटलं तर घाबरून नको म्हणायची. म्हणे त्यांनी तुला बघितलंय नयनाबरोबर... मला काही कळतच नव्हतं त्यांचं बोलणं. सुनीलदादासकट सगळ्यांचाच राग येत होता. कोणाशीही बोलावंसं वाटत नव्हतं. आई बाबांची सारखी आठवण येत होती. कधी एकदा सुट्टी संपून मुंबईला त्यांच्याकडे जातोय असं झालं होतं.
एक दिवस मात्र सक्काळी लवकर अभि स्टँडवर जाऊन खूप सारे पेपर घेऊन आला. सगळ्या पेपरच्या पहिल्या पानावर सुनीलदादाचा मोठा फोटो होता. आणि अख्ख्या पेपरभर त्याच्याबद्दल छान छान सगळं लिहिलं होतं. त्याने म्हणे एक गँग पकडली होती. ती गँग रात्रीच्या वेळी किनार्‍यावर येणार्‍या बोटींतले खोके आपल्या गाडीतून आणून कुठे कुठे लपवून ठेवायची. आणि परत आपल्या गाडीतून कुठे लांब लांब पोचवायचीसुद्धा....
रश्मीताईला मी विचारलं गँग आणि खोक्यांबद्दल... ती एवढंच म्हणाली, "बाँबचं सामान असायचं त्या खोक्यांमध्ये... तू त्या रोशनचा पत्ता सांगितलास म्हणून सुनीलदादा एवढं सगळं शोधू शकला."
मी म्हटलं, "मला नाही माहीत रोशनचा पत्ता वगैरे आणि मी आधी कधी त्याला पाहिलंही नाहीये इथे गावात.."
तर ती म्हणाली, "कोणीच पाहिलं नव्हतं त्याला... पण तू त्याच्या कपाळावरची ती खूण सांगितलीस ना त्यावरूनच सुनीलदादाने अंदाज बांधला.. आणि तो अंदाज खरा ठरला. मग नयनाकडून त्याच्याबद्दलची माहिती विचारून घेतल्यावर त्याला शोधून काढणं फारसं कठीण नाही गेलं. पण त्याची पाळंमुळं शोधायला बराच त्रास झाला सुनीलदादाला..."
माय गॉड!! म्हणजे रोशन त्या गँगमध्ये होता. शी!! नयना पण वेडीच आहे, असं गँगमधल्या माणसाशी कोणी लग्न करतं का....
आप्पांना आणि आजीला मग अभिने सगळंच सविस्तर सांगितलं. आप्पा तर आपल्या नातवावर एकदम खुश झाले होते. आजीने ऋषीदाला मिठाई आणायला बाजारात पिटाळलं. मग दिवसभर कोण ना कोण तरी घरी येत-जात होते. आप्पांचं, सुनीलदादाचं अभिनंदन करायला... आप्पा सगळ्यांना मुद्दाम माझ्याबद्दलही सांगत होते, माझं कौतुक करायला सांगत होते.
दोन दिवसांनी सुनीलदादा घरी आल्यावर एक जंगी मेजवानी दिली आजीने सर्वांना.... गावाने त्याचा सत्कारही केला. मज्जाच मज्जा सगळी.... मधल्या चार-पाच दिवसांचा कंटाळा एकदम पळूनच गेला. पण आमची सुट्टी संपत आली होती. त्यामुळे मुंबईला जाणं भाग होतं.
आम्ही आजीकडून निघालो तेव्हा आप्पांनी मला बक्षिस म्हणून आंब्याची एक पेटी जास्त दिली इतरांपेक्षा.... नयनाची आई गंगूमावशी सारखी येऊन मला कवटाळत होती. 'माझ्या बायच्या डोक्यावरचं भूत उतरवलंस' असं काहीतरी म्हणत होती. मी तिला कित्ती सांगितलं की ते भूत वगैरे खोटं असतं तरी तिचं माझ्या डोक्यावरून हात फिरवून कडाकडा बोटं मोडणं चालूच होतं.
मुंबईला गेल्यावर मैत्रिणींना सांगायला माझ्याकडे भरपूर मालमसाला होता. सुनीलदादाच्या पराक्रमामुळे ह्यावेळची सुट्टी एकदम मस्त झाली होती. सुनीलदादा आम्हा सगळ्यांना मुंबईला सोडायला येणार होता...... तेही चक्क लाल दिव्याच्या गाडीतून!! त्याची आता मुंबईलाच बदली झाली होती. तो आता आमच्याचकडे राहणार होता. मस्तच धमाल होती सगळीच.........
Posted by Unknown at १२:५७ PM 0 comments
Labels: कथा

दिगूलीला

"अहो, पिंप शोधताय की झोपा काढताय माळ्यावर?"
भिडेकाकू खालून करवादल्या, तसे माळ्यावर चढलेले दिगूअण्णा दचकले.

"शोधतोऽऽय, शोधतोऽऽय...पिंपच शोधतोय.."

"मेला इतका कसा वेळ लागतो? एवढं मोठं तांब्याचं पिंप, खाचा झाल्या की काय डोळ्यांच्या?"
"अगं ह्या गोणत्यात किती भांडी ती? शोधायला लागणारच ना वेळ."
"अहोऽऽ, गोणत्यात कुठलं मावायला ते पिंप? एक काम धड करतील तर शप्पथ," काकू पुन्हा एकदा करवादल्या.

"इतकी धडपड करून मी तुझं पिंप शोधतोय त्याचं तुला काहीच नाही..." जमेल तेवढ्या क्षीण आवाजात त्यांनी उत्तर दिले.


