skip to main | skip to sidebar

इथे काय लिहिलंय?

  • कथा (5)
  • प्रारंभ (1)
  • मुलाखत (1)
  • लेख (2)
  • लोकलकथा (2)

संग्रह

  • ▼ 2013 (4)
    • ► जून 2013 (2)
      • प्रारंभ
      • कुंपण आणि शेत
    • ► जुलै 2013 (1)
      • आपली आवड
    • ▼ ऑगस्ट 2013 (1)
      • संपूर्ण खादुर्मास
  • ► 2014 (1)
    • ► मे 2014 (1)
  • ► 2015 (1)
    • ► एप्रिल 2015 (1)
  • ► 2018 (5)
    • ► ऑक्टोबर 2018 (4)
    • ► नोव्हेंबर 2018 (1)

सगेसोयरे

  • कथापौर्णिमा
  • नंदिनी

पाहुणे

असंच काही बाही

सुचलेलं, अनुभवलेलं...

६ ऑगस्ट, २०१३

संपूर्ण खादुर्मास



आज दीप अमावास्या!
उद्यापासून श्रावण महिना चालू..
लहानपणापासूनच श्रावण महिना माझ्या भारी आवडीचा आहे. मस्त पाऊस, हिरवा आसमंत, मंगळागौरीचे खेळ, सत्यनारायणाची पूजा, सणांच्या निमित्ताने तर्‍हेतर्‍हेची पक्वान्नं इत्यादींमुळे वातावरणात कसा मस्त उत्साह भरलेला असतो. श्रावण महिन्याच्या या उत्साहाचा आणि आनंदाचा संचार जसा माझ्यात झाला तसा तुमच्यातही होवो अश्या शुभेच्छा!

मायबोलीवरील गणेशोत्सवात ही कथा सर्वप्रथम मी लिहिली होती. कथालेखनस्पर्धेचा विषयच असा होता की मोह आवरता येणं शक्यच नव्हतं. घरच्या गणपतीच्या गडबडीतही माझी खाद्ययात्रा जशी जमली तशी लिहून टाकलीच.

मग त्यानंतर तीन वर्षांनी तीच कथा 'माहेर' मासिकासाठी फेरफार करून नव्याने लिहिली. 
ती 'संपूर्ण खादुर्मास' माहेर मासिकाच्या सप्टेंबर २०११च्या अंकात प्रसिद्ध झाली.
 
******************************************

"मामाss...."
आज तिसर्‍यांदा दुकानावर येत होते. गेल्या दोन खेपेला ब्लाऊज काही किडूकमिडूक कारणांमुळे मिळाले नव्हते. आज तरी मिळतील ना? अश्या शंकेने मी अधीर होऊन आर्त स्वरांत मामांना हाक मारली.

मामांचं लक्षच नव्हतं. पुढ्यात कापडांचा ढीग आणि सभोवताली बायकांचा... सवयीने त्यांचे हात झरझर चालत होते. समोरच्या कष्टमरची मापं घेऊन टेप गळ्यात टाकायची, डायरीत मापं लिहायची, रीसीट बनवायची, कापडाचा तुकडा रीसीटीला जोडायचा, कष्टमरला द्यायची की 'नेक्श्ट!' अशी हाक मारत पुढची कष्टमर मापायला मामा मोकळे... पाच मिनीटात तीन कष्टमरांना संपवलं मामांनी... त्यांच्या या चपळाईने प्रेरीत होऊन चौथी कष्टमर त्यांच्या पुढे उभी रहायच्या आत मी मधे घुसले आणि खणखणीत आवाजात ओरडले, "मामा, माझे ब्लाऊज!!"

चष्म्याच्या काचेच्या वरून मला आपादमस्तक न्याहाळत मामांनी टेबलावरची प्लास्टीकची पिशवी माझ्या पुढ्यात सरकवली. अरेच्या! म्हणजे मी दुकानात शिरले तेव्हा टेबलाखालच्या कपाटातून काढून टेबलावर ठेवलेली पिशवी माझ्याचसाठी होती तर... मी कशीबशी हसत ती पिशवी ताब्यात घेतली आणि मामांच्या 'नेक्श्ट!' ला जागा करून देण्यासाठी बाजूला झाले. पिशवीतले ब्लाऊज तपासून घेऊन एक पिवळी नोट मामांना बहाल करत दुकानातून बाहेर पडले. एका पिवळ्या नोटेचा खातमा झाल्याच्या दु:खावर उपाय म्हणून पर्समधलं एक डेअरीमिल्क खाल्लं आणि बहिणीच्या घरी मोर्चा वळवला.

"यादी लिहिली का गं? साबुदाणा चांगला दे म्हणावं...मेल्यान् गेल्यावेळी पाठवलेला साबुदाणा नुसता चिक्कट होता. आणि वर्‍याचे तांदूळ पण पाठवायला सांग. शेंगदाणे जरा जास्तीचे लिहिलेत ना? आणि उपासाची भाजणी दिली का दळायला?"
दृश्य मोठं गंमतीशीर होतं. ताईच्या आजेसासुबाईंनी आपल्या सुनेला वेठीला धरलं होतं. ताई ज्युनिअर म्हणून सुरक्षित होती.
"ही कसली तयारी?" ताईच्या हातात तिचा ब्लाऊज कोंबत मी कुजुबुजत विचारलं.
"श्रावण महिना..."
"रोजचं दूध जास्तीचं टाकायला सांगितलं आहेस ना गं? रोज विरजणं लावत जा.. दही, ताक भरपूर हवं. मेलं उपासाचं खाऊन पित्त व्हायला नको. मार्केटात केळी, चिकू, सिताफळ, डाळींब, पपया काय ताजी फळं दिसतील ती घेऊन येत जा. आणि चांगलासा खजूर आणून ठेव घरी... अधनंमधनं खजुराचं दूध घ्यायला बरं. म्हणजे उपास बाधत नाही. कळलं का?"
ताईच्या सासुबाई ढीम्म् होत्या. हे संवाद त्यांच्या सवयीचे झाले असावेत.
"आणि तू गं, स्टेशनातूनच येतेस ना रोज?" माझ्याकडे मोर्चा वळवत आजेसासुबाई वदल्या.
"हो.. हो.."
"मग कधी मधी चांगली रताळी, सुरण, कोनफळ असलं काही त्या वसईवाल्याकडे दिसलं की इकडे आणून देत जा. माहिताय का कोनफळ कशाला म्हणतात ते?"

