skip to main | skip to sidebar

इथे काय लिहिलंय?

  • कथा (5)
  • प्रारंभ (1)
  • मुलाखत (1)
  • लेख (2)
  • लोकलकथा (2)

संग्रह

  • ► 2013 (4)
    • ► जून 2013 (2)
    • ► जुलै 2013 (1)
    • ► ऑगस्ट 2013 (1)
  • ► 2014 (1)
    • ► मे 2014 (1)
  • ► 2015 (1)
    • ► एप्रिल 2015 (1)
  • ▼ 2018 (5)
    • ▼ ऑक्टोबर 2018 (4)
      • दिगूलीला
      • प्लँचेट
      • एक्झिक्युटिव्ह मॅचमेकिंग
      • तालबद्ध वाटचाल
    • ► नोव्हेंबर 2018 (1)

सगेसोयरे

  • कथापौर्णिमा
  • नंदिनी

पाहुणे

असंच काही बाही

सुचलेलं, अनुभवलेलं...

२० ऑक्टोबर, २०१८

प्लँचेट

दुपारी जेवायच्या पानावर बसल्यापासून मी बघत होते सगळ्यांना.... काहीतरी गुफ्तगू चालू होतं त्यांचं आपापसात. रश्मीताई, वंदू एकमेकींच्या कानात काहीतरी सांगत होत्या आणि सुनीलदादा, अभि, ऋषीदा वगैरे मंडळी मुक्यांनेच खाणाखुणा करून 'वर, वर' असं काहीतरी बोलत होते. आप्पा जेवायला आले तशी सर्वांची बोलती बंद झाली आणि मुकाटपणे सगळे जेवू लागले. हात धुवायच्या वेळी मी ऋषीदाला गाठलंच...
"काय ठरवताय तुम्ही? मी पण येणार..."
"अनु, तू नको येऊस... आमची मोठ्या लोकांची मीटिंग आहे, तुझं काय काम तिथे?"
"नाही, तुम्ही लोक 'वर, वर' असं काहीतरी बोलत होतात, मी येणार म्हणजे येणार.."
"अनु, नको गं प्लीज, तू घाबरशील तिकडे, तू झोप ना आजीजवळ.. प्लीऽऽज" ऋषिदा अजिजीने म्हणाला.
"म्हणजे तुम्ही खरंच माडीवर जायचं ठरवताय.. मी येणारच" मी अगदी हटून बसले होते.
"बघ तू माझं ऐकलंस तर मी माझ्या वाटणीतले दोन आंबे तुला देईन..."
"तुम्ही कॅनेस्ट्रा खेळलात तरी मी त्रास नाही देणार, बाजूला बसून बघेन, हवं तर मार्क पण लिहून देईन, पण मी पण येणार माडीवर..." मी जरा मस्काबाजी करायचा प्रयत्न केला.
"कॅनेस्ट्रा नाही गं...तुला सांगितलं ना महत्त्वाचं काम आहे म्हणून... हवं तर आमचं काम झाल्यावर तुला मी बोलावीन, पण तू सुरुवातीपासून येऊ नकोस." जरा आवाज चढवतच ऋषिदा म्हणाला.
"मी आप्पांना सांगेन.... " मी शेवटी ब्रम्हास्त्र काढलं.
कोकणातल्या आजोळच्या घरावरची माडी हे आम्हां सगळ्याच भावंडांसाठी एक मोठं आकर्षण होतं. संपूर्ण घरात आता शहरी सोयी करून घेतल्या होत्या आप्पांनी.. पण डाव्या बाजूकडला वरचा भाग... ज्याला 'माडी' म्हणत असत.. तो मात्र तसाच ठेवला होता. तिथल्या लाकडी फळ्या टाकून तयार केलेल्या जमिनीवरून चालताना मस्तपैकी धाऽऽड धाऽऽड असा आवाज येत असे. माडीला असलेल्या गॅलरीतून घराच्या कौलांवर उड्या टाकता यायच्या. कौलांवर उतरलं की थोडं उतरून मागच्या अंगणातल्या आंब्याच्या झाडाची फांदी पकडून सहज झाडावर चढता येत असे. माडीच्या