"होय तर, इतका वेळ काय करताय वरती? बसले असाल ट्रंकेतले फोटो धुंडाळत. शेजारच्या काळ्याढुस्स यमीचा लहानपणातला परकर-पोलक्यातला फोटो मिळेल, पण ते मोठं पिंप काय मिळणार नाही. कुलकर्ण्यांच्या अप्पीच्या लग्नाला कोल्हापूरला गेलो होतो, तेव्हा घेतलं होतं ते पिंप. चांगलं पंधरा लिटरचं पिंप, किती सुबक घाट होता त्याचा आणि ठोके पण अगदी सुरेख पाडलेले. फोटो ठेवा बाजूला आणि शोधा लवकर ते पिंप...."

"आता नाही तुझं पिंप शोधून काढलं, तर पुढचे तीन दिवस सकाळी नाश्ता नाही करणार बघ."
भिडेकाकूंचं, यमीला काळीढुस्स म्हणून पुढे पिंपाच्या घाटाचं वर्णन करणं दिगूअण्णांना चांगलंच झोंबलं.

कुलकर्ण्यांच्या अप्पीच्या लग्नाच्या वेळी ते पिंप कोल्हापूरहून मुंबईला आणताना आपली निघालेली वरात दिगूअण्णांना आठवली. दादर स्टेशनावर दोन माणसांच्या चार बॅगा, पाण्याचा भलामोठा थर्मास, जेवणाचा टिफिन, ते तांब्याचं कुप्रसिद्ध पिंप, एक बायको आणि स्वतः दिगूअण्णा उतरवून होईस्तोवर गाडी सुटली होती. दिगूअण्णा टिफिन आणि पिंपासकट गाडीतच राहिले होते. खरंतर ते पिंप आपल्याशिवाय गाडीतून पुढे जाऊन बेवारशी गहाळ व्हावं, अशीच त्यांची इच्छा होती. पण भिडेकाकूंची "पिंपासकटच घरी या" अशी दरडावणी, त्यांना एक पाय फलाटावर आणि एक पाय गाडीच्या डब्यात अशा अवस्थेत लोंबकळत असताना ऐकू आली आणि ते गपकन् गाडीत घुसले. व्ही.टी. स्टेशनापर्यंत जाऊन परत येईस्तोवर ऑफिसं सुटण्याची वेळ झाली होती. गर्दी कमी व्हायची वाट बघताना दिगूअण्णांनी किमान दहा तरी लोकल सोडल्या आणि शेवटी अकराव्या लोकलमध्ये कसंबसं घुसून, सुसाट गर्दीतून लोकांच्या शिव्या खात त्या तांब्याच्या पिंपाला सुखरूप घरी आणेपर्यंत दिगूअण्णांचा जीव पिंपाच्या तोटीच्या स्क्रूएवढा व्हायची वेळ आली होती. ते घरी पोहोचले, तेव्हा भिडेकाकू निवांत जेवण वगैरे आटपून पलंगावर घोरत पडल्या होत्या. आणि दुसर्‍या दिवशी उठल्या तेव्हापासून पुढचे कमीत कमी बत्तीस दिवसतरी आपल्या नवर्‍याची पिंपासकट झालेली फजिती गावभर सांगत होत्या.



"कुलकर्ण्यांनी लग्नाचं जेवण काय नीट दिलं नाही. खारकरांच्या लग्नात बघ काय फर्मास जेवण होतं, अहाहा! काय सुरेख केला होता बटाटेभात, अजून चव आठवतेय त्याची. तुला काय जमत नाही तसा बटाटेभात करायला."

कुलकर्ण्यांचा आणि खुद्द आपल्या बायकोचा जमेल तसा निषेध व्यक्त करायचा दिगूअण्णांनी एक तोकडा प्रयत्न केला.
"जळ्ळा तो बटाटेभात... खा खा खाल्लात आणि पुढचे तीन दिवस बसला होतात भिंतीवर रेघा ओढत. तिसर्‍या दिवशी तर खडू हातात धरायचीही ताकद तुमच्यात राहिली नव्हती."
भिडेकाकूंच्या एका जळजळीत कटाक्षासोबत ह्या कटू आठवणी दिगूअण्णांनी गिळल्या.
"बरं, आत्ता मी खाली उतरतो. मला काहीतरी खायला दे. दुपारी जेवण झालं, की निवांतपणे मी पिंप शोधेन. ह्या नाहीतर दुसर्‍या गोणत्यात असेल."
"ठीक आहे. पण सांगून ठेवते, संध्याकाळपर्यंत माझं पिंप नाही मिळालं, तर तुम्हालासुद्धा गोणत्यात बांधून माळ्यावर टाकून देईन. समजलं?"
भिडेकाकूंच्या धमकीने गर्भगळीत झालेले दिगूअण्णा माळ्याला लावलेल्या शिडीवरून तोल सांभाळत कसेबसे खाली उतरले. महामायेचा अवतार असणारी आपली बायको स्वतःचा शब्द खरा केल्याशिवाय राहणार नाही ह्याची त्यांना पुरेपूर खात्री होती.

खरं म्हणजे दिगूअण्णा स्वतः खूपच गोंधळात पडले होते. सात-आठ महिन्यांपूर्वी कट्ट्यावर आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण तांब्याची काहीतरी एक वस्तू जुन्या बाजारात विकली होती, हे त्यांना आठवत होतं. पण ती वस्तू म्हणजे ताम्हन होतं की ते कोल्हापूरवालं पिंप होतं, हे मात्र त्यांना अजिबात आठवत नव्हतं. एक तर त्या चंडिकेच्या नकळत हे असले उद्योग करायचे म्हणजे मोठीच पंचाईत. त्यातून ते लक्षातही ठेवायचं म्हणजे खडतर परीक्षाच. पण करावंच लागतं. करणार काय? ही बया हातात एक पैसादेखील जास्तीचा उरू देत नाही.