'कोनफळच काय मला बेलफळ, सिताफळ, रामफळ.. झालंच तर रावणफळ पण माहिताय' असलं आचरट उत्तर मी द्यायच्या विचारात असताना माझ्या हातावर खोबर्‍याची वडी ठेवत ताईने माझी बोळवण केली. पुढील धोक्याची घंटा तिच्या टाळक्यात वाजली असावी. 

यंदाच्या उन्हाळ्यात आमच्या आज्जीने 'झेपत नाहीत, सहन होत नाहीत' असं म्हणत आपल्या सगळ्या भरजरी साड्या प्रदर्शनात काढल्या होत्या. आमच्या मावश्या तिकडे पोचायच्या आत मी आणि ताईने चपळाईने तिच्या गुलबक्षी पैठणीवर आणि अंजिरी शालूवर झडप घातली होती. 'तुम्ही त्या नऊवारी साड्या फाडून ड्रेस शिवाल' असं म्हणत मावश्यांनी आमच्यावर दादागिरी करायचा प्रयत्न केला पण आम्हीही त्यांच्याच भाच्या होतो. आज्जीकडून नऊवारीची सहावारी करायची परवानगी घेत साड्या आमच्याकडे ठेवण्यात यशस्वी झालो.
आमच्या आज्जीचा ऐंशीवा वाढदिवस अनंतचतुर्दशीच्या दिवशी दणक्यात करायचा घाट मामाने घातला होता. मग त्या साड्या नेसण्याचा याहून सुंदर असा दुसरा मुहूर्त कोणता?

घरी पोचले. घाईघाईने पिशवी उघडली. तो सुरेख अंजिरी रंगाचा अस्सल जरतारी काठांचा रेशमी ब्लाऊज पाहून मी अगदी हरखून गेले. 'माझ्यासाठी म्हणून खास ह्यांनी हा शालू आणला बरं! एक आख्खा रुपाया खर्चून..' असं प्रेमाने ओथंबलेल्या नजरेने सांगणारी आज्जी डोळ्यांसमोर उभी राहिली. सुमारे चौसष्ट वर्षांपुर्वीचा आज्जीच्या लग्नातला शालू... तेव्हा होता तस्साच आजही... आणि तितकाच सुंदर. हा अनमोल ठेवा आपल्याकडे आला म्हणून विशेष मोहरून गेले मी.
एका अनोख्या धुंदीत ब्लाऊज चढवून बघितला अन् काय... खाडकन् वर्तमानात उतरले मी. घट्ट होत होता की हो तो! हाय रे दैवा!!

पुन्हा तयारी करून लगेच घाईघाईने शिंपीमामांकडे गेले. म्हटलं, श्रावणाची अन् गौरी-गणपतींची गडबड सुरू झाली की या असल्या बारीक कामाकडे मामा ढुंकून पण बघायचे नाहीत.

"नाही होणार!"
"का नाही होणार पण? एक लाईन फक्त उसवून द्या.." मी कासावीस होत मामांना म्हटलं.
"ताई, अस्सल रेशीम आहे ते... का त्रास देता बिचार्‍याला?"
"अहो त्रास काय? मी घालू कसा हा घट्ट ब्लाऊज?"
"घट्ट म्हणजे काय? श्वास कोंडतोय का? गुदमरायला होतंय का?"
"नाही... म्हणजे तितकं काही होत नाहीये.. पण थोडा और सैल चलेगा.."
"ताई, आता हा ब्लाऊज उसवून घातलात तर शिवणीवर भोकं पडलेली दिसतील. चालेल का? तर देतो उसवून.."
"भोकं? आई गं! आता मी कसा घालू हा ब्लाऊज?" अक्षरशः रडकुंडीला आले मी.
"बारीक व्हा!" पेर्ते व्हा या चालीवर मामा म्हणाले.
मला एकदम अशोक सराफसारखं 'यूहॉहॉहॉहॉहॉ' करून हसावंस वाटलं. बारीक व्हा काय... हा काय सल्ला आहे? 'जाड व्हा' म्हटलं असतं तर शक्य होतं एकवेळ, पण बारीक व्हा?? काहीही..
मामांनी एव्हाना आपलं 'नेक्श्ट' काम चालू केलं होतं त्यामुळे ब्लाऊज घेऊन दुकानाबाहेर पडण्याशिवाय मला गत्यंतर नव्हतं.

घरी आल्यावर 'काय हे आपलं संचित?' असं मनाशीच म्हणत सचिंत मनानेच जेवणं उरकली. ब्लाऊजात घुसायचं कसं? या प्रश्नाने मनाचा पार भुगा केला होता. इतका, की नवर्‍याच्या 'मग? आता 'नेसली माहेरची साssडी' हे गाणं नाही म्हणणार का तू आज्जीच्या वाढदिवशी?' या प्रश्नाचा नुसताच अनुल्लेख केला. त्या तुच्छ प्रश्नाचा अनुल्लेख तुच्छ कटाक्ष टाकूनच करावा हे भान उरलं नाही. शेवटी 'अजून महिना आहे, तेव्हाचं तेव्हा बघू. नाही शिरले ब्लाऊजात तर नवा सोनेरी ब्लाऊज घेतलाय तो घालू त्या शालूवर' असं मनाशी ठरवून झोपून गेले. झोपेतही, ताई माझ्या सोनेरी ब्लाऊजला हसतेय, मावश्या काहीतरी कॉमेंट करून वैताग आणताहेत असलीच स्वप्नं पडत होती. 

श्रावण सुरु झाल्यावर पहिल्याच रविवारी आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा ठरली. आई-बाबा मेव्हणाचं जेवायला येतो म्हणाले. मग बेतही खासा ठरला. आम्रखंड, पुरी, फ्लॉवरची रस्सा भाजी, मसालेभात, नारळाचं दूध घालून टोमॅटोचं सार. बाकी इतर प्रसादाचा शिरा, खीर-पुरण, वरण भात होताच. सगळाच मेनू भन्नाट आवडीचा. माझा प्रसादही अस्सा काही जमलाय म्हणता.. आम्रखंडही अगदी ताजं मिळालं... हम्म्!! अंमळ जडच झालं जरा जेवण.
आहारल्याने डोळ्यावर सुरेखशी ग्लानी आली होती. जरा पहुडणार तेवढ्यात आईने 'बघू गं जरा तुझा आज्जीच्या साडीवरचा ब्लाऊज' असं म्हणत झोप खाडकन् उडवली. ब्लाऊज तिला दाखवताना अगदी तिखटमीठ लावून शिंपीमामांची कंप्लेंट केली. पण आमच्या मातोश्रींनी बाऊन्सरच टाकला. म्हणते कशी, 'तुला घट्ट होतोय म्हणजे मला एकदम बरोबर बसेल हा ब्लाऊज. मीच नेसू काय ही साडी?'
'नह्हीsss' म्हणत माझं किंचाळणं आणि नवर्‍याचं खुनशी हसणं दोन्ही कसं जोडीनेच झालं.