भिंतींना दिलेला गडद निळा आणि पोपटी रंग, कोनाडे आणि छताच्या उंचीवर असणारे झरोके यामुळे तिथलं वातावरण अगदी गूढ बनलेलं होतं. जुने पण महत्वाचे कागदपत्र माडीवर ट्रंकांमधून भरून ठेवले होते. तिथे फारसा कोणाचा वावर नसे त्यामुळे साफसफाईही जेमतेमच असायची आणि त्यात अडगळीचंच सामान असल्याने उंदारांचा वावरही जोमाने होता. त्यामुळे आजी किंवा आप्पा आम्हां मुलांना तिथे जायला देत नसत.
पण आज सुनीलदादा आला होता. तो असल्यावर सगळीच मुलं अगदी बिनधास्त असत. तो काय काय युक्त्या करून आप्पांना पटवत असे. आप्पांचा भारी विश्वास होता त्याच्यावर.... पोलिस इन्स्पेक्टर होता ना तो. त्याच्या जबाबदारीवर ही सगळी भुतावळ माडीवर जमणार होती. मी जरी सगळ्यांच्यात लहान असले तरी ही मुलं माझ्यावर दादागरी कधीच करीत नसत. अप्पांच्या धाकाने की काय माहित नाही, पण सगळेच जण मला सांभाळून घेत असत.
आमची टोलेबाजी चालू होती तिथे रश्मीताई आली आणि एकूणच माझा तक्रारीचा सूर पाहून ऋषीदाला म्हणाली,"येऊ दे रे अनुला पण, शेवटी तिच्यामुळेच तर आपल्याला ते प्रकरण कळलं. आणि अनु, एक लक्षात ठेव, आम्ही मोठे माडीवर जे काही बोलू त्यातलं एक अक्षरही आजी किंवा आप्पांना कळता कामा नये, कळलं?"
मी आज्ञाधारकपणे मान हलवली. ती काय 'प्रकरण' वगैरे म्हणाली त्याचा संदर्भ मला फारसा कळला नाही पण मीही फारशी खोलात शिरले नाही. नाहीतर मग मला माडीवर जायला मिळालं नसतं.
मी रश्मीताईबरोबर माडीवर पोचले तर तिथे बरीच मंडळी आलेली दिसली. ऋषीदा, सुनीलदादा, अभि, वंदू वगैरे होतेच आणि संध्याताई बरोबर नयना पण आलेली होती. मला तिथे पाहून नयनाने लगेच तोंड वाकडं केलं. मी काही लक्ष दिलं नाही तिच्याकडे. सुर्‍या आणि विशू पण दिसले. मोठाच प्रोग्रॅम ठरवलेला होता. खाली आजी, आप्पांना ह्याचा काहीच सुगावा लागलेला दिसत नव्हता. सुनीलदादाने काहीतरी जोरदार थाप मारून माडीची किल्ली मिळवलेली होती.
ह्या लोकांचा खेळ चालू झाल्यावर माझा गॅलरीतून कौलांवर जायचा प्लॅन होता. एक टपोरलेला शेंदरी आंबा मी सकाळीच हेरून ठेवला होता. पण सुनीलदादाने माडीवर ठेवलेल्या ट्रंकेच्या मागून एक बोर्ड काढला आणि सगळ्यांचेच डोळे विस्फारले. एका फडक्याने तो बोर्ड स्वच्छ पुसून त्याने खोलीच्या मधोमध ठेवला आणि त्याच्या भोवती पाणी शिंपडले. त्या बोर्डच्या चारही बाजूंनी A ते Z पर्यंत अक्षरं काढलेली होती. आणि 1 ते 9 आकडे पण होते. बरोब्बर मध्यभागी तीन गोल काढले होते, त्यात डाव्या बाजूच्या गोलात 'yes'' आणि उजव्या बाजूच्या गोलात 'no' असं लिहिलं होतं. मधला गोल रिकामाच होता.
"हे काय आहे?" मी रश्मीताईला ढोसलं.