वाढदिवसाची पार्टी मात्र झक्कास झाली होती. उपमा, गुलाबजाम आणि कटलेट असा झक्क बेत जमला होता. शिवाय सगळ्या मित्रांना त्यांनी कुल्फीसुद्धा खाऊ घातली होती. आता कट्ट्यावरच्या आठ मित्रांना एवढी पार्टी द्यायची म्हणजे केवळ ताम्हनावर भागणं शक्य नाही हे त्यांना उमजत होतं. जर का ती विकलेली वस्तू म्हणजे कोल्हापूरवालं पिंपच असेल, तर ही जगदंबा आपली रवानगी माळ्यावर करणार हे निश्चित होतं. आणि माळ्यावर गेल्यावर आपल्याला कदाचित दोन-चार दिवस खायला मिळणार नाही, हेही त्यांच्या हळूहळू ध्यानात यायला लागलं होतं. तेव्हा संध्याकाळपर्यंतच्या अवधीत आपण चार दिवसांचं पोट भरून घ्यावं, असा विचार करून दिगूअण्णांनी कधीच न आवडणारी नाचणीची आंबील चक्क चवीने पोटात ढकलली.


"काय हो? त्या पेढेघाटी डब्यात परवाच्या दिवशी मी चार गुलाबजाम राखून ठेवले होते पियूसाठी."

"अं?...हं हं..."
"आता अडीचच शिल्लक दिसताहेत. कुठे गेला उरलेला दीड गुलाबजाम?"
"मला काही माहीत नाही," तोंडावर बेफिकिरी आणण्याचा प्रयत्न करत दिगूअण्णांनी पेपरात तोंड खुपसले.
"काल शेजारच्या विद्याने वाटीभरून वाटली डाळ दिली होती. एकतर ती डाळ तुम्ही एकट्याने संपवलीत. तीसुद्धा मी घरात नसताना, माझ्या नकळत. आणि वर त्याच हाताने डबा उघडून गुलाबजाम खाल्लेत. हो की नाही? खरं सांगा."
"बहिर्जी नाईक...."
"कोण बहिर्जी नाईक? मी गुलाबजाम कुठे गेले ते विचारतेय," भिडेकाकू हातातलं उलथनं परजत म्हणाल्या.
"अगं शब्दकोड्यातला शब्द गं. शिवाजीचा गुप्तहेर कोण ते विचारलंय," साळसूद चेहरा करत दिगूअण्णा उत्तरले.
"त्या पेढेघाटी डब्याला बाहेरून वाटल्या डाळीचे कण चिकटलेत. कालच विद्याने देशपांड्यांच्या ललिताला वाटल्या डाळीची कृती अगदी मुद्देसूद लिहून दिली. वरून असं म्हणालीसुद्धा, की मी आजच केली होती. मी तेच म्हटलं, हिच्या घरात शिजलेल्या कुळथाच्या पिठल्याचा नमुनासुद्धा आमच्या घरी येतो आणि वाटली डाळ कशी नाही आली? वाटीसुद्धा परस्पर देऊन टाकलीत की नाही तिची माझ्या नकळत? खरं सांगा...... सांगा म्हणते ना? उघडा आपलं तोंड."
भिडेकाकूंच्या हातातलं उलथनं कपाटावर आपटून त्याचा खाणकन् आवाज आला. आणि वाग्बाणांच्या वर्षावाने भांबावून जात दिगूअण्णा शेवटी बोलते झाले.
"अगं बाई किती कीस पाडशील त्या डाळीचा? आता समजा मी खाल्ली ती एखाद् दोन चमचे, तर काय फरक पडतो?"
"एखाद् दोन चमचे नव्हे, चांगली वाडगाभर. आणि वर दीड गुलाबजामसुद्धा! आता बसाल फेर्‍या मारत. पण सारखी सारखी कोरी कॉफी मी करून देणार नाही सांगून ठेवते."

एक दोन चमचे... वाटीभर... वाडगाभर... हिशोब लावता लावता दिगूअण्णा त्रासून गेले.

स्वतःतर घरात काही चवीढवीचं करत नाही. नव्हे, नव्हे, करायला येतच नाही. रोजचा वरणभातसुद्धा करता येत नाही. कधी पाणीच जास्त, कधी मीठच कमी, ना हळदीचा पत्ता ना गुळाचा. पोळ्या केल्या करपून गेल्या; भात केला कच्चा झाला; वरण केलं पातळ झालं; असलाच प्रकार. स्वयंपाकावर मुळी प्रेमच नाही हिचं. बाकीच्या बायका कश्या तर्‍हा करतात खाण्याच्या! नवर्‍यांचे नुसते लाड करतात. घारगे, थालिपीठं, अळूवड्या, तर्‍हेतर्‍हेचे लाडू, वड्या, आंबोळ्या, कडबोळी, चकल्या, वरणफळं, सुरळीच्या वड्या काय विचारू नका! आणि आमच्या नशिबी नुसती हेरगिरी, फेर्‍या-मोजणी आणि धमक्यांवर धमक्या. ह्या घरात चवीने खाण्याचंसुद्धा स्वातंत्र्य नाही. आता आहे माझी प्रकृती जरा नाजूक. नाही पचत जरा वेगळं काही खाल्लेलं. म्हणून काय सारख्या फेर्‍या मोजत बसायच्या हिने?

विचार करता करता दिगूअण्णांना इतकं नैराश्य आलं, की दुपारच्या जेवणाचा त्यागच करावा असा निश्चय त्यांच्या मनाने केला. नाही म्हणायला नाचणीची आंबील आणि लेंग्याच्या खिशात लपवून माळ्यावर असताना खाल्लेले शंकरपाळे आणि दोन पेढे अंमळ जरा जडच झाले होते. आता हिच्या म्हणण्याप्रमाणे आपण वाडगाभर वाटली डाळ खाल्लीच असेल आणि बोलाफुलाला गाठ पडता समजा आपलं पोट बिघडलं, तर औषधाच्या गोळ्या हाताशी असाव्यात असा विचार करत दिगूअण्णा सदरा अडकवून बाहेर निघाले.