मला कधीपासून खाऊन बघायची होती ती 'दिंडं' स्नेहा नागपंचमीच्या दिवशी डब्यातून ऑफिसात घेऊन आली. आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी कायम रव्याची खीर असायची. त्यामुळे 'दिंड' कधी खाऊन बघितलेलीच नव्हती.

मऊ लुसलुशीत शिजलेलं पुरण, त्यावर कणकीचं आवरण
गरमगरम असतानाच तूप सोडून खाल्लं, मग एकावरच कशी होईल बोळवण?

आता ऑफिसात कशी काय मिळणार गरमगरम दिंडं? असा प्रश्न तुम्हाला पडायच्या आधीच सांगते, आमच्या ऑफिसात ओव्हन आहे. काय वाट्टेल त्या गोष्टी तिथे गरम करता येतात. रोजचे डबे तर आम्ही गरम करून घेतोच पण काही निवडक बायका त्यात लाडवाचं बेसन, कुटाचे शेंगदाणे इत्यादी घरगुती वस्तू देखिल भाजून घेतात.

मंगळागौरीसाठी दोन मंगळवार आधीच लागले होते आणि चक्क खेळायलाही बोलावणं होतं. नाहीतर हल्ली ह्या मुली जागरण नकोच म्हणतात, म्हणे दुसर्‍या दिवशी ऑफिस असतं. येत नाहीत हो खेळ त्यांना आमच्यासारखे म्हणून काहीतरी कारणं द्यायची झालं...
मंगळागौरीचं वातावरणही कसं अगदी ट्रान्समधे नेणारं असतं. श्रावणातला पाऊस, मंगळागौरीची पत्री, केळीचे खांब, झेंडूचं तोरण, मोगरा, चाफा, गुलाब, शेवंती इत्यादी निरनिराळी रंगीबेरंगी फुलं, ऊद, उदबत्त्या, निरांजनं, हळद-कुंकू, अत्तर, गजरे, रेशमी साड्या या सगळ्याचे सुगंध कसे एकमेकांत सुरेखसे गुंफले गेलेले असतात आणि त्यात भाजणीचे वडे, दही, मटकीची उसळ, गुलाबजाम, पुलाव किंवा मसालेभात या सुग्रास मेनूचा दरवळ.. खेळ रंगतात, उखाणे रंगतात, गाणी रंगतात, गप्पा रंगतात आणि भर मध्यरात्री जायफळ चढवलेली गोडसर कॉफी या सगळ्यावर कळस चढवते.  

लागोपाठ दोन मंगळवार धूमशान खेळल्यामुळे ब्लाऊजात आपण शिरू शकू या माझ्या अंधुकश्या कल्पनेला सुरूंग लागला. ब्लाऊजचं फिटींग जैसे थे!
'शिंपीमामांच्या नावाने चांगभलं!' म्हणत एक डेअरीमिल्क खाल्ली तेव्हा कुठे नैराश्य जरास्सं गेलं.

आमची राखीपौर्णिमा विशेष असते. सगळ्या मामे-मावस भावंडांनी मिळून एका घरी जमायचं.
आधी ज्येष्ठ पिढीतले भाऊ कोचावर बसणार, भगिन्या औक्षण करून त्यांना राख्या बांधणार.
मग श्रेष्ठ पिढीतले; म्हणजे आमच्या पिढीतले भाऊ कोचावर बसणार, आम्ही सगळ्या बहिणी अतिशय कर्कश्य स्वरांत 'भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना' हे समूहगीत म्हणणार.
मग धाकटी पिढी. त्यांचा तर भारी गोंधळ! ज्येष्ठ सगळे सगळ्या बाजूंनी सूचनांचा भडीमार करताहेत.. धाकट्या पिढीतल्या बहिणींना राखी बांधायची नाहीये तर बांधून घ्यायचीये... कोण किंचाळतंय, कोण ओरडतंय... मग एका क्षणी धीर सुटून श्रेष्ठ पिढीतली माता टीपेचा सूर लावते, मग पुढचा कार्यक्रम मुसमुसत, हमसत पार पडातो. 
धमालच सगळी!
जेवणाचा थाटही विशेष असतो. ज्याचं घर तिने ओल्या नारळाच्या करंज्या करायच्या. बाकी पदार्थ बाकीच्यांनी ठरवून आणायचे.
यंदा, मेथी मटर मलाई, कोकोनट राईस, अळूवड्या, खोबर्‍याची चटणी, सोलकढी, पोळ्या असा एकदम भारीभक्कम कोलेस्ट्रॉलयुक्त मेनू होता. आणि आपल्या आवडीच्या माणसांबरोबर पोटात चार घास जरा जास्तीच जातात नाही का?
जेवण झाल्यावर मघई पानाची जोडी, सोबतीला गप्पा आणि मग अगदी निघताना मामाने आणलेलं टेंडर कोकोनट आईस्क्रीम!
व्वा! क्या बात है!