तेव्हा 'श्श्ऽऽऽ' असं करून ती हलक्या आवाजात पुटपुटली, "ह्याला प्लँचेट म्हणतात, बोलायचं नाही हां अजिबात हे चालू झाल्यावर...कळलं ना?"
मी जोरात मान हलवली.
सुनीलदादाने वंदू आणि ऋषीदाला खुण केली तशी ती दोघं त्याच्याबरोबर त्या बोर्डच्या बाजूला बसले. सुनीलदादाने एक पितळेची पंचपात्री त्या मधल्या गोलात ठेवली आणि हात जोडून डोळे मिटले. वंदू आणि ऋषीदाने पण डोळे मिटले सुनीलदादाने मोठ्याने 'हूँऽऽऽ' असा आवाज काढला. केवढ्याने घुमला तो आवाज माडीवर.... नयनाने तर संध्याताईला घट्ट धरून ठेवलं. मला हसूच आलं तिचं.. भित्री भागूबाई कुठली!!
आता सुनीलदादा चक्क घुमायला लागला होता... नवरात्रातल्या अष्टमीच्या दिवशी त्या कुंकवाने माखलेल्या बायका घागर घेऊन हुंकार काढत घुमतात ना अगदी तस्साच घुमत होता तो.... मला कंटाळा यायला लागला म्हणून मी उठून जायला लागले तर रश्मीताईने माझा हात धरून बळेच खाली बसवलं मला.. तिथे बसलेल्या सर्वांचेच डोळे अक्षरशः बटाट्यासारखे झाले होते. थोडा वेळ घुमल्यावर सुनीलदादा शांत झाला... त्या तिघांनीही त्या पंचपात्रीवर आपल्या उजव्या हाताची अनामिका ठेवली.
वंदू मग सर्वांना म्हणाली, " ती आलीये.. आता कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारा... पण एकामागून एक विचारायचे, कोणीही दंगा करायचा नाही.."
"ती म्हणजे कोण गं?" मी हळूच रश्मीताईला विचारलं.
"पणजी आजीचं भूत... ती आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार.. तू विचारलास तरी चालेल प्रश्न.." रश्मीताईने कुजबुजत उत्तर दिलं.
आयला! सहीच!! पणजी आजी आली होती आणि ती प्रश्नांची उत्तरं देणार होती. सुनीलदादाला काय काय किती किती येतं... भन्नाटच आहे तो... मला एकदम अभिमानच वाटला त्याचा.
सुरुवातीला कोणी काहीच बोललं नाही. नयना तर नुसती थरथर कापत होती. सुर्‍याचा एकदम ठोकळा झाला होता.
शेवटी मग रश्मीताईने विचारलं, "मला मेडिकलला ऍडमिशन मिळेल का?" तिची आत्ताच बारावीची परीक्षा झाली होती.
काहीच झालं नाही. मग ऋषीदाने परत तोच प्रश्न विचारला, तेव्हा ती पंचपात्री जागच्या जागी थोडी फिरली मग अगदी हळूहळू सरकत 'yes' वर जाऊन परत मधल्या गोलात आली.
मी तोच विचार करत होते की पणजी आजी कशी देणार उत्तरं... समजा ती बोलली तर सर्वांना ऐकू येईल का? कारण ती गेली त्याआधी बरेच दिवस तिच्या तोंडातून आवाजच येईनासा झाला होता. पण हा प्रकार सहीच होता. रश्मीताई एकदम खुश झाल्यासारखी दिसत होती.
मग सुर्‍याने पण विचारलं त्याच्या दहावीच्या मार्कांबद्दल.... तर त्या पंचपात्रीने सरकत जाऊन ६ आणि ९ असे आकडे दाखवले. म्हणजे त्याला ६९% मिळणार होते. विशूने त्याची हरवलेली मांजर मिळेल का असं विचारलं तर 'yes' असं उत्तर आलं. पण 'कुठे मिळेल?' ह्या प्रश्नावर मात्र ती पंचपात्री काहीच बोलली नाही.... म्हणजे कुठेच फिरली नाही.