"अहोऽऽ, निघालात कुठं?" भिडेकाकूंनी तेवढ्यात टोकलंच.

"येतो जरा पाय मोकळे करून."
"पिंपाचं लक्षात आहे ना?"
"होऽऽऽ"
"लाईटचं बिल भरलंत?"
"होऽऽऽ"
"आणि टेलिफोनचं?"
"होऽऽऽ"
"इस्त्रीचे कपडे आणलेत?"
"होऽऽऽ"
"पासबुकं भरून आणलीत?"
"होऽऽऽ"
"मग ठीक आहे. मी पैसे काढून आणेन बँकेतून. आता थोड्या वेळाने भाजी आणायला मी मार्केटात जाणार आहे. पण तुम्ही आत्ता जाता जाता दळण टाका दळायला आणि वाण्याकडे यादी टाका, समजलं?"
"होऽऽऽ"
"मी कॅय किर्तन कॅरतेय कॅ? होऽऽऽ होऽऽऽ लॅवलंय केव्हाचं तॅ...."
आपली बायको तोंड वेंगाडून बोलते, तेव्हा दुष्ट कैकेयीसारखी दिसते हे आपलं जुनंच मत दिगूअण्णांनी अगदी घासून पुसून लख्ख केलं.
"हा दळणाचा डबा. बारीक दळ आणि गव्हावर गहू टाक म्हणावं. गेल्यावेळी ज्वारीवर गहू टाकले होतेन् मेल्यानं आणि महिनाभर पोळ्यांच्या भाकर्‍या होत होत्या."
"पोळ्या असतात आपल्याकडे? मला वाटलं भाकर्‍याच की काय..." हातानं डब्याच्या वजनाचा अंदाज घेत दिगूअण्णा पुटपुटले.
"काऽऽऽय म्हणालात? पिंपाचं आहे ना लक्षात? हांऽऽऽ...... सहा किलो गहू आहेत म्हणावं..किती? सहा किलो. आणि हे पैसे, दळणवाल्यालाच द्या. एकदा त्याचे पैसे थकवून तुम्ही जिलब्या खाल्ल्या होत्या. त्यानंतरचं आहे ना लक्षात?"

दिगूअण्णाच काय, त्यांच्या सात पिढ्यासुद्धा विसरणार नाहीत अशी पाळी दिगूअण्णांवर आली होती. हॉस्पिटलामध्ये काही न खाता-पिता केवळ सलाईनवर काढलेले चार दिवस, आणि रसाहारावर पुढचे पंधरा दिवस! आणि रस कसला, तर भेंडी, दोडका, पडवळ, कोबी, घेवडा इत्यादी इत्यादी. आजदेखील डायरियातला नुसता 'डा' जरी ऐकला, तरी दिगूअण्णांच्या अंगावर रोमांच उभे राहतात.



"झालं ते झालं गं बाई. ह्या असल्याच गोष्टी तुझ्या बर्‍या लक्षात राहतात?"

"तुमची बायको आहे ना! ठेवाव्याच लागतात लक्षात. मी म्हणून टिकले हो तुमच्या घरात, दुसरी एखादी....."
"तुमची आज्ञा असेल, तर मी प्रस्थान ठेवावे का देवीजी?" भिडेकाकूंना अर्ध्यावरच तोडत दिगूअण्णांनी सोईस्करपणे सुटकेचा मार्ग शोधला. भिडेकाकूंचं एकदा ते 'मी म्हणून...' चं पारायण सुरू झालं, की तासाभराची निश्चिंती असायची.
"निघॅ ऍतॅ.... पुरे झाला तुमचा नाटकीपणा. आणि जाताना यमीच्या घरात डोकावू नका चहासाठी. ती गेलीये डोंबिवलीला. कळलं ना?"

भिडेकाकूंच्या नकळत कपाळावर हात मारून घेत दिगूअण्णा बाहेर पडले. आत्ता यमीकडे गेलो असतो, तर तिने बालपणापासूनच्या मैत्रीला जागत वाफाळता चहा हातात ठेवला असता. बरोबर काहीतरी गरम, खमंग खायला दिलं असतं. पण तिलाही आजच डोंबिवलीला जायचं सुचलं? छे! आपलंच नशीब खोटं. आपल्या मनातलं आपल्या बायकोला कळतं आणि आपल्याला मात्र तिच्या मनातलं कसं काय बुवा काहीच कळत नाही? हे कोडं त्यांना लग्नाला तेवीस वर्षं होऊनही उलगडलं नव्हतं.