गुरूवारी, 'उद्या डबा आणू नका' अशी चित्राची ईमेल मी, स्नेहा आणि दिव्या अशी तिघींनाही आली. कारण काय ते कळलं नव्हतं. 'आयतं जेवण मिळतंय ना' या सुखासीन विचारात आम्ही कोणीही तिला कारण विचारायच्या भानगडीत पडलो नाही.
शुक्रवारी नेहमीच्या ट्रेनला चित्रा दिसली नाही. पण 'अकरा वाजेपर्यंत पोचतेय' असा तिचा एस्.एम्.एस्. स्नेहाला आला होता.
दुपारी लंचटाईमला हातात चांगली मोठी पिशवी घेऊन चित्राबाई अवतीर्ण झाल्या. पहिला डबा, दुसरा डबा, तिसरा, चौथा... अरे काय! डबे संपायलाच तयार नाहीत. शिवाय एका प्लास्टीकच्या पिशवीत मण्यांच्या पट्ट्याही होत्या. कँटीनवाल्याकडून अंमळ मोठ्याच प्लेटी चित्राने मागून घेतल्या. तीन चार डबे तिने ओव्हनात गरम करायला ठेवले आणि  आमच्या टेबलावर तिने मांडामांड केली. एका डबीतून लिंबाच्या फोडी, एका डब्यात काकडीची कोशिंबीर काढत आमच्या प्लेटीत वाढल्या. प्लेटीभोवती मण्यांच्या पट्ट्या मांडल्या. मग ओव्हनातले डबे ती घेऊन आली. एकात साधा भात, एकात वरण, एकात बटाट्याची भाजी, एकात मसालेभात. आम्ही आश्चर्याने बेशुद्ध पडायच्या मार्गावर असताना तिने अजून एका डब्यातून पुरणपोळ्या काढत आमच्या प्लेटीत वाढल्या, त्यावर तूप वाढलं आणि म्हणाली, 'सवाष्णींनो, सावकाश जेवा!' 
काय म्हणावं या उरकाला? इकडे आमच्या हातून सकाळच्या घाईत पोळी-भाजी हे दोनच पदार्थ देखिल व्हायची मारामार आणि ही बाई एवढे सगळे पदार्थ करून घेऊन आली?
'पुरणपोळ्या सासुबाईंनी कालच करून ठेवल्या गं. मग सकाळी कोशिंबीर, भाजी, मसालेभात व्हायला कितीसा वेळ लागतोय? आणि एका गॅसवर वरण्भाताचा कूकर चढवला, झालं काम. ऑफिसला दांडी नको आणि शुक्रवारची सवाष्ण रविवारी घातली म्हणून अपराधी वाटायला नको.'
बाप रे!! दोन वाक्यात हीने सगळा स्वयंपाक संपवला. आमचे दोन घास देखिल पुरते खाऊन झाले नव्हते.
पुरणपोळीच्या सुग्रास जेवणानंतर डोळे मिटू मिटू होत होते. पण आम्ही ऑफिसात होतो. शिवाय सवाष्णीचं वाण म्हणून चित्राने दिलेला ब्लाऊजपीस वाकुल्या दाखवत होता. घरी, कपाटात ठेवलेला अंजिरी रेशमी ब्लाऊज डोळ्यांसमोर नाचत होता. 

माहेर मासिकाचा 'अन्नपूर्णा विशेषांक' चाळत असताना दोन विशेष पाककृती पसंतीला उतरल्या. मिनोती यांची संत्र-नारळाची वडी आणि उषा पुरोहितांनी लिहिलेला 'कुंजबिहारी पेढा'.. म्हटलं, यंदा गणपतीला प्रसाद म्हणून यापैकी एखादा गोड पदार्थ करायला हरकत नाही. पण डायरेक्ट प्रसाद करण्यापेक्षा आधी एकदा ट्रायल घेऊन पहावी म्हणून आधी वड्या करून पाहिल्या... छानच झाल्या होत्या अगदी खुसखुशीत, चव बघताना मीच ५-६ तोंडात टाकल्या. पेढाही करायला एकदम सोप्पा, चवही अगदी सुरेख जमून आली. पुन्हा तीन-चार पेढे चव म्हणून स्वाहा! झाले. सर्वानुमते कुंजबिहारी पेढाच गणपतीच प्रसाद म्हणून करायचा ठरला.

गणपतीत असणारी आमच्या कामवाल्या काकुंची दांडी आता आमच्या सवयीची झाली आहे. त्यामुळे लवकर उठून केर-लादी, आदल्या दिवशीची भांडी घासणं वगैरे पारोशी कामं उरकून, आंघोळ करून पुजेच्या आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं हे ठरून गेलेलं आहे. शिवाय रीकामं होईल तसतसं एकेक भांडं घासून हातासरशी अडगवून टाकायचं म्हणजे पसारा पडत नाही.

गणपतीच्या पहिल्या दिवशी दुपारी जेवायला एकूण २० माणसं होती.. केर-लादी, नैवेद्याचा स्वयंपाक, मोदक, एवढ्या माणसांच्या पंगती वाढणं, पंगत जेवल्यावर लादी पुसणं, आल्या-गेल्याची ऊठबस, सारख्या आत-बाहेर खेपा... माझा अगदी पिट्ट्या पडला. दुपारी जेवायला ३ वाजले, भुकेची वेळ टळून गेली होती, फारसं काही जेवण गेलंच नाही मला.. पहिलं वाढलेलंच जेमतेम संपवलं. मोदक गार झाल्याने तुपाचीही धार नाही घेतली त्यामुळे मोदक खायची मजाच गेली.

आमच्या गणपतीचं विसर्जन झाल्यावर माहेरी गेले.. तिकडे गौरी-गणपती असतात.  तिकडेही कामवाल्या बाईची सुट्टी.... सगळ्यांचा सण! आपणही समजून घ्यायला पाहिजे.

आमच्या मातोश्रींनी गौरीजेवणाचा थाट अगदी झक्कास केला होता. मी आणि ताईने सुट्टीच घेतल्याने आईला कौतुकाच्या दोन्ही माहेरवाशिणी मिळाल्या होत्या. मग मोठ्या लेकीला आवडते म्हणून बासुंदी आणि धाकट्या लेकीला, म्हणजे अस्मादिकांना आवडतो म्हणून दुधीहलवा असा दुहेरी गोडाचा बेत होता. शिवाय कोथिंबीर वडी, पुलाव, नारळाच्या दुधातली डाळींब्यांची उसळ, काकडीचं रायतं, अळूचं फदफदं वगैरे अतिआवडीचे पदार्थ होतेच. सुग्रास जेवणाची, डोळे जडावून जी दुपारची झोप लागते ना, मला फार आवडते ती... तशी एकदम झक्कास झोप लागली.

जेवणाव्यतिरिक्त, दर्शनाला येणार्‍या मंडळींनी गणपतीसमोर प्रसादाला ठेवलेल्या पेढे-बर्फ्या येता-जाता तोंडात टाकण चालू होतंच. मला अनंत चतुर्दशी डोळ्यासमोर नाचत होती तरीही मी खायचं काहीही बाकी ठेवत नव्हते. कारण जोडीला घरकामही होतंच. शिवाय, तो सोनेरी ब्लाऊज रेडीमेड असल्याने 'स्ट्रेचेबल' होता. 

गौरीविसर्जनाच्या दिवशी परत मोदक आणि गौरींच्या पाठवणीच्या पाटवड्या... जिभेची अगदी तृप्ती झाली. 