"पणजी आजीला इंग्लिश कुठे येत होतं?" मी हळूच अभिला विचारलं. हसायलाच लागला तो मोठ्याने... सुनीलदादाने रागाने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा गप्प झाला.
"अगं पणजी आजी आता स्वर्गात गेली ना, म्हणजे आता तिला सगळ्याच भाषा येतात.." रश्मीताईने मला समजावलं.
मला मज्जाच वाटली खूप... मीही मग माझ्या स्कॉलरशिपबद्दल विचारलं तर आधी काहीच उत्तर आलं नाही, मग वंदूने परत तोच प्रश्न विचारल्यावर पंचपात्री झपकन 'yes' वर गेली.
यूssहू ssss म्हणजे मला स्कॉलरशिप मिळणार होती तर....
मग अभिने संध्याताईच्या लग्नाबद्दल विचारलं तेव्हासुद्धा ती पंचपात्री 'yes' वर गेली. संध्याताईने एक धपकाच घातला त्याच्या पाठीत... पण हळूहळू आता सगळ्यांनाच त्या खेळात गंमत वाटू लागली होती. रश्मीताईने विचारलं की संध्याताईला कुठलं सासर मिळेल? तेव्हा पंचपात्रीने U, S, A अशी अक्षरं दाखवली.
हूssss अम्मेरिका...... सगळेच एकदम हुरळून गेले. संध्याताईचे गाल एकदम लाल लाल दिसायला लागले.
मग विशूने नयनाला प्रश्न विचारायचा आग्रह केला. ती काहीच बोलायला तयार होईना. विशू म्हणाला की मीच तिच्या वाटचा प्रश्न विचारतो... तर सगळेजण त्यालाच 'विचार, विचार' असं म्हणायला लागले. मग त्याने तोच संध्याताईचाच प्रश्न विचारला... म्हणजे लग्नाचा... नयना तर रागाने उठून जायला लागली पण संध्याताईने तिला अडवलं. सुनीलदादा आणि वंदूने एकमेकांना डोळ्यांनी काहीतरी खुणावलं... आणि रश्मीताईकडे पाहिलं तर तिनेही 'हो' म्हटल्यासारखी मान हलवली.
अभिने परत प्रश्न विचारला की नयनाचं लग्न होईल का? आणि झालं तर कोणाशी होईल... ती पंचपात्री आधी 'no' च्या दिशेने सरकत होती पण मध्येच थांबली आणि 'yes' वर जाऊन परत मधल्या गोलात आली. नयनाचा चेहरा जाम घाबरलेला दिसत होता... शी!! घाबरायचं काय त्यात... लग्न तर होणारच ना... संध्याताई घाबरली का? आता ती पंचपात्री इंग्लिश अक्षरांच्या दिशेने जायला लागली होती. R, O, S, H ही अक्षरं दाखवातच मी जोरात ओरडले, "रोशन!! रश्मीताई रोशनच.... मी तुला म्हटलं ना त्या दिवशी..."
नयना ताडकन् उठून उभीच राहिली. माझ्याकडे पाहून रागारागाने ओरडायला लागली,"हिच्यामुळे वाट लागली माझी... चुगलखोर कुठली.. उगाच घेऊन गेले तुला बाजारात त्या दिवशी.... लगेच घरी येऊन सांगायची काही गरज होती का?"