खाली उतरताना दिगूअण्णांना काकूंचा काळा बोका जिन्याच्या कोपर्‍यात अंगाचं मुटकुळं करून पहुडलेला दिसला. हा काळा असला, तरी हिला आवडतो आणि यमीला मात्र नावं ठेवायची एकही संधी सोडत नाही ही. न मागता त्याला रोज मऊमऊ सायभात देते ही अंबिका आणि मला मात्र नाचणीची आंबील, दुध्याचं सूप, बिटाचा रस. एकच लाथ त्या बोक्याच्या पेकाटात घालावी, अशी तीव्र इच्छा दिगूअण्णांच्या मनात उत्पन्न झाली. अश्शी हाणावी, की हात पाय दुखावून पळून जाईल कुठेतरी आणि फिरकणार नाही चार दिवसतरी. मग लागेल हिचा जीव टांगणीला. काकूंना धडा शिकवण्याची ही नामी संधी आहे, असं दिगूअण्णांना वाटलं. पण त्यांच्या हातात दळणाचा डबा होता. त्यामुळे मनातली तीव्र इच्छा त्यांना नेहमीप्रमाणे मनातच दाबून टाकावी लागली. तरीसुद्धा इकडे तिकडे बघत हळूच ते त्या बोक्याच्या शेपटीवर पाय ठेवण्यासाठी पुढे सरसावले. पण दिगूअण्णांची चाहूल लागताच तो बोका फिस्कारत उठला आणि त्यांच्या पायांत कडमडला. स्वतःचा तोल आणि दळणाचा डबा सांभाळताना दिगूअण्णांची अगदी तारांबळ उडाली. नुसता पाय उचलला तर ही तर्‍हा, मग लाथ मारली असती तर काय काय झालं असते रे देवा? लाथ हाणताना तो डबा सांडला असता, तर जगदंबेने त्यांची पूजाच बांधली असती. शिवाय अगदी कर्णा घेऊन गावाला तीर्थप्रसादाचं निमंत्रण दिलं असतं. आपला नवरा असा मुलखाचा बावळट्ट आहे आणि मी म्हणून त्याला ताब्यात ठेवलाय, हे जगाला सांगायला अजून एक संधी! पण मी नाहीये बावळट. एक दिवसतरी हिला सटकवल्याशिवाय राहणार नाही. पण सटकवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तिच्या अंगावर मोठ्ठ्याने ओरडायचं? पण माझ्या आवाजावर दोन सूर तरी तिचा आवाज चढतो. मग काय करायचं? तिने सांगितलेल्या कामांकडे साफ दुर्लक्ष करायचं का? की बहिरेपण आल्याचं नाटक करायचं? पण ती तर आपलं बिंग फोडण्यात हुश्शार आहे.


चालता चालता दिगूअण्णा निरनिराळ्या उपायांची चाचपणी करून बघत होते. पण त्यांचं डोकंच मुळी चालत नव्हतं. कारण त्यांचं तोंड चालत नव्हतं ना! घरातून निघताना झालेल्या झक्काझक्कीमुळे त्यांना शेंगदाणे खिशात टाकायला मिळाले नव्हते आणि मघाशी त्या काळ्या बोक्याशी झालेल्या झटापटीत फुटाण्यांची पुडी कुठे खाली पडली, काही कळलंच नाही. काकूंना धडा शिकवण्याचे विचार मोठ्या कष्टाने बाजूला सारून ते निमूटपणे त्यांनी सांगितलेल्या कामांकडे वळले. त्यांना वृत्तपत्र वाचनालयात जायची वेळ साधायची घाई झाली होती.


कोपर्‍यावर असलेलं मोफत वृत्तपत्र वाचनालय दिगूअण्णांच्या खास आवडीचं होतं. वृत्तपत्रांच्या फुकट वाचनाशिवाय इतरही अनेक आकर्षक गोष्टी तिथे होत्या. लोकांच्या सोयीसाठी नगरपालिकेने तिथे कायमस्वरूपी खुर्च्या बसवलेल्या होत्या. शिवाय त्यावर चांगली शेडही उभारलेली होती. एक मोठा गणपतीचा फोटो तिथल्या भिंतीवर बसवलेला होता. वर्तमानपत्र वाचायला येणार्‍या लोकांमध्ये भाविकही भरपूर असायचे. त्या फोटोखाली मारलेल्या बारक्या लाकडी फळीवर कोणी उदबत्ती लावून जायचे, तर कोणी कोणी त्या गणपतीला नैवेद्यही दाखवून जायचे. खडीसाखर म्हणा, फुटाणे, चणे, शेंगदाणे म्हणा, कधी खारीक, बदाम, काजू, तर कधी एक-दोन पेढेही ठेवलेले असायचे. असते बुवा एकेकाची श्रद्धा! पण त्या प्रसादाचा लाभ मात्र दिगूअण्णांना व्हायचा.



वाचनालयाला लागूनच एक फरसाणाचं दुकान होतं. तिथे तळणीचा घाणा कायम चालू असायचा. भिडेकाकूंच्या नकळत उरवलेले पैसे खिशात असतील, तर दिगूअण्णा आपल्या रसनेला तृप्त करायचे. पण ते डायरिया प्रकरण झाल्यापासून जिलबीपासून मात्र ते कटाक्षाने दूर असायचे. एरवी वडे, भज्या, कचोर्‍या, शेव, बुंदी, फरसाण सगळं यथेच्छ असायचं.


शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्या वाचनालयाच्या समोरच एक बालवाडी होती. अकरा वाजता सकाळचा वर्ग सुटायचा आणि लगेच पावणेबारा वाजता दुपारचा वर्ग भरायचा. मग वाचनालयात बसलेल्या दिगूअण्णांचा जीव अगदी फुलासारखा होऊन जायचा. तोंडासमोर वृत्तपत्र धरलेलं असलं की काम फत्ते! एक डोळा वृत्तपत्रात आणि एक डोळा रस्त्यावर ठेवायचं कसब दिगूअण्णांनी अगदी थोड्या सरावाने साधलं होतं. आपल्या गोंडस मुलांना शाळेत सोडायला येणार्‍या छान-छान आया पाहताना जीवनातल्या सगळ्या जटिल समस्यांचा दिगूअण्णांना विसर पडायचा.


एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे नेमून दिलेली कामं उरकून दिगूअण्णा आपल्या आवडीच्या जागेवर स्थानापन्न झाले. एकच नव्हे, तर चक्क दोन्ही डोळे वृत्तपत्रात घालून. भिडेकाकू कधीही तिथे अवतीर्ण झाल्या असत्या. 'मी मार्केटात जाणार आहे,' असा वैधानिक इशारा त्यांना निघता निघता मिळालाच होता. कपाशीच्या बोंडावरून स्वर्ग गाठणारी बाई ती! संशय आला, तर हा हक्काचा विरंगुळाही बंद व्हायचा. दिगूअण्णा निमूटपणे पेपर वाचू लागले आणि खरोखरच दहाव्या मिनिटाला भिडेकाकूंची स्वारी हातातल्या पिशव्या झुलवत तिकडे आली.

"ओऽऽऽ.... कुठे भटकत बसू नका. मी भाज्या घेऊन येते, पिशव्या उचलायला थांबा इकडेच, कळलं का?"
"हो.... हो.. थांबतोच," अधिकृत परवाना मिळाल्याप्रमाणे दिगूअण्णांचा चेहरा फुलून आला.

बालवाडीचा सकाळचा वर्ग अजून सुटला नव्हता. पण फाटकापाशी आयांची गर्दी जमू लागली होती.

अरे वा! त्या उंच टाचांच्या चपला घालणार्‍या आईने आज चक्क पंजाबी ड्रेस घातलाय. पण त्यामुळे ती जरा जास्तच उंच दिसतेय.
आणि तिच्याबरोबर नेहमी असणारी तिची मैत्रीण आज फुलाफुलांची साडी नेसून आली आहे. हातात आज काळी पर्स नाहीये. छोटंसंच पैशाचं पाकीट मुठीत दिसतंय. साडीवर पर्स कदाचित शोभत नसेल.
ह्म्म्, छोटुकलीच्या आईचे दिवस बहुधा भरत आले असावेत. चाल अगदीच मंदावलीय हिची. फार दिवस जमायचं नाही हिला पोरीला आणायला यायला.
सवयीप्रमाणे दिगूअण्णांच्या मनात एकेक नोंदी होत होत्या.

अरे! हे काय? ही नाकात चमकी घातलेली पोरगी आणि तो गॉगलवाला मुलगा किती वेळ त्या कोपर्‍यावरच्या स्कूटरवर बसून बोलताहेत? फारच माना वेळावून बोलतेय ती बया त्या गॉगलवाल्या मुलाशी! नखरेलच दिसतंय हे प्रकरण...


बाजूला फरसाणवाल्याने सामोश्यांचा घाणा तळणीत टाकला होता. त्याचा खमंग वास सगळीकडे सुटला होता.

दिगूअण्णांचा हात चार वेळा तरी खिशात जाऊन बाहेर आला होता. नेहमीप्रमाणे दळणवाल्याच्या पोराला वजनात गंडवून त्यांनी दळणातले पैसे उरवले होते. तेवढ्या पैशांत एक सामोसा आणि थोडीशी डाळमूठ नक्कीच आली असती. पण आपला सुखाचा जीव धोक्यात घालायला दिगूअण्णा थोडी काचकूच करत होते. ती जगदंबा मार्केटातच होती. भाजी-खरेदीला तिला अजिबात वेळ लागत नाही. सगळेच भाजीवाले ती म्हणेल ती भाजी, ती म्हणेल त्या किंमतीला लगेच देऊन टाकतात, हे अनुभवाने दिगूअण्णांना माहीत झालं होतं. आपण सामोसा घ्यायचो आणि तेवढ्यात ती महामाया इथे येऊन टपकली की झालं... वाजले आपले बारा. आधीच ते पिंपाचं प्रकरण डोक्यावर घोंघावतं आहेच, त्यात अजून भर नको, असा शहाणपणाचा विचार करून दिगूअण्णांनी इतकावेळ कसंतरी स्वतःला आवरलं होतं. पण तो खमंग वास आणि त्याहीपेक्षा तोंडाला सुटलेलं पाणी अगदीच आवरेना, तेव्हा दिगूअण्णांनी धाडस करून सामोसा आणि डाळमूठ घेतलीच.

ती नखरेल पोरगी अजूनही त्या गॉगलवाल्या पोराशी बोलत होती, हातातली पर्स गरागरा फिरवत. पळवून घेऊन जाईल ना कोणीतरी. तो मुलगा आता फारच धीट झालेला दिसतोय! जरा जास्तच सलगी करू बघतोय तिच्याशी. फटकावलं पाहिजे अशा लोकांना. आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत ह्याचं काही भान ठेवावं की नाही?



ताज्या डाळमुठीची चव जिभेवर उतरताच दिगूअण्णांचा मेंदू जरा हुशारला होता. ते अधिक बारकाईने त्या चमकीवाल्या मुलीचं आणि तिच्याबरोबर असलेल्या गॉगलवाल्या मुलाचं निरीक्षण करू लागले.


अरेच्या! आता हा कोण अजून एक ह्या दोघांच्या बाजूला टेहळतोय? निरुद्योगी मेला.. त्या दोघांचं लक्षही नाहीये त्याच्याकडे. आपल्याच विश्वात गुंग झालेत दोघे!

"ओय् ओय् ओय्!" हात झटकत दिगूअण्णा उठून उभे राहिले. डाळमूठ संपलेली त्यांच्या लक्षात आलीच नव्हती. चुकून त्यांनी स्वतःच्याच बोटाचा कडकडून चावा घेतला होता. दुखर्‍या बोटावर फुंकर घालत ते परत आपल्या खुर्चीवर बसून निरीक्षणाला लागले. आता जोडीला सामोसा होता. गरमागरम, खमंग!

आता तो दुसरा रोडरोमियो खिशातून कंगवा काढून भांग पाडत चालू लागला होता. त्याने फूटपाथाच्या ह्या टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत एक फेरी मारली. आणि परत खिशात कंगवा ठेवून जरा जास्तच जोरात चालत ह्या दोघांच्या दिशेने येऊ लागला.