आज्जीच्या कार्यक्रमाला आता जेमतेम चार-पाच दिवसच राहिले होते. तिच्या फोटोंचा एक मोठा कोलाज करायचा अशी कल्पना डोक्यात होती. मग एक रात्र मामाकडे मुक्काम ठोकून त्याच्याकडचे सगळे जुने अल्बम चाळून निवडक फोटो घेतले. एका जुन्या अल्बममधे मामीच्या मंगळागौरीचे फोटो सापडले. फोटो होते कृष्णधवल, पण मंगळागौरीच्यावेळी आज्जीने तोच, अंजिरी रंगाचा शालू नेसला होता. कित्ती मस्त दिसत होती आज्जी! हातात, गळ्यात भरगच्च दागिने, नाकात नथ, कानात बुगड्या, केसांचा खोपा घातलेला, भरजरी शालू आणि अंगभर घेतलेला पदर.. तो फोटो पाहून मन अगदी भरून आलं.

पुढचे सगळे दिवस खपून आज्जीच्या फोटोंचा मस्त कोलाज बनवला. कार्यक्रमाची बाकी सगळी तयारी केली. नवर्‍याचा कुडता-सलवार इस्त्री करताना त्या अंजिरी रेशमी ब्लाऊजवरही जरा इस्त्री फिरवली. कोणास ठाऊक! कर्मधर्मसंयोगाने तो ब्लाऊज होईलही आपल्याला.
आणि खरंच, अनंतचतुर्दशीच्या दिवशी सकाळी सगळी तयारी झाल्यावर ब्लाऊज चढवला, आणि एकदम सुरेख फिट झाला. मला तर आनंदाने उड्याच माराव्याश्या वाटू लागल्या.
'ड्रिम केम ट्रू' एवढाच एस.एम.एस. ताईला पाठवला आणि भराभर पुढची तयारी उरकली. काय सुंदर दिसत होता तो शालू! मोजकेच पण साजेसे दागिने घातले आणि आम्ही बाहेर पडलो. नवर्‍याच्या नजरेतली पसंतीची पावती सुखावत होती.

आज्जीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम दणक्यात पार पडला. आज्जीच्या तीनही मुली, जावई, मुलगा, सून, नातवंडं, पतवंडं, दोघी बहिणी, त्यांचं कुटुंब सगळे सगळे आवर्जून हजर होते. तिच्या चेहर्‍यावर कृतकृत्यतेचं समाधान विलसत होतं. आज्जी फक्त एवढंच बोलू शकली की 'माझं नशीब थोर म्हणून माझ्या भोवती आज माझ्या भोवती एवढा गोतावळा जमलाय..' पण मी आणि ताई मात्र मनात म्हणत होतो की 'आमचं नशीब थोर म्हणून आम्हाला तुझं प्रेम, तुझे संस्कार आणि तुझ्या आचारविचारांचा अमूल्य असा ठेवा मिळालाय.'

 - मंजू. 

Posted by Unknown at ३:३९ PM 2 comments
Labels: कथा

६ जुलै, २०१३

आपली आवड

ही माझी सगळ्यात पहिली कथा. आणि म्हणूनच अगदी बाळबोध आहे.
पण या कथेमुळे मला लिखाणासाठी उत्तेजन मिळाले त्यासाठीच ही कथा मला स्वत:ला फार आवडते. मी कधी कथा वगैरे लिहीन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण मायबोलीवर आले, तिथल्या उत्तमोत्तम साहित्याचा आस्वाद घ्यायला लागले, मग आपणही काही लिहून पहावे अशी ऊर्मी निर्माण झाली. कॉम्प्युटरवर मराठी टाईप करण्याची मजा काही वेगळीच... मनात येईल त्याक्षणी लिहिता येतं, नको ते खोडता येतं, तिसरी ओळ पाचव्या ओळीच्या ठिकाणी आणि सातवी ओळ चौथ्या ओळीत सहजतेने नेता येते. खाडाखोडी शून्य. हस्ताक्षराची फिकीर बाळगायचं काही कारणच नाही. तर, या सगळ्या गोष्टींमुळे मला लिहिण्याची आवड निर्माण झाली. आणि तश्या दृष्टीने विचार करण्याची, परिस्थितीकडे बघण्याची सवय लागली. 'चांगलं लिहिते आहेस, अजून लिही' असं ढोसणारे, उत्तेजन देणारे मैत्र मला मायबोलीवरच लाभले.
मला लिहायला उद्युक्त करणार्‍या मायबोलीचे अनेक आभार!!

******************************************

कर्कश्य वाजणार्‍या मोबाईलच्या अलार्मने चित्राला जाग आली. मनाशी चरफडलीच ती. खरं म्हणजे उठल्यावर प्रसन्न वाटावं म्हणून तिच्या मोबाईलवर तिने मंजूळ बासरीची धून अलार्म टोन म्हणून सेट केली होती. पण आत्ता वाजला तो मोबाईल तिच्या नवर्‍याचा, अमितचा होता. तो गाढ झोपला होता, तिचा मोबाईल पलिकडे टिपॉयवर ठेऊन... नेहमीच तो अशी मोबाईलची बदलाबदली करून आपली आवड करत असे. त्याचं पांघरूण खसकन ओढून त्याला उठवायचा असूरी विचार तिच्या मनात आला पण नंतरचं भांडण निस्तरायला तिच्या घड्याळाला वेळ नव्हता. भराभर आन्हिक आटपून ती स्वयंपाकघरात आली आणि तिच्या लक्षात आलं की दूधवाला मुलगा आज येणार नाहीये. तिला खाली उतरणं भाग होतं. तिचे सासूबाई सासरेबूवा मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यांच्या यायच्या रस्त्यावरच डेरी होती पण हातात पैश्यांची अडचण होते ह्या सबबीवर ते दूध आणणं टाळत असत.