खरी होती तिची गोष्ट..... आजीने सांगितलं म्हणून मी गेले होते तिच्याबरोबर बाजारात त्या दिवशी.. तेव्हा तिला तो भेटला होता... शी!! कसातरीच होता तो एकदम... कानात काहीतरी रिंगसारखं घातलं होतं.. शर्ट असाच पँटच्या बाहेर आला होता... त्याच्या हातात सिगरेट होती आणि ओठ पण एकदम पान खाल्ल्यासारखे लाल लाल झाले होते. त्याच्या कपाळावर शिवण मारल्यासारखी एक मोठ्ठी खूण होती. खूपच रागीट दिसत होता तो त्यामुळे....तो कपाळावरचे केस मागे सारत होता तेव्हा ती खूण अगदी स्पष्टपणे दिसली मला..... नयनाला पाहून त्याने चक्क शिट्टी मारली... नयना पण गेली त्याच्याकडे धावत... एकदम माझा हात सोडून... किती वेळ मी एकटीच उभी होते तिथे.... ते दोघे दुकानाच्या आत जाऊन पडदा लावून बोलत होते किती तरी वेळ.... उभं राहून राहून माझे पाय दुखायला लागले... खुप वेळाने नयना बाहेर आली आणि मग मागे पाहून तो दिसेनासा होईपर्यंत त्याला टाssटा करत होती. तिला टाटा करताना पचकन् थुंकला तो.... शी!! घाणेरडा कुठला... मला एकदम घाणच वाटली त्याची... मी घरी येऊन रश्मीताईला सगळं सांगितलं... तेव्हा ती मोठे मोठे डोळे करून परत परत मला त्या मुलाबद्दल ती खोदून खोदून विचारत होती. मला तो मुलगा आवडला नव्हता एवढंच मी रश्मीताईला सांगितलं होतं.. ह्यात नयनाची कुठे मी चुगली केली होती? काही पण बोलते... बावळट कुठली!!
बराच वेळ नयना मोठ्या मोठ्याने ओरडत होती. माझ्याकडे रागारागाने बघत होती. मी रश्मीताईचा हात घट्ट पकडून ठेवला होता. काय माहीत.... मला मारायला वगैरे आली तर काय करायचं? पण तसं काही झालं नाही. बराच वेळ ओरडून बोलल्यावर ती एकदम खालीच बसली... आणि रडायला लागली.
वंदूने एव्हाना प्लँचेटचं सगळं सामान आवरून ठेवलं होतं. पणजी आजी कुठे गेली कोणास ठाऊक...
नयना जरा शांत झाल्यावर सुनीलदादाने तिच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केली. ती रोशनला कशी ओळखते? कधीपासून ओळखते? तुम्ही दोघे कुठे भेटता? भेटता तेव्हा अजून कोणी बरोबर असतं का? त्याचं घर कुठेय माहित्ये का वगैरे वगैरे.... नयना जमेल तशी तुटक तुटक उत्तरं देत होती. सुनीलदादा सकाळी आला तेव्हा त्याने मलाही त्या रोशनबद्दल काय काय विचारलं होतं. तो कसा दिसतो? साधारण किती उंच आहे? त्याच्या कपाळावरच्या खुणेबद्दलही त्याने परत परत मला विचारलं. शेवटी मी त्याला एक काटकी घेऊन मातीत ती खूण काढून दाखवली. मला फक्त तो 'शाब्बास' एवढंच म्हणाला. पण सुनीलदादाचा मला रागच आला. सकाळी मी त्याला म्हटलं की तुझ्या लाल दिव्याच्या गाडीतून मला एक चक्कर मार गावात तेव्हा मारे म्हणाला की 'मी एका ऑपरेशनवर आलोय, मला वेळ नाहीये तुझे लाड करायला'... मला फिरवायला वेळ नव्हता ह्याला मग आप्पा-आजीच्या नकळत हे प्लँचेट वगैरेचे धंदे करायला बरा वेळ आहे... आणि पोलिस काय करतात ऑपरेशन?