"स्सस्स्! हाय्!" सामोसा अजूनही गरम होता. दिगूअण्णांची जीभ पोळत होती. पण त्यानेच तो अधिक चविष्ट लागत होता.


आता रोमियो जवळपास धावायलाच लागला होता. 'त्या दोघांचं' बाजूच्या जगाकडे अजिबात लक्ष नव्हतं. ती नखरेल बया आपली पर्स गरागरा फिरवत अधिकच लाडे लाडे बोलत होती. आता हा रोमियो पर्स पळवणार काय तिची? असा विचार दिगूअण्णांच्या मनात आला, तोच त्यांच्या डोळ्यांच्या कोपर्‍यांत भाजीच्या पिशव्या सावरत येणार्‍या भिडेकाकू विजेसारख्या लख्खकन् चमकल्या. दिगूअण्णांनी घाबरून जात हातातला सामोसा सगळाच्या सगळा पटकन तोंडात कोंबला. स्स्!! स्स्!! हाय् हाय्.... तोंड चांगलंच भाजलं.


तेवढ्यात रस्त्यावर पळापळ झाली.

"चोऽऽर.... चोऽऽर... चोऽऽर..." असा मोठा गलका ऐकू आला.

हातातला सामोशाचा कागद गडबडीने बाजूला सारत दिगूअण्णा आवाजाच्या दिशेने पाहू लागले. तो रोडरोमियो रस्त्यातून एखाद्या हरणासारखा वाकडा तिकडा पळत होता. त्याच्या हातात दिगूअण्णांना त्या नखरेल पोरीची पर्स दिसली आणि सगळं चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. तो गॉगलवाला पोरगा त्या रोडरोमियोच्या पाठून धावत होता. दोन-चार बघेही आपली मर्दुमकी दाखवायला त्याच्याबरोबर पळू लागले. ती पोरगी बिचारी भेदरून स्कूटरजवळच उभी राहिली होती. तिचं सांत्वन करायला तिच्याजवळ जावं असं दिगूअण्णांना फार वाटलं, पण हातात भाजीच्या पिशव्या झुलवत समोरून 'मांजर' आडवी येत होती. मनातली इच्छा मनातच दाबून गोंधळलेल्या मनःस्थितीत ते तसेच बसून राहिले.


तेवढ्यात त्यांना आपल्या पायाजवळ पडलेला सामोशाचा कागद दिसला. तो जर त्या चंडिकेच्या दृष्टीस पडला, तर मोठं रामायण घडेल हे तेवढ्यातही दिगूअण्णांना जाणवलं आणि तो कागद पायाने दूर ढकलण्यासाठी त्यांनी बसल्या जागी पाय लांब केले .... आणि काय आश्चर्य! तो रोडरोमियो त्यांच्या पायाला अडखळून धपकन् रस्त्यावर पडला! दिगूअण्णा गडबडीने टुणकन् उभेच राहिले. त्या रोमियोच्या पाठोपाठच त्याचा पाठलाग करणारे सगळे मर्दमावळे तिकडे येऊन ठेपले. एकाने त्याची गचांडी धरली, तर दुसर्‍याने खाडखाड त्याच्या मुस्कटात लगावायला सुरुवात केली. गॉगलवाल्या पोराने मात्र झडप घालून सर्वांत आधी ती पर्स हस्तगत केली.

रोमियोला पकडल्यावर ती पोरगीसुद्धा धावत येऊन गॉगलवाल्याला चिकटली. ते दोघेही दिगूअण्णांकडे अतिशय कृतज्ञतेने पाहू लागले.

तेवढ्यातच भिडेकाकूही तिथे येऊन उभ्या ठाकल्या. उन्हातून आल्यामुळे की भाजीच्या पिशव्या उचलल्यामुळे कोण जाणे, पण त्यांचा चेहरा चांगलाच फुलला होता. त्यांच्या चेहर्‍यावरचे उग्र भाव वाचून दिगूअण्णा मनाशी चरकलेच.

"अगं तो आपला आपण पडला येऊन इथे. मी नाही काही केलं...खरंच.." उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून दिगूअण्णा बोलून गेले.
"ह्म्म्म् , ह्या पिशव्या पकडा आणि चला घरी.."
"अहो काकू, ह्या आजोबांमुळे हा चोर पकडला गेला. माझी पर्स मारून नेत होता. ह्या आजोबांनी त्याला पायात पाय घालून पाडलं म्हणून त्याला पकडता तरी आलं." नखरेल पोरगी दिगूअण्णांची बाजू घेत काकूंना समजावू लागली.
तिचं बोलणं ऐकता ऐकता दिगूअण्णांना नक्की काय झालं ह्याचा अंदाज आला.
"ह्या चोरांना काय, फुकट ते पौष्टिकच. चोर्‍यामार्‍या करून पोट भरण्यापेक्षा कष्टाचं अन्न खावं," आपली कॉलर ताठ करत दिगूअण्णा सुरू झाले.
"आपण कायमच सजग आणि सतर्क राहावं. कोण कधी अचानक संधी साधेल ह्याचा अजिबात भरवसा नाही. आणि पोरी, तूसुद्धा इतकी खुळी कशी गं? आपल्या वस्तूंची काळजी घेता येऊ नये?" मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवत दिगूअण्णा त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले.
"बरोबर आहे काका तुमचं.... " ठोकलेल्या भाषणाचा थोडातरी उपयोग झाला म्हणायचा, पोरगी आजोबांवरून काकावर आली होती. दिगूअण्णा मनोमन खूष झाले.
उघडपणे मात्र ते एवढंच म्हणाले, "आम्हां रिटायर्ड लोकांनासुद्धा सामाजिक भान ठेवावंच लागतं, फुकटचं बसून पेन्शन खात नाही आम्ही."
हे शेवटचं वाक्य म्हणजे भिडेकाकूंना टोमणा होता बहुधा.