तशी आजची डब्याची घाई नव्हती. शनिवार असल्याने सकाळचा पोटभरीचा नाश्ता, अर्थात ब्रंच केलं तरी चालत असे. तिने कालच रात्री इडल्या करण्यासाठी पीठ वाटून ठेवलं होतं. चटणीची तयारी करायला घेतली आणि लाईट गेले. अस्सा राग आला ना तिला. 'आपली आवड' दुसरं काय. हा तिचा अगदी आवडता शब्द होता. स्वत:च्या सोईप्रमाणे लोकं दुसर्‍याचं (खरं म्हणजे तिचंच) प्लॅनिंग बिघडवतात, त्यासाठी योजलेला हा खास शब्द होता. भारनियमनाची वेळ खरी दुपारची होती. पण वीज नियामक मंडळाला चित्राची भंबेरी उडवायची होती म्हणून त्यांनी सकाळीच लाईट घालवले. आता आंघोळीचं पाणी गॅसवर तापवावे लागेल आणि शिवाय चटणी नाही केली तर कोणीच त्या इडल्याना तोंड काय हातही लावणार नाही याची तिला खात्री होती. आता काय करावं या विचारात असतानाच तिचे सा.बा. - सा.बू. आले. त्यांचा चहा, कॉफी करताना तिला डोळ्यासमोर चटणीच दिसत होती. सांबार करता करता तिला अचानक आठवलं की फ्रिजमध्ये मिरचीचा ठेचा आहे. हुश्य!!  हायसं वाटलं चित्राला. त्यात दही घालून खमंग फोडणी घातली आणि घड्याळात पाहिलं. तिला ऑफिससाठी निघायला फक्त १ तासच होता. 'मी लावते इडल्या, तू जा तुझं आवर' असं सा.बा. नी म्हणताचक्षणी ती आंघोळीला पळाली. पाणी फारसं कडक तापलं नव्हतंच. तशीच कुडकुडत आंघोळ उरकली तिने.

'मी आज येत नाहीये सोडायला, तू रीक्षाने जा स्टेशनला' असं अर्धवट झोपेत बडबडून तिला काहीच बोलायची संधी न देता अमित कूस बदलून पुन्हा झोपून गेला. त्याला दोन चापट्या मारायचा मोह तिने कसाबसा आवरला. त्याला आज सुट्टी आणि हाफ डेच असला तरी चित्राला आज ऑफिस होतं. घाईघाईत नाश्ता करता करता पेपर वाचून ती निघाली तेव्हा तिला ५ मिनीटे उशीरच झाला होता. रिक्षा मिळून ती स्टेशनला पोचली तेव्हा चांगलाच उशीर झाला होता. रेल्वेची काय कायमच आपली आवड असते असा विचार करत ती स्टेशनवर पोचली तेव्हा इंडीकेटर्स बंद पाडून रेल्वेने पहिली सलामी दिली होती.

'शी बाई, दिवसाची सुरुवाताच वैतागाने झाली की अख्खा दिवस वैतागात जातो' असं म्हणत म्हणत ती प्लॅटफॉर्म उतरली. धक्काबुक्की करत मिळेल त्या गाडीत चढली आणि एकदाची ऑफिसला पोचली.

तिच्या नशीबाने ऑफिसमधे कोणी आपली आवड केली नाही. काम करता करता ४ तास कसे भुर्रकन ऊडून गेले तिलाच कळले नाही. मधे एकदा अमितने फोन करून ऑफिसला नीट पोचलीस ना विचारले. तेवढाच कय तो डिस्टर्बन्स. त्या ५ मिनीटांच्या फोनमधेही तिने सकाळी मोबाईलची अदलाबदल केल्याबद्दल आणि स्टेशनला सोडायला न आल्याबद्दल जरा जास्तच स्पष्टपणे तिची नाराजी व्यक्त केली.

ऑफिसनंतर चित्राने आणि तिच्या मैत्रीणीने ऑफिसजवळच्या मोठ्या पार्लरमध्ये फेशियलसाठी जायचं ठरवलं होतं. पण कँटीनमध्ये जेवताना अमितचा फोन आला की नागपूरचे काका काकू आलेत तर तू लवकर घरी ये. तिचा पडलेला चेहरा पाहून मैत्रिण काय समजायचं ते समजली आणि पुढच्या शनिवारचं नक्की करून दोघीही आपल्या वाटेला लागल्या. पुन्हा एकदा ट्रेनच्या गोंधळातून ती घरी पोचली तेव्हा पाहुण्यांनी गजबजलेलं घर तिचीच वाट पाहत होतं.

पाहूण्यांची सरबराई करता करता चित्रा चांगलीच जेरीला आली होती. कारण प्रत्येकाची आपली आवड. कोणाला साखरेचा चहा, कोणाला बिनसाखरेचा, कोणाला कॉफी, कोणाला सरबत. सरळ बेडरूममधे जाऊन झोपावं असं वाटत होतं, पण काय करणार? प्रत्येकाची आपली आवड जपणं हेच तिचे संस्कार होते ना... तिच्या आवडीबद्दल तिला कोणीच विचारत नव्हतं. तिने आपलं थोडसं उरलेलं सरबत एका ग्लासमधे घेतलं आणि बाहेर जाऊन गप्पा मारायला बसली. तेवढ्यात काकूच्या नातवाने सरबताचा ग्लास फोडला.
"अगं लहानच आहे तो, काही कळत नही त्याला अजून" ही वर काकूंची सारवासारव.

"लहान काय चांगला ८ वर्षाचा घोडा झालाय. आणि काकू तिच्या रुखवतातला होता तो ग्लास, आता गेला ना सेट वाया" असं अमित म्हणाल्यावर तिला आश्चर्याचा धक्काच बसला.

'मी ह्या सगळ्यांना मावशीकडे सोडून येतो, आई बाबा पण त्यांच्याबरोबर जाताहेत. तू रात्रीचं काही करू नकोस, बाहेरच जाऊ जेवायला. मला यायला तास दीड तास तरी लागेल, तोपर्यंत तू छानशी झोप काढ.' असे अमितने तिला सांगताच तिचा चेहरा कृतज्ञतेने भरून आला. जरा जास्तच उत्साहाने तिने सगळ्याना 'बाय' केले.

संध्याकाळी मात्र काहीच प्रॉब्लेम न येता त्या दोघांचा कार्यक्रम नीटपणे पार पडला. 'तुला आवडतो म्हणून पिझ्झा खाऊया.' 'आईसक्रीम नको, कुल्फी खाऊया तुला आवडते म्हणून' असं म्हणत म्हणत अमितने तिला खुलवलं. सकाळचा राग ती अगदी विसरून गेली. तिला आवडते म्हणून अमितने आणलेली मराठी नाटकाची  डीव्हीडी बघत, शेवटी 'आपली आवड' जपणारं कोणीतरी आहे ह्या  समाधानात ती अगदी गाढ झोपून गेली. 

 - मंजू. 
Posted by Unknown at ११:२९ AM 1 comments
Labels: कथा

२३ जून, २०१३

कुंपण आणि शेत

 घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर या रोजच्या लोकलच्या प्रवासात अनुभवलेलं काही बाही
................................................................................

TGIF असं लोकं लिहितात तेव्हा आतून अगदी कसंसंच होतं. आम्हाला शुक्रवारनंतर अजून एक अख्खा दिवस ऑफिसात यायचं असतं, काम करायचं असतं. त्यामुळे कोणी TGIF म्हटलं की आमच्यासारख्या शनिवर्करांना किंचाळून OGIF (Oh God! Its still Friday!) असं म्हणावंसं वाटतं.

नाही म्हणायला शनिवारी जरा निवांतपणा असतो. ऑफिसात सगळे रंगीबेरंगी कपडे घालून येतात, आणि त्यामुळे बर्‍या मूडमधे असतात. एरवी तुडुंब भरून वाहणार्‍या लोकलमधेही शनिवारी तुलनेने गर्दी कमी असते, मोकळेपणाने बसता येतं, मैत्रिणींशी गप्पा मारता येतात. एरवी समोरासमोर बसलेलो असलो तरी शेवटचं स्टेशन आल्याशिवाय एकमेकींची तोंडही बघता येत नाही इतकी अतिप्रचंड गर्दी असते.

त्यादिवशी असाच एक निवांत शनिवार होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू असल्यामुळे लोकलला गर्दी नव्हतीच. इकडे नको, तिकडे बसू असं करण्याइतका सीटचा चॉईस उपलब्ध होता. आम्ही अगदी आरामात गप्पा मारत बसलो होतो. दोन-चार फेरीवाले ट्रेनमधे चढलेले होते. बायका अगदी पारखून पारखून कानातले डूल, केसांच्या क्लिपा, छोट्यांसाठी रंगवायची पुस्तकं, कंगवे, नेलपॉलिशच्या बाटल्या वगैरे घेत होत्या.  

ठाण्यानंतर मुलुंड गेलं, घाटकोपर आलं तरी चढणार्‍या बायकांना बसायला जागा मिळाली. पण एक मुलगी मात्र दारातच टेकून उभी राहिली. तिला पाहून डब्यातले फेरीवाले थोडे दचकले... एकमेकांना तिच्या नकळत खाणाखुणा करू लागले. हे सगळं तिला कळत होतं काय की... पण एव्हाना ट्रेन चालू झाली होती, त्यामुळे त्यांना उतरून जाणं शक्य नव्हतं. तिने शांतपणे आपल्या पर्समधून मोबाईल फोनचे प्लग काढले आणि कानात घालून गाणी ऐकत उभी राहिली.

"ही आहे ना... गुलाबी ड्रेस घातलेली, तिच्यावर लक्ष ठेव." माझी मैत्रिण अगदी कुजबुजत्या स्वरात तिच्याकडे निर्देश करत मला म्हणाली.
" का गं?"
"ती रेल्वे पोलिस आहे." त्या फेरीवाल्यांच्या खाणाखुणा करण्याचा उलगडा मला झाला.
"ओह्.. पण ती तर युनिफॉर्ममधे नाहीये." गुलाबी ड्रेसवालीच्या नजरेत बकरे पकडल्याचा आविर्भाव होता.
"ड्युटीवर चालली आहे ती. ते सगळे फेरीवाले जसे डब्यात पुढेपुढे सरकतील तशी ही पण त्यांच्या मागून पुढे सरकेल. आणि शेवटच्या कंपार्टमेंटमधे गेले की त्या दरवाज्याशी उभी राहिल, जेणेकरून त्यांना उतरता येणारच नाही."
"पण ती तर ड्युटीवर नाहीये ना... मग ती कशी काय पकडू शकते त्यांना?" माझे पांढरपेशे प्रश्न संपत नव्हते. आणि मैत्रिण तर अगदी सराईतासारखी मला माहिती पुरवत होती.
"ती त्यांना पकडणार नाहीच. ती काय करेल ते बघ, हेच मी तुला कधीपासून सांगतेय."

ती गुलाबी ड्रेसवाली मुलगी गाणी ऐकतेय असं दाखवत होती, पण तिचा एक डोळा त्या फेरीवाल्यांवर होता. त्यातले जे मुलगे होते, ते दादर स्टेशनला गाडी थांबल्यावर प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दरवाज्याने रेल्वे ट्रॅकवर उड्या टाकून उतरले, आणि सुटका झाल्यागत खिदळले. पण एक मुलगी मात्र आपल्या मालासकट इतक्या त्वरेने उडी टाकून उतरू शकली नाही. मग ती नाईलाजाने आपल्याकडचा माल विकत राहिली. तिचाही एक डोळा त्या गुलाबी ड्रेसवाल्या मुलीवर होताच. तिच्या नजरेत केविलवाणी भावना दिसत होती, गुलाबी ड्रेसवाल्या मुलीच्या नजरेत मात्र एक प्रकारची गुर्मी जाणवत होती.

भायखळा स्टेशन गेलं. मैत्रिण म्हणाल्याप्रमाणे गुलाबी ड्रेसवाल्या मुलीने त्या फेरीवाल्या मुलीला आता खिंडीत पकडलं होतं. तिच्या अंगावरून गेल्याशिवाय फेरीवाल्या मुलीला आता व्हिटीला उतरणं अशक्य होतं.

व्हिटी स्टेशन आलं. डब्यातल्या सगळ्या बायका उतरून गेल्या.
आम्ही मात्र चिवटपणे थांबून राहिलो. फेरीवाल्या मुलीचं काय होतंय ते आम्हाला बघायचं होतं. ट्रेन शेवटच्या थांब्यावर पोचली होती. आणि किमान दहा मिनिटं तरी तिथे थांबणार होती.

गुलाबी ड्रेसवाली मुलगी फेरीवाल्या मुलीकडे सरकू लागली. तिच्याकडचा माल बघतेय असं दर्शवत तिच्याशी हळू आवाजात काही बोलू लागली. इतर बायकांसारख्याच तिनेही बर्‍याच वस्तू पारखून पारखून घेतल्या. क्लिपा, कानतली, हातात घालायचं ब्रेसलेट जे आवडेल ते ती बाजूला ठेवत होती. फेरीवाली मुलगी हताश होऊन गुलाबी ड्रेसवाली काय काय घेतेय ते नुसती बघत उभी होती.

सात-आठ मिनिटांनंतर ती ट्रेन कुठे जाणार त्याची घोषणा झाली. त्यावेळी गुलाबी ड्रेसवाल्या मुलीजवळ वस्तुंचा बर्यापैकी ढीग जमला होता. आम्ही नुकत्याच ट्रेनमधे चढल्यासारख्या दारात उभ्या होतो. शेवटी काय होतंय त्याची जबरदस्त उत्सुकता होती.

ट्रेनची घोषणा झाल्यावर तुरळक बायका ट्रेनमधे चढल्या. गुलाबी ड्रेसवाली मुलगी बाजूला काढलेल्या वस्तू गोळा करू लागली. त्या सगळ्या वस्तू एका पिशवीत घालून देण्याविषयी तिने फेरीवाल्या मुलीला सांगितले. त्या मुलीने सर्व वस्तू तिला व्यवस्थित बांधून दिल्या, त्या तिने ताब्यात घेतल्या आणि पुन्हा आपला हात पुढे केला. फेरीवाली मुलगी अजिजीने तिच्याकडे बघू लागली. तरीही गुलाबी ड्रेसवाली मुलगी काही बधली नाही. ती हळूहळू आवाजात फेरीवाल्या मुलीला काहीतरी सांगत राहिली. फेरीवाल्या मुलीने अतिशय केविलवाणेपणे तिच्या हातातल्या वस्तू भरलेल्या पिशवीकडे बघून घेतलं. आणि अगदी निराश होऊन कनवटीच्या बटव्यातून एक पन्नास रुपयांची नोट काढली आणि गुलाबी ड्रेसवाल्या मुलीच्या हातावर ठेवली.

"हप्ता?" मी धसकलेच होते.
"हो! राजरोसपणे."
"आणि तिने पैसे दिले नसते तर?"
"तर ती तिला त्यांच्या मुख्याकडे घेऊन गेली असती, तिच्याकडचा माल जप्त केला असता आणि फेरीवाल्यांचा म्होरक्या येऊन तिला सोडवेपर्यंत त्यांनी तिला अडकवून ठेवलं असतं."
"पण सोडवून म्हणजे काय... म्होरक्यादेखील पैसे देऊनच सोडवणार ना?"
"हो, पण त्याने दिलेले पैसे त्यांना आपापसात वाटून घ्यावे लागले असते. आत्ता मिळालेले पैसे तिच्या एकटीचेच नाही का?"
"आणि शिवाय तिच्याकडच्या वस्तूही फुकट घेतल्या."

शेताला घातलेल्या कुंपणाचं ते रूप पाहून मी दिङ्मूढ झाले होते. शब्दशः हातावर पोट असलेल्या त्या फेरीवाल्यांना नाडून यांना काय मिळतं ते समजण्याच्या पलिकडे आहे. जर प्रवासी त्यांच्याकडच्या वस्तू विकत घेत असतात, तर रेल्वे या फेरीवाल्यांसाठी विशेष परवान्याची सोय का करत नाही? बरं, रेल्वेपोलिस पकडतात म्हणून फेरीवाल्यांची संख्या कमी होते आहे असेही नाही. त्यांना लोकलमधे अधिकृतपणे वस्तू विकण्याची परवानगी देण्यास काय हरकत आहे?
इतकी वर्ष रेल्वेप्रवास करूनही हा न उलगडलेला प्रश्न आहे.

 - मंजू.
Posted by Unknown at ९:५६ PM 0 comments
Labels: लोकलकथा

१५ जून, २०१३

प्रारंभ


माझ्या ब्लॉगवर तुमचं मनापासून स्वागत!

खरंतर ब्लॉग रजिस्टर करून अडीच वर्ष झाली. इतक्या दिवसांत ब्लॉगवर एकही पोस्ट पाडली नाही की ब्लॉगकडे ढुंकून बघितलं नाही. ब्लॉग रजिस्टर करण्याची जशी सणक आली तशीच ब्लॉगवर पोस्ट लिहिण्याची सणक येऊन ही प्रारंभाची पोस्ट लिहिली. पण ती प्रकाशित केल्यावर आपण ब्लॉग जरा सजवायला हवा आहे ही जाणीव झाली. मग पोस्ट अप्रकाशित केली आणि सिंडरेलाकडे मदत मागितली. हो, तांत्रिक बाबतीत आपण अडाणी! फट् म्हणता फटॅक् व्हायचं, तेव्हा तज्ज्ञ लोकांची मदत घेतलेली बरी. विचारल्यासरशी तिने फटाफट चार पाच लिंका पाठवून दिल्या. शेकड्याने पसरलेल्या आंब्यांतून आपल्याला एकच आंबा निवडायचाय ही जाणीव होईपर्यंत पुन्हा मधे बरेच दिवस गेले. मग अतिचिकित्सा न करता हे टेम्प्लेट आवडले आणि दिले चिकटवून ब्लॉगला. तर, टेम्प्लेट कसे आहे, फॉन्ट वाचता येतोय का?, ब्लॉगमधे अजून काय बदल हवे आहेत हे मला नक्की कळवा.

ब्लॉग चालू करण्याचा माझा उद्देश आत्तापर्यंत लिहिलेलं सगळं एका ठिकाणी, नीटनेटकं, सहज सापडेल असं रहावं असा आहे. खरंतर कागदावर पेनाने वाईट अक्षरांत लिहिण्यापेक्षा कॉम्प्युटरवर लिहिणे सोपे, सोईस्कर आणि वेळ वाचवणारं. म्हणूनच कदाचित माझ्याकडून लिहिलं जात असावं. पण मी लेखिका नाही. शाळेत निबंधही कधी छान, चांगले, उत्कृष्ट वगैरे लिहिले नव्हते. मायबोलीवरील लेखन वाचता वाचता आपणही काही लिहून बघावं अशी ऊर्मी जागृत झाली. माझ्या लिखाणाच्या प्रयत्नाला अनपेक्षितपणे चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. काही चुकलं तर ते लोकांनी समजावून सांगितलं. सुधारणा सुचवल्या. तिकडे मी जे काही बरं-वाईट लिहिलं आहे ते एकेक करून ब्लॉगवर आणणारच आहे. त्याचबरोबर माझ्या हातून नवीन लिखाणही घडावं अशी इच्छा आहे. तुम्ही ते वाचाल आणि प्रतिक्रिया नोंदवाल अशी माझी अपेक्षा आहे.

इथे येत रहा आणि मी लिहिलेलं असंच काही बाही वाचत रहा!

 - मंजू.
Posted by Unknown at १२:०९ PM 4 comments
Labels: प्रारंभ
नवीनतर पोस्ट्स मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: पोस्ट (Atom)

Blog Design by Gisele Jaquenod | Distributed by Deluxe Templates