रोशन चांगला मुलगा नाहीये, त्याचे काय धंदे चालतात ते तुला माहीत नाही वगैरे काय काय सांगून सुनीलदादा आणि अभि नयनाला समजावत होते. पण ती हट्टीपणाने एकच एक म्हणत होती की आम्ही दोघे लग्न करणार आहोत.... शी!! रोशनशी लग्न? इतक्या घाणेरड्या मुलाशी? नयनाने रोशनशी लग्न केलं तर आप्पा तिला ठेवतील का कामावर?
त्यांचं बराच वेळ बोलणं चालू होतं. खालच्या चटईवर मी कधी झोपले तेच मला कळलं नाही. जाग आली तेव्हा माडीवर फक्त रश्मीताई, वंदू, सुर्‍या, अभि, संध्याताई आणि सुनीलदादा होते. विशु नयनाला घेऊन घरी गेला होता. सुनीलदादाने मला जवळ घेतलं आणि पुढच्या वेळी गाडीतून फिरवायचं प्रॉमिस केलं.
संध्याताई रात्रीच्या गाडीने मुंबईला जायची होती. आप्पांना सांगून नयनाला मी माझ्याबरोबर घेऊन जाते असं ती म्हणत होती. सुर्‍यानेच म्हणे तसं तिला सुचवलं होतं. इथलं वातावरण निवळलं की तो नयनाला आणायला संध्याताईकडे जाणार होता. कसलं वातावरण कोणास ठाऊक... सगळ्यांच्याच चेहर्‍यावर टेन्शन दिसत होतं.
सुनीलदादा जसा अचानक आला तसाच अचानक गेलासुद्धा...... तो खरं म्हणजे रात्री परत जाणार होता. बरीच तयारी करायला हवीये वगैरे काहीतरी म्हणत होता. नयनाने संध्याताईबरोबर जायला खूपच कटकट केली. पण सुर्‍याने तिचं सामान आधीच गाडीत ठेवलं होतं आणि अभिने बळजबरीनेच तिला गाडीत बसवलं. ती खूप रडत होती, 'एकदाच मला त्याला भेटू दे' असं म्हणत होती. पण अभिने तिचं अजिबात काही चालू दिलं नाही.
नंतरचे चार-पाच दिवस अगदीच कंटाळवाणे गेले. रश्मीताई, वंदू, ऋषीदा वगैरे सगळेच खूपच टेन्शनमध्ये वाटत होते. डोंगरावर करवंदांच्या जाळीतसुद्धा यायला कोणी तयार नव्हतं. मी मध्येच एकदा वंदूला म्हटलं पण की आपण पणजी आजीला परत बोलावू या का? तर त्यावर ती म्हणाली की हे प्लँचेट वगैरे काही खरं नसतं! खरं नसतं तर मग केलंच का त्या दिवशी माडीवर? उगाच नाटक करायला का? सतत चार वर्ष दहावीला बसतोय सुर्‍या...... त्याला दहावीला ६९% मिळणार म्हणजे मग झालंच त्याचं कल्याण.. ह्याचा अर्थ माझं स्कॉलरशिपचं पण खोटंच होतं. आणि संध्याताईची अमेरिका पण खोटीच होती.
रश्मीताई सतत माझ्या मागे मागे असायची... पण न बोलता. बाजारात जाऊन फिरून येऊया का म्हटलं तर घाबरून नको म्हणायची. म्हणे त्यांनी तुला बघितलंय नयनाबरोबर... मला काही कळतच नव्हतं त्यांचं बोलणं. सुनीलदादासकट सगळ्यांचाच राग येत होता. कोणाशीही बोलावंसं वाटत नव्हतं. आई बाबांची सारखी आठवण येत होती. कधी एकदा सुट्टी संपून मुंबईला त्यांच्याकडे जातोय असं झालं होतं.
एक दिवस मात्र सक्काळी लवकर अभि स्टँडवर जाऊन खूप सारे पेपर घेऊन आला. सगळ्या पेपरच्या पहिल्या पानावर सुनीलदादाचा मोठा फोटो होता. आणि अख्ख्या पेपरभर त्याच्याबद्दल छान छान सगळं लिहिलं होतं. त्याने म्हणे एक गँग पकडली होती. ती गँग रात्रीच्या वेळी किनार्‍यावर येणार्‍या बोटींतले खोके आपल्या गाडीतून आणून कुठे कुठे लपवून ठेवायची. आणि परत आपल्या गाडीतून कुठे लांब लांब पोचवायचीसुद्धा....
रश्मीताईला मी विचारलं गँग आणि खोक्यांबद्दल... ती एवढंच म्हणाली, "बाँबचं सामान असायचं त्या खोक्यांमध्ये... तू त्या रोशनचा पत्ता सांगितलास म्हणून सुनीलदादा एवढं सगळं शोधू शकला."
मी म्हटलं, "मला नाही माहीत रोशनचा पत्ता वगैरे आणि मी आधी कधी त्याला पाहिलंही नाहीये इथे गावात.."
तर ती म्हणाली, "कोणीच पाहिलं नव्हतं त्याला... पण तू त्याच्या कपाळावरची ती खूण सांगितलीस ना त्यावरूनच सुनीलदादाने अंदाज बांधला.. आणि तो अंदाज खरा ठरला. मग नयनाकडून त्याच्याबद्दलची माहिती विचारून घेतल्यावर त्याला शोधून काढणं फारसं कठीण नाही गेलं. पण त्याची पाळंमुळं शोधायला बराच त्रास झाला सुनीलदादाला..."
माय गॉड!! म्हणजे रोशन त्या गँगमध्ये होता. शी!! नयना पण वेडीच आहे, असं गँगमधल्या माणसाशी कोणी लग्न करतं का....
आप्पांना आणि आजीला मग अभिने सगळंच सविस्तर सांगितलं. आप्पा तर आपल्या नातवावर एकदम खुश झाले होते. आजीने ऋषीदाला मिठाई आणायला बाजारात पिटाळलं. मग दिवसभर कोण ना कोण तरी घरी येत-जात होते. आप्पांचं, सुनीलदादाचं अभिनंदन करायला... आप्पा सगळ्यांना मुद्दाम माझ्याबद्दलही सांगत होते, माझं कौतुक करायला सांगत होते.
दोन दिवसांनी सुनीलदादा घरी आल्यावर एक जंगी मेजवानी दिली आजीने सर्वांना.... गावाने त्याचा सत्कारही केला. मज्जाच मज्जा सगळी.... मधल्या चार-पाच दिवसांचा कंटाळा एकदम पळूनच गेला. पण आमची सुट्टी संपत आली होती. त्यामुळे मुंबईला जाणं भाग होतं.
आम्ही आजीकडून निघालो तेव्हा आप्पांनी मला बक्षिस म्हणून आंब्याची एक पेटी जास्त दिली इतरांपेक्षा.... नयनाची आई गंगूमावशी सारखी येऊन मला कवटाळत होती. 'माझ्या बायच्या डोक्यावरचं भूत उतरवलंस' असं काहीतरी म्हणत होती. मी तिला कित्ती सांगितलं की ते भूत वगैरे खोटं असतं तरी तिचं माझ्या डोक्यावरून हात फिरवून कडाकडा बोटं मोडणं चालूच होतं.
मुंबईला गेल्यावर मैत्रिणींना सांगायला माझ्याकडे भरपूर मालमसाला होता. सुनीलदादाच्या पराक्रमामुळे ह्यावेळची सुट्टी एकदम मस्त झाली होती. सुनीलदादा आम्हा सगळ्यांना मुंबईला सोडायला येणार होता...... तेही चक्क लाल दिव्याच्या गाडीतून!! त्याची आता मुंबईलाच बदली झाली होती. तो आता आमच्याचकडे राहणार होता. मस्तच धमाल होती सगळीच.........
Posted by Unknown at १२:५७ PM
Labels: कथा

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)

Blog Design by Gisele Jaquenod | Distributed by Deluxe Templates