काकूंनी एकच प्रेमळ कटाक्ष दिगूअण्णांकडे टाकला आणि तेवढ्याच प्रेमळ आवाजात त्या म्हणाल्या, "चलताय ना आता? त्या पकडलेल्या चोराचं काय करायचं, ते बघून घेतील ही मंडळी. आपण निघावं नाही का?"

दिगूअण्णा आधी दचकलेच. लग्नानंतरच्या तेवीस वर्षांत बायकोचा हा सूर त्यांनी ऐकला नव्हता. उपस्थित प्रेक्षकांच्या चेहर्‍यावरसुद्धा दिगूअण्णांबद्दल कौतुकाचे आणि कृतज्ञतेचे भाव निथळत होते. हाच आपला गौरवाचा क्षण असे वाटून दिगूअण्णांनी काकूंच्या हातांतल्या सगळ्याच पिशव्या आपल्या हातांत घेतल्या आणि विजयोन्मादाने म्हणाले, "चलाऽऽ."

एखादं युद्ध जिंकल्याच्या थाटात दिगूअण्णा काकूंच्या मागून चालू लागले. आपली बायको आपल्या सत्काराप्रीत्यर्थ खीर-पुरीचं जेवण करील, अशी स्वप्नं त्यांना पडू लागली. खीर-पुरी नाहीतरी किमानपक्षी गोडाचा शिरा तरी? एका चोराला पकडून दिलंय आपण! केवढा मोठा पराक्रम गाजवलाय! मोठ्ठं धाडसच केलंय. आता तरी बायको आपल्यावर करवादणार नाही. आपल्याला कामं सांगणार नाही. चांगलंचुंगलं करून खायला घालेल. नुसतं बसून रहायचं. काहीही काम नाही, फक्त बसून खायचं!

स्वप्नरंजनात मश्गूल झालेल्या दिगूअण्णांना पायाखालचा रस्ता संपून घर कधी जवळ आलं, ते कळलंच नाही.
घराच्या दारातच काळा बोका मुटकुळं करून बसला होता. त्याला ऐटीत लाथेने ढोसत दिगूअण्णा पिशव्या सांभाळत घरात शिरले. बोका केकाटताच भिडेकाकूंनी अतिशय हिंस्र नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. पण त्याकडे साफ दुर्लक्ष करत दिगूअण्णा पंख्याखाली आरामखुर्चीत बसले.

"जरा पाणी आण गं", अशी ऑर्डर सोडायच्या बेतात असतानाच भिडेकाकूंचा अचानक गुरगुरल्यासारखा आवाज आला, "तुमचे कट्ट्यावरचे देशमुख भेटले होते बाजारात."

"हो का? काय म्हणत होता मुखडा?"
"पिंपाची चौकशी करत होते."
"कम्मालै, त्यांचंही हरवलंय वाटतं," वाढलेल्या गुरगुरीकडे दुर्लक्ष करत उगाचच खिदळत दिगूअण्णा उत्तरले.
"नाही, आपलं कुठंय ते विचारत होते."
"आहे की माळ्यावर. शोधणार आहे दुपारनंतर..." आता जरा सावधपणाचा पवित्रा दिगूअण्णांनी घेतला.
"मी तेच सांगितलं त्यांना," मांजर उंदराला खेळवत म्हणाली.
"त्याला हवंय का आपलं पिंप? देईन संध्याकाळी नेऊन."
"मला न विचारताच?"
"अगं तुला काय विचारायचं त्यात? कठीण प्रसंगात मित्राने मित्राला मदत केलीच पाहिजे. सामाजिक भान म्हणतात त्याला."
"मला न विचारताच तुम्ही पिंप विकलंत? काय केलंत त्या पैशाचं?" धुमसत असलेल्या ज्वालामुखीचा स्फोट व्हावा, तश्या भिडेकाकू उफाळल्या.
"अगं विकलं काय? काहीही...."
"तुम्ही पिंप विकलंत. देशमुखांना जुन्या बाजारात ते मिळालं. त्यावर माझं नाव लिहिलंय... माझं! कळलं? सौ. वत्सला दिगंबर भिडे..माझं नाव."
"अगं नावासारखी नावं नसतात का? काहीही तुझं आपलं..." कसेबसे स्वतःला सावरत दिगूअण्णा गुळमुळीतपणे म्हणाले.
"नावासारखी नावं असतात, पण पिंपासारखं पिंप नसतं. समजलं? चांगलं पंधरा लिटरचं पिंप, किती सुबक घाट त्याचा आणि ठोकेही अगदी सुरेख पाडलेले. माझं पिंप.... गेलं माझं कोल्हापूरचं पिंप..."
चार-पाच मिनिटं आक्रोश करत कपाळ बडवून झाल्यावर भिडेकाकू गर्रकन मागे वळल्या, "आता ऐका मी काय म्हणते ते. पुढचे चार दिवस..."
पण त्या काय म्हणताहेत, ते ऐकायला दिगूअण्णा होतेच कुठे जाग्यावर?
त्यांनी कध्धीच माळ्याची शिडी चढायला सुरुवात केली होती. पोटात जरा गडबड होतेय, असं वाटत होतं. पण त्याकडे साफ दुर्लक्ष करत काखोटीत चटईची गुंडाळी आणि हातात पलंगपोसाची घडी घेऊन दिगूअण्णा निघाले होते मुक्काम ठोकायला माळ्यावर...
Posted by Unknown at १२:३७ PM 0 comments
Labels: कथा
नवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: पोस्ट (Atom)

Blog Design by Gisele Jaquenod | Distributed by Deluxe